Thursday, June 13, 2024

अखंडित वाचीत जावे

ll अखंडित वाचीत जावे ll 

लाख मोलाचा जावई आणि इतर कथा
लेखक: रवींद्र गुर्जर
कथासंग्रह (अनुवादीत)
प्रकाशक: गायत्री साहित्य प्रकाशन,पुणे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
नमस्कार,
 " शीलं सद्गुणसंपत्ती ज्ञानंविज्ञानमेवच l
   उत्साहो वर्धते येन वाचनं तद्हितावहम "
अर्थात, जाने चारित्र्य,चांगल्या गुणांची संपत्ती, ज्ञान, विशेष ज्ञान आणि उत्साह वाढतो ते वाचन हितकारकच असते. उत्तम पुस्तकांच्या वाचनाने याची प्रचिती कायम येते.
  मराठी साहित्य वर्तुळात अनुवादक म्हणून प्रसिद्धीस पावलेले रवींद्र गुर्जर एक यशस्वी लेखक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ते ग्रंथालय चळवळ आणि वाचन संस्कृती याकरिता ओळखले जातात.अनेक कार्यशाळा आणि मार्गदर्शनपर व्याख्यानांतून त्यांनी वाचन चळवळ सुरू ठेवली आहे. आज पावतो जवळपास ४० हून अधिक अनुवादित पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत. हेन्री श्यारियार यांचं बहुचर्चित पॅॅपीलॉन हे त्यांचे वाचकप्रिय अनुवादित पुस्तक म्हणून पहिलं अपत्य म्हणता येईल. त्यानंतर गॉडफादर ,चार्ली चॅप्लिन ,सेकंड लेडी, सिसिलियन, द स्पाय हू केम फ्रॉम द कोल्ड, अकल्पिता, इत्यादी अशी कितीतरी अनुवादित आणि इतरही ग्रंथसंपदा त्यांच्या सिद्ध हस्तलेखनीतून प्रकटली असून चोखंदळ वाचकांची तृष्णा ते भागवत आहेत. पुस्तक हा विषय घेऊन भारत आणि भारताबाहेरही वयाची पंचाहत्तरी उलटलेला हा तरुण सातत्याने भ्रमण करीत असतो. " पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो,"असे म्हणतात. गुर्जर त्या अर्थाने अतिशय श्रीमंत आणि सुखी आहेत! 
  नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. नेहमीप्रमाणे गप्पा टप्पा झाल्यानंतर शबनम मधून आकर्षक मुखपृष्ठ असलेले एक पुस्तक खास भेट म्हणून त्यांनी मला दिले. नुकतंच त्यांच्या " लाख मोलाचा जावई आणि इतर कथा " या पुस्तकाचं प्रकाशन गायत्री साहित्य प्रकाशन संस्थेने केले.
  लाख मोलाचा जावई आणि इतर कथा या कथासंग्रहात १६ कथांचा समावेश असून जगभरातील विशेषतः पाश्चिमात्य देशांतील नामवंत कथा लेखकांच्या कथांचा अनुवाद वाचायला मिळतो. ओ हेन्री, मार्क ट्वेन, स्टीफन लीकॉक, साकी, गी द मोपासा याबरोबरच तीन कथा स्वतः रवींद्र गुर्जरांच्या आहेत.
  या कथांतून जगभरातील नामवंत कथा लेखकांच्या कथालेखनाच्या तंत्राची ओळख होते.कथेतील पात्र, वातावरण,संवाद, साधारणपणे एकोणिसाव्या शतकातील आहेत. अनुवाद असूनही वर्णन- कथन कृत्रिम वाटत नाही. कथारूप दृश्य वाचकांच्या डोळ्यापुढे उभे करण्याचे श्रेय जसं मूळ लेखकाचं तसं ते अनुवादक म्हणून गुर्जरांना देखील आहे.
