Friday, July 26, 2024

कर्तव्यपूर्ती

कर्तव्यपूर्ती : सौ.श्रद्धा सतीश जोशी 

 अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे,"The only thing that you absolutely have to know is the location of the library."इतकं शालेय ग्रंथालयांचे महत्त्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या जीवनात असते. ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांचे समाधान करण्याचं तंत्र जर ग्रंथपालांना अवगत असले तर अनेकांची पावलं आपोआप ग्रंथालयाकडे वळतात. मला वाटतं आपल्या पेठे विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ.श्रद्धा जोशी यांच्या दालनात म्हणूनच विद्यार्थी आणि फावल्या वेळात शिक्षकांचा घोळका कायम दिसून येत असतो. आज अचानक ग्रंथालय या विषयावर लेखन का...? पुढे वाचा..
  आपल्या पेठे विद्यालयातील ग्रंथपाल सौ श्रद्धा सतीश जोशी या दिनांक ३१ जुलै २९२४ रोजी शासकीय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती ही अटळ आहे; परंतु दोन गोष्टींसाठी मनाला रुखरूख लागते. एक म्हणजे शासनाची नवीन पदभरती बाबत असलेल्या अनास्थेमुळे १ ऑगस्टपासून शंभर वर्षे जुने व अद्ययावत असलेले ग्रंथालय, शालेय वाचनालय ग्रंथपाल नसल्याने बंद राहणार ! दुसरी बाब म्हणजे विद्यार्थ्यांना वाचनानंद मिळावा,वाचनाचा संस्कार त्यांच्यावर व्हावा म्हणून तळमळीने झटणाऱ्या सौ. श्रद्धा जोशींसारख्या ग्रंथपाल सेवानिवृत्त झाल्याने एक अभ्यासू,ग्रंथालय शास्त्रातल्या जाणकार, मृदभाषी, शांत,संयमी व्यक्ती संस्थेतून जाणार ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे. अशा व्यक्ती संस्थेतून बाहेर पडणं ही खरे तर शाळा आणि संस्थेची मोठी हानी आहे. 
  काही लोक बोलून, गाजावाजा करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात; परंतु सौ.श्रद्धा जोशींसारख्या व्यक्तींचे अस्तित्व त्यांच्या कृतीतून, कार्यातून सतत जाणवत राहते. त्यांचा स्वभाव- बोलणं- वागणं इत्यादींमुळे ग्रंथालयाचा दरवाजा उघडा दिसला की, पाय आपोआप तिकडे वळतात! 
  मा.कै.श्री. नाना नेऊरगावकर,श्रीमती शिंगणे,श्रीमती हेरकल ,इत्यादी वाचन आणि वाचकप्रिय ग्रंथपालांचा वारसा सौ.श्रद्धा जोशींनी चालवला. 
 अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून सौ.श्रद्धा जोशी १९९३ मध्ये संस्थेच्या टी.झेड.विद्यामंदिर भगूर येथे रुजू झाल्या. परंतु सहा महिन्यांतच संस्थेने त्यांची बदली माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे केली. त्यांच्या कामाची पद्धत, उरक, आवाका लक्षात घेऊन १९९५ मध्ये त्यांना पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून नियुक्त केले. पुढे २०१२ मध्ये आपल्या पेठे विद्यालयाच्या ग्रंथपाल पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. शाळा कोणतीही असो आपले कर्तव्य त्या कधी विसरल्या नाहीत. 
   नाशिक जिल्ह्यात पोलीस खात्यात नोकरीला असणाऱ्या वडिलांच्या शिस्तशीर स्वभावाचा संस्कार त्यांच्यावर झाला असावा.चार बहिणी आणि एक भाऊ सर्व सुशिक्षित आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तव्य बजावून सध्या सेवानिवृत्त झाले आहेत.सौ. जोशी यांचे पती श्री.सतीश जोशी प्रारंभी दैनिक देशदूत मध्ये अर्धवेळ कम्प्युटर जॉब वर्क करायचे.पुढे ते सोडून स्वतःचे पूर्णवेळ संगणक जॉबवर्क ते करत. त्यांनी देखील या कामातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.एक मुलगी आणि जावई असून ते परदेशात आहेत.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन श्री.व सौ.जोशी कुटुंबीयांनी आपला उत्कर्ष साधला आहे.कमवा आणि शिकाचा संस्कार त्यांच्यावर बालपणापासूनच झालेला असल्याने ग्रंथालयात आलेल्या विद्यार्थ्यांशी त्या संवाद साधून,त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात.विशेषतः मुला-मुलींना त्यांच्याशी बोलावेसे वाटते !
  ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांचे समाधान करण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे. त्यांच्या स्वभावातील नम्रता, संयम, चिकाटी या गुणांमुळे सौ. जोशींचे व्यक्तिमत्व सर्वांनाच भावते ! 
   वाचनालय, पुस्तके,तिथले वातावरण वाचनासाठी पूरक त्या ठेवतात. आहे त्या सुविधांचा पुरेपूर उपयोग त्यांनी ग्रंथालय नीटनेटके ठेवण्यासाठी करून घेतला. संगणकीय नोंदी देखील त्यांच्या कार्यकाळात करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळेच सेवानिवृत्ती जवळ येत असताना कर्तव्यपूर्तीचा निर्भेळ आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत आहे.
   प्रतिवर्षी ग्रंथ खरेदी करताना त्यांच्यातील उत्तम ग्रंथपालाची चुणूक दिसून यायची. नवनवीन ग्रंथांची त्या निवड करीत.त्यासाठी शिक्षकांना आणि प्रसंगी विद्यार्थ्यांची आवड ही त्या लक्षात घेत. ग्रंथालय अद्ययावत ठेवत. मध्यंतरी एका वाचनालयातील भिंतीवर लिहिलेला सुविचार माझ्या वाचनात आला, तो असा ," BAD LIBRARIES BUILD COLLECTIONS, GOOD LIBRARIES BUILD SERVICES, GREAT LIBRARIES BUILD COMMUNITIES ! ",मला वाटते आपल्या पेठे विद्यालयाचे वाचनालय हे सौ.श्रद्धा जोशी यांच्यासारख्या ग्रंथपालांमुळे केवळ पुस्तकांचा संग्रह नक्कीच नाही! 
  राम कृष्णही आले गेले... अशा काव्याने आपण आपल्या मनाचे समाधान करून घ्यावे. काळ कोणासाठी थांबत नसतो, हेच खरे.....
   शांत, सुस्वाभावी,मृदूभाषी, संयमी, कर्तव्यनिष्ठ, ग्रंथालय शास्त्राच्या जाणकार, अशा आपल्या विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ.श्रद्धा जोशी यांना सेवानिवृत्तीनंतर देखील उत्तम आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा! 

