" पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक विनाकारण नतमस्तक होत नाही." असा विचार ज्यांचं साहित्य वाचून उमगतो असे नाशिकचे जेष्ठ साहित्यिक,ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांची काही पुस्तक वाचण्यात आली. " वाचल्याशिवाय माणूस कळत नाही,"याचा प्रत्यय आला.
१९६० नंतरचा मराठी साहित्याचा काळ हा विविध साहित्य प्रवाहांचा काळ मानला जातो. ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी ,इत्यादी साहित्यांचे प्रवाह या काळात निर्माण झाले.या सर्वांत दलित साहित्याची चळवळ अधिक प्रभावी होती. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा त्यामागे होती. बाबुराव बागुल, शंकरराव खरात, अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ, केशव मेश्राम, नारायण सुर्वे, रां. चिं.ढेरे,रावसाहेब कसबे यांसारखे प्रतिभावंत साहित्य या काळात उदयास आले. आपल्या लेखणी आणि विचारांनी त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले.या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मराठी साहित्यात मोलाचे योगदान देण्यात उत्तम कांबळे यांचा अग्रक्रम आहे.
उत्तम कांबळे यांनी कथा, कादंबरी, आत्मकथन, स्फुट लेखन अशा साहित्याच्या सर्वच प्रांतात मुशाफिरी केली आहे. माणूस आणि मानवता हा त्यांच्या लेखनाचा आत्मा आहे.समाजाच्या व्यथा- वेदना त्यांनी साहित्यातून मांडल्या.सामाजिक न्यायाची भूमिका त्यांच्या लेखनातून अभिव्यक्त होते.
पत्रकारितेच्या निमित्ताने उत्तम कांबळे नाशिकमध्ये स्थायिक झाले. एक निर्भीड, नि:पक्ष आणि उदारमतवादी भूमिका स्वीकारून पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा त्यांनी उमटवला. पत्रकारिता करीत असताना आलेले अनुभव, भेटलेली माणसे, समाज, चालीरीती, श्रद्धा -अंधश्रद्धा , इत्यादी त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या दिसतात.माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे, ही निकोप दृष्टी त्यांच्या लेखनातून जाणवते.
मुबलक साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. त्यांचे आतापावेतो पाच कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. रंग माणसांचे( १९९५),कावळे आणि माणसं (१९९८) कथा माणसांच्या (२००१), न दिसणारी लढाई (२००८), परत्या(२०१०) या सर्व कथासंग्रहात माणूस आणि मानवता हाच गाभा राहिलेला आहे. समाजाने नाकारलेली शोषित,पीडित, माणसे त्यांच्या कथांचे नायक होतात.थोडक्यात त्यांची लेखणी माणसाभोवतीच घिरट्या घालताना दिसते.
उत्तम कांबळे यांच्या रंग माणसांचे व कावळे आणि माणसं या दोन कथासंग्रहाची थोडक्यात ओळख या लेखाच्या निमित्ताने करण्याचा हा छोटासा प्रयत्न!
१९९५ मध्ये सुगावा प्रकाशने, १९९८ मध्ये मॅजेस्टिकने तर २०११ मध्ये मनोविकासने रंग माणसांचे या कथासंग्रहाच्या आवृत्ती प्रकाशित केल्या. यात विविध स्वभावाच्या माणसांच्या 32 कथा आहेत. या संग्रहाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. काही कथांवर नाटिका, लघुपट तयार झाले. काही कथा शाळा महाविद्यालयांच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी आल्या.