  " दोन ध्रुवांवर दोघे," "नवरदेवाला लग्नाचे निमंत्रण " "कन्या सासराशी जाय"," शिळ्या पावाचा अनर्थ, " यशाचा रस्ता", या कथा विल्यम सिडनी पोर्टर उर्फ ओ हेन्री या प्रख्यात अमेरिकन लेखकाच्या मूळ कथांवर आधारित आहेत. पात्रांच्या अंगी असलेलं बुद्धी चातुर्य आणि धक्का तंत्राचा वापर करत अनपेक्षित शेवट हे त्यांच्या कथेचं खास वैशिष्ट्य या कथांतून अनुभवास येते. प्रेम आणि लग्न याचा वय आणि कर्तृत्वाशी कसा संबंध असतो, याचं तत्त्वज्ञान "दोन ध्रुवांवर दोघे" या कथेत लेखकाने मांडले आहे." नवरदेवाला लग्नाचे निमंत्रण", या कथेत ,"तरुणपणच्या आणि म्हातारपणाच्या दुःखात हाच फरक असतो की, तरुण असताना दुःख इतरांशी वाटलं की कमी होत जातं. म्हातारपणी ते कितीही वाटलं तरी आहे तसंच राहतं,"हे वाक्य वाचकांना विचारप्रवण करते. " शिळ्या पावाचा अनर्थ," मध्ये प्रेम व्यक्त न करता आलेल्या मिस मार्था मीच्याम हिची कथा वाचताना तिला वाचकांची सहानुभूती मिळते.
  आधुनिक लघुकथेचे जनक म्हणून ख्यातीप्राप्त असलेले फ्रेंच साहित्यिक गी द मोपासा यांच्या कथांवर बेतलेल्या "नकली हिरे", "पेचप्रसंग "आणि " मृत्यूशय्येवरील स्त्रीचे रहस्य " या कथा वाचनीय आहेत.
आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या नवऱ्याशी संसार करताना सुंदर असूनही जुळवून घेणाऱ्या स्त्रीची कथा तिच्या मृत्यूनंतर वेगळेच वळण घेते. श्रीमंती- समाधान यांतील फरक लेखकाने "नकली हिरे" या कथेतून अधोरेखित केले आहे. कथेत शेवटी येणारा ट्विस्ट या कथेचं खास वैशिष्ट्य म्हणता येईल. अगदी अशाच स्वरूपाची मृत्यूशय्येवर निद्रा घेत पडलेल्या स्त्रीची अन् तिच्या तरुण मुला- मुलीची कथा आहे. आपल्या मुलांवर अतिशय कडक नीती मूल्यांचे संस्कार करणाऱ्या स्त्रीबद्दल कथेचा शेवट वाचकांना धक्का देतो. " पेचप्रसंग " मधून एका बाहेरख्याली सरदारापुढे त्याच्या पत्नीने ठेवलेल्या पर्यायांमुळे निर्माण झालेले नाट्य वाचकांना भावते. कौटुंबिक नातेसंबंधात परिस्थिती, स्वभाव इत्यादी कारणांमुळे निर्माण झालेला ताणतणाव या कथांतून वाचायला मिळतो.
 " टॉम सायरची साहसं " साठी जगप्रसिद्ध असलेले अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांच्या कथेचा अनुवाद असलेली " व्हीनसचा प्राचीन पुतळा", ही कथा मात्र जुने संदर्भ ठाऊक नसणाऱ्या वाचकांसाठी अनाकलनीय वाटू शकते.
  लुईझा मे अल्कोट या स्त्रीवादी व संस्कारक्षम कथा लेखनासाठी प्रसिद्ध अमेरिकन लेखिकेच्या कथेवर आधारित " नववर्षाची मेजवानी " ही कथा सणसमारंभ कुटुंबात कसे साजरे व्हावे, समाजाप्रती संवेदनशीलता, संस्कारांची देवाण-घेवाण यांसारख्या मूल्यांवर बेतलेली आहे." केवळ सहानुभूती नको.. कृती महत्त्वाची" हे तत्व ही कथा मांडते.मार्क ट्वेन यांच्या, "स्वतः आनंदी राहण्याची उत्तम पद्धत म्हणजे दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे," या विचाराची प्रचिती या कथेतून येते.