शैलेश पाटोळे 
पेठे विद्यालय,नाशिक
२७ जुलै २०२४

Wednesday, July 17, 2024

नंदू.. सबका बंधू

                    नंदू.. सबका बंधू !  
ज्या संस्थेत आपलं शिक्षण झालं ,बालपण गेलं आपलं पालनपोषण झालं अशा संस्थेची सेवा करून तिचं आपल्यावरील ऋण फेडण्याची संधी फार कमी लोकांना प्राप्त होते. सुदैवाने अशी संधी लाभलेले आपल्या संस्थेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री.नरेंद्र गंगाधर जवादे हे जुलै महिन्याच्या अखेरीस शासनाच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.खरंतर नरेंद्र म्हणून त्यांना कोणीच ओळखत नाही. जन्म दाखला आणि कागदोपत्री नोंदी पुरतेच हे नाव सीमित आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्यांना नंदू नावाने ओळखतात आणि समवयस्कांसाठी नाना !
  जवळपास सहा फूट उंची, व्यायामाने कमावलेले शरीर, अतिशय नीटनेटके, हाफ स्लिवहचे रंगीबेरंगी उठावदार शर्ट, पायात कायम बूट मग ते साधे का असेना ! वयाच्या साठीतही ताठ मानेने चालणारे नंदू जवादे सेवानिवृत्त होत आहेत, यावर विश्वास बसत नाही.
  मी पेठेत सेवेला प्रारंभ केला तेव्हा त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने, नम्र स्वभावाने आणि कार्य तत्परतेने मला आकर्षित केले. सहवासाने आणि अनुभवाने शिक्षक आणि कर्मचारी हा भेद गळून पडला. त्या काळातील आम्ही स्टाफ रूम मधील सर्व शिक्षक शिक्षिका त्याला विनोदाने नंदू ....सबका बंधू असे म्हणत असू. दरम्यान त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षक म्हणून मिरवण्याचा योग आला. नंदू जवादे माझ्यासारख्या शिक्षकांसाठी नाना कधी झाले, हे कळले नाही! 
  नंदूचे वडील श्री.गंगाधर जवादे हे नाशिक मधील प्रख्यात वकील श्री.बाबुराव नाडकर्णी यांच्या सेवेत होते. वकिलीच्या निमित्ताने त्यांना बऱ्याचदा मुंबईला राहावे लागत असे. ॲड.नाडकर्णी त्यांच्या प्रामाणिकपणावर बेहद खुश होते. पुढे नाशिकला आल्यावर नाडकर्णी वकिलांच्या मध्यस्थीमुळे फावडे गल्लीतील त्याकाळी असलेल्या भिकुसा विडीच्या कारखान्यात मॅनेजर म्हणून काम मिळाले. जवादे कुटुंबीयांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. दरम्यान आई सौ.रुक्मिणीबाई या नाशिक शहरातील नामवंत शिक्षक श्री. वसंतराव व सौ.लीलाताई ठकार यांच्या बंगल्यावर काम करीत असत. नम्र आणि प्रामाणिक काम करणाऱ्या रुक्मिणीबाईंवर ठकार कुटुंबीयांचा खास लोभ जडला. श्री.वसंतराव ठकार सरांच्या आशीर्वादाने पुढे सौ.रुक्मिणीबाईंना नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या राजेबहादूर वाड्यात भरणाऱ्या प्रा.शि.मंदिर शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली. पुढे मुलींसाठी शारदा मंदिर ही स्वतंत्र शाळा सुरू झाल्यावर रुक्मिणीबाई तेथे रुजू झाल्या.तेथे श्रीमती परांजपे भगिनींच्या हाताखाली काम करताना शाळेतल्या मुलींशी सेवाभावाने त्या जोडल्या गेल्या. लहानगा नरेंद्र आईचा पदर धरून शाळेत तिच्या अवतीभवती फिरत असे. पुढे थोडा मोठा झाल्यानंतर नरेंद्रला शाळेतील छोटी मोठी कामे करण्यात रस वाटू लागला. 