या कथांमधून भेटणारी माणसं ही समाजाच्या विविध स्तरांतून आलेली आहेत. स्त्री - पुरुष, शिक्षित - अडाणी,उघड्यावर राहणारे,भटके, श्रीमंत,शिक्षक, नोकरदार,राजकीय पुढारी,समाजसेवक इत्यादी माणसे वाचकांना भेटतात. यांतील काही माणसे बुरसट रुढीपरंपरा जपणारे तर काही विद्रोह करणारे आहेत. इतर साहित्यिक आणि उत्तम कांबळे यांच्यात एक प्रमुख फरक हा लक्षात येतो की, काही साहित्यिक समाजाच्या व्यथा वेदना आक्रस्ताळेपणे लेखनातून मांडतात.त्यांचे कथांतील नायक व्यथा वेदना सहन करणारी आहेत. तर उत्तम कांबळे यांच्या साहित्यातील माणूस केवळ सहन न करता विद्रोह - उठाव करतो. आपल्या कथांमधून उत्तम कांबळे वस्तुस्थितीवर नेमकेपणाने भाष्य करतात. म्हणून त्यांची कथा मनोरंजनापुरती न राहता ती वाचकांना विचार करायला प्रवृत्त करते. परिणामकारक शेवट हे त्यांच्या कथांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.
आशयाच्या दृष्टीने या कथासंग्रहातील कथा भिन्न असल्या तरी माणसांचे स्वभाव या एका सूत्राखाली त्या बांधल्या गेल्या आहेत.
ऑफिस मधील साहेबाचा राग घरी बायकोवर काढणारा ' साहेब ' मधील सावंत, "तिकीट ' मधील श्रद्धेचा गैरफायदा घेणारी अंगात आलेली स्त्री, ' माणूस ' मधील महारोगी, ' नाते अश्रूंचे ' मधील माणूसपण हरवलेली माणसे, ' दुष्काळ ' मधील राजकारण्यांची मानसिकता, ' पुण्य ' पदरात पाडून घेण्यासाठी वाटेल ते करणारे माणिकलाल व हिरालाल,' घुंगरू ' मधील व्यसनी सोनूशेठ, ' सिद्धी' कथेतील गोपाळ चांभार, ' करिअर ' मधील दिखाऊपणा,' लांडगा' कथेतील जिवंत आणि मृत माणसांची तुलना, इत्यादी कथा अतिशय संवेदनशीलपणे लेखकाने लिहिल्या आहेत. माणसांचे चांगले आणि वाईट स्वभाव अशी तुलना वाचक स्वतःच करू लागतो.' शापित सुख ' ही भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी कथा आहे. समाजाने स्त्रीची बाजू समजून घेऊन तिचा स्वीकार करावा,असा संदेश देणारी ' विकृत ' ही कथा समाजातलं दाहक वास्तव मांडते. माणसाला पैशाच्या पलीकडे जाऊन प्रेम आपुलकीची अधिक गरज असते,हे सांगणारी' मनीऑर्डर ' कथा वाचकांचे मन हेलावणारी आहे. शासकीय 'रेस्टहाऊस' मधील बाजीराव वाचकांचे मन जिंकतो. निखळ प्रेमाची आणि त्यागाची ' अपघात ' ही कथा हृदय पिळवटून टाकणारी आहे. ' आजी ' ही कथा एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व विशद करणारी कथा आहे.' नंदीबैल' ही कथा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात हेलकावे खाते. ' ड्रायव्हरची बायको ' ही एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा असून अंतर्मनातून प्रेम समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, ते स्पष्ट करते. ' लेखणी 'मधील दरिद्री पत्रकार, 'बेलदार ' मधील दुष्काळ, ' सुमीला हवा होता माणूस' मधील प्रा. चौधरी, ' वेडा 'कथेतील संजयची व्यथा,' कवी' मधील घटस्फोटीत स्वप्निलकुमार,ही पात्रे त्यांच्यातील स्वभाव गुणांमुळे लक्षात राहतात. ' वन रूम किचन ' मधून वयोवृद्धांची व्यथा लेखकाने मांडली आहे. ' निकाल ' मधून शिक्षण क्षेत्रातील गोंधळावर लेखकाने प्रकाश टाकला असून 'अश्रू जपून ठेवा ' ही धर्मांध लोकांना आरसा दाखवणारी भावनिक, संवेदनशील कथा आहे. स्वप्न आणि वास्तव यांची जाणीव करून देणारी ' कलेक्टर ' ही कथा वाचनीय आहे. ' संवेदना 'ही अन्याय सहन करणाऱ्या एका गवंड्याची कथा असून फुला कथेतील संगीतबारी वर नाचणाऱ्या व शेवटी भीक मागणाऱ्या स्त्रीची व्यथा वाचून वाचकांचे मन हेलावते.