  मूळ शिक्षक असलेले कॅनडियन लेखक स्टीफन लि कॉक विनोदी- उपहासात्मक लेखनासाठी प्रसिद्ध आहेत." माझ्या बचतीची कारकीर्द ",ही कथा स्टीफन लीकॉक यांच्या मूळ कथेचा अनुवाद आहे. गोंधळलेल्या एका सामान्य माणसाची ही कथा काहीशा विनोदी थाटात अवतरली आहे.
  आयझॅक असिमोव्ह हे अमेरिकन प्राध्यापक विज्ञान कथा लेखक म्हणून साहित्य जगताला परिचित आहेत. १९४०-५० च्या दशकांत त्यांनी रोबोट आणि मानवी जीवनातील त्याचा वापर यावर कथात्मक लेखन केलेले दिसून येते.त्यांच्या कथेवर आधारित "सहवास सुखाचा ", ही कथा बेतलेली आहे.कथानक वाचताना रोबोट या रजनीकांत आणि ऐश्वर्या राय अभिनित दाक्षिणात्य चित्रपटाची आठवण होते. अर्थात मूळ कथा १९४०-५० च्या दशकांत लिहिली गेली आहे,हे खास करून नमूद करतो.
  " पाहुण्यांचा महापूर ", ही एक विनोदी- विडंबन करणारी कथा या संग्रहात असून ब्रिटिश लेखक साकी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे. साकी.. आणि ब्रिटिश लेखक असे वाचून कदाचित काही वाचकांना संभ्रम निर्माण होऊ शकतो. परंतु हेक्टर ह्यू मूनरो हे त्यांचे मूळ नाव असून त्यांचा साहित्यिक काळ तत्कालीन ब्रिटिश ब्रह्मदेशात गेल्याने त्यांनी साकी या टोपण नावाने लेखन केले असावे,असा प्राथमिक अंदाज वाटतो.
  उर्वरित कथा स्वतः रवींद्र गुर्जर यांच्या आहेत. त्या सर्व कथा आताच्या काळाशी सुसंगत वाटतात. "आमिष" , ही कथा लोभापाई झालेल्या आर्थिक फसवणुकीची आहे. " चोरावर मोर ", या कथेच्या शेवटी लेखकाने धक्का तंत्राचा वापर केला आहे. तरुण चोराला अनुभवी चोर कसा ठकवतो, हे या कथेत वाचायला मिळते. " लाख मोलाचा जावई ", ही शीर्षककथा वाचकांचे पुरेपूर मनोरंजन करते. बेरोजगार तरुण आपल्या भावी सासऱ्याला व्यवसायाच्या वेगवेगळ्या कल्पना सुचवून आपलंसं करू पाहतो. तर अनुभवी यशस्वी उद्योजक असलेले सासरे त्याची कशी परीक्षा घेतात.. हे वाचून वाचकांना स्वानुभूतीचा आनंद मिळतो. एक मनोरंजक नाट्य असे या कथेचे वर्णन करता येईल.
  लघुकथेची सारी वैशिष्ट्य या संग्रहातील कथांतून दिसून येतात. त्या अर्थाने हा लघुकथा संग्रह आहे.मूळ लेखक आणि अनुवादक दोघांच्याही कौशल्यामुळे कथा, वातावरण, पात्र,प्रसंग, संवाद वाचकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. कथांतून संस्कार, अनुभूती, नीतीमूल्ये, विनोद - मनोरंजन होते.जागतिक कथा सागरातून अनमोल मोती रवींद्र गुर्जरांनी आपल्या साहित्यिक प्रगल्भतेने निवडून लाखमोलाच्या कथांचा हा खजिना वाचकांसमोर पुस्तकाच्या माध्यमातून खुला केला आहे ! 
" लाख मोलाचा जावई आणि इतर कथा", हा रवींद्र गुर्जरांचा कथासंग्रह त्यांच्या इतर पुस्तकांसारखाच वाचनीय आहे,यात शंका नाही.

लेखन
शैलेश पाटोळे
नाशिक

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...