माणसांच्या विविध प्रकारच्या स्वभावांची ओळख करून देणाऱ्या या वाचकप्रिय कथासंग्रहास बाबुराव बागुल पुरस्कार (१९९७),ग.दि. माडगूळकर पुरस्कार (१९९७), कुसुमाग्रज पुरस्कार, संत ज्ञानेश्वर पुरस्कार इत्यादी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
कावळे आणि माणसं हा देखील वाचक प्रिय कथासंग्रह १९९९ मध्ये मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केला.माणूस आणि त्यांच्या जगण्याचा संघर्ष याचा शोध घेण्याचा प्रयत्न या कथासंग्रहातून केला आहे. यात २१ कथांचा समावेश असून कावळे आणि माणसं ही दीर्घकथा आहे. स्वतः पत्रकार असल्याने उत्तम कांबळे यांचे अनुभवक्षेत्र व्यापक आहे.अवतीभवतीच्या जीवनानुभवाचे प्रतिबिंब त्यांच्या कथांतून उमटते. कल्पनाविलासापेक्षा त्यांच्या कथा वास्तवावर भर देतात. समाजातील सामान्य, पीडित- शोषित माणूस त्यांच्या कथांचे नायक बनतात.
मेलेल्या माणसाच्या पिंडाला कावळा शिवला की, आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते,अशी श्रद्धा भारतीय समाजात रूढ आहे. पिंडाला कावळा शिवावा म्हणून माणसांची धडपड आणि भुकेने व्याकुळ झालेला माणूस यातील विरोधाभासावर , स्मशानाच्या पार्श्वभूमीवर कावळा आणि माणसं ही कथा घडत गेली आहे.
' दरोडेखोर ' मधील दगडूमामा, ' रांग ' मधील माणसांची सहनशीलता, ' भय ' मधील मृत्यूचे भय, ' आंधळ प्रेम ' मधील चंगळवाद, ' दिवा लागला पणती विझली ' मधील माणसांच्या पुत्रप्राप्तीसाठीचा अट्टहास, ' बातमी ' मधील स्वातंत्र्यसैनिकाचा स्वभाव,' संत ' मधील लोकांची लुबाडणूक करणारा मोक्षदानंद, ' पाऊस ' मधील अंधश्रद्धा, ' चकवा ' मधील वडिलांची फसवणूक करणारी सुमित्रा,' एक वर्तुळ पूर्ण झालं ' मधील वाट चुकलेला तरुण, 'देवाची बाई ' मधील देवदासी, ' सूड 'मधील सोनू , ' बक्षीस ' मधील पोलीस खात्यातील भ्रष्टाचार, ' परीक्षा ' मधील फुलाबाई,' पमी आणि बंटी' मध्ये विभक्त कुटुंबाची शोकांतिका, ' उपवास ' मधील आईचा संघर्ष आणि त्याग, इत्यादी कथा विषय लेखकाने कथांतून मांडले आहेत.
उत्तम कांबळे यांच्या कथांतील भाषा साधी, सरळ व आकलनास सुलभ आहे,तरीही आशय प्रभावीपणे व्यक्त करणारी आहे. माणसांचे स्वभाव, त्यांचे भलेभुरे परिणाम, वृत्ती प्रवृत्ती हा त्यांच्या कथांचा आत्मा आहे. त्यांच्या कथांतील घटना, प्रसंग, पात्र वाचकांना परिचयाची वाटतात. आवश्यक तेथे प्रतीके, उपहास, विरोधाभास,अलंकारिक शब्द, म्हणी, प्रसंगांनुरूप वाक्प्रचारांचा वापर करून भाषेचे सौंदर्य लेखक खुलवतात. कथालेखन करताना आशयानुकूल वातावरण निर्मिती करण्यात कांबळे यशस्वी ठरले आहेत.
थोडक्यात उत्तम कांबळे एक प्रतिभावंत साहित्यिक असून मराठी साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली आहे, हे नि :संशय !
शैलेश अशोक पाटोळे
नाशिक
२७/१/२४
No comments:
Post a Comment