  नरेंद्रचे शालेय शिक्षण राजे बहादूर वाड्यातील प्रा.शि. मंदिर आणि माध्यमिक शिक्षण पेठे विद्यालयात झाले. तेथे संस्कारांचे बाळकडू मिळाले. शाळेतल्या फडके बाई, धारपुरे सर, बुरकुले सर, गुप्ते सर,साठ्ये सर यांच्या वर्गात बसण्याचा योग आला. परिस्थितीमुळे आठवी नंतर नंदूला मामाकडे मुंबईला जावे लागले. शिक्षणात खंड पडला. तेथे अर्धशिक्षित नंदूला सुपर स्टोव्ह या कंपनीत काम मिळाले. परंतु तेथे त्याचे मन फारसे रमले नाही. नाशिकला परत आल्यावर एका गॅरेजमध्ये त्याला काम मिळाले. अनुभवी कारागिरांच्या हाताखाली गाड्यांची दुरुस्ती, पेंटिंग, वेल्डिंगची कामे तसेच सुतारकाम तो शिकला. आई-वडिलांचा कष्टाळूपणाचा गुण त्याच्यात उपजतच होता. तेथेही अल्पावधीतच मालकाचा विश्वास त्याने संपादन केला. 
  दरम्यान गॅरेज मालकांनी वर्तमानपत्रात आलेली नासिक एज्युकेशन सोसायटीची शिपाई पदाची जाहिरात दाखवून अर्ज करायला सांगितला. धडधाकट शरीरयष्टी, कामातला अनुभव, आणि माजी विद्यार्थी असल्याने नंदूची शिपाई म्हणून नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक झाली. तेथे मुख्याध्यापक श्री.एस के कुलकर्णी आणि उपमुख्याध्यापक म.पु.पंडित यांनी त्याला कामाचे स्वरूप समजावून दिले आणि रात्रपाळीची जबाबदारी दिली. प्रामाणिकपणे नंदू काम करत राहिला. तेथे डांगळे नावाचे वरिष्ठ चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत होते. नुकताच नोकरीत लागलेल्या नंदू कडून तो त्याच्या वाट्याचे काम करून घेत असे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही त्याला बऱ्याचदा ड्युटी करावी लागत होती.याच काळात नंदूचे लग्न ठरले. रीतसर सुट्टीसाठी त्याने मुख्याध्यापकांकडे अर्ज केला; परंतु शिस्तीचे भोक्ते असलेल्या मुख्याध्यापकांनी नोकरीची नवीनच सुरुवात असल्याने जास्त दिवस सुट्टी देता येणार नाही,असे सांगून केवळ लग्नाच्या दिवसाची सुट्टी मंजूर केली! 
  लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला हळदीसाठी जाणे भाग होते. काय करावे...? असा प्रश्न त्याच्यापुढे पडला. अशावेळी श्री.डांगळे यांनी," मी तुझ्या ऐवजी शाळेत रात्रपाळीची ड्युटी करीन.तू चार वाजता शाळेतून निघून जा,"असे सांगितले. लग्न झाल्यानंतर नंदू दुसऱ्या दिवशी शाळेत रुजू होण्यासाठी गेला. काय झाले असेल..? विचार करा... डांगळे रात्रपाळीला गेलाच नाही! सबब.. नंदू ड्युटी सोडून न विचारता निघून गेला म्हणून मुख्याध्यापकांनी त्यास रुजू करून घेतले नाही. पुढे दोन-तीन महिने घरी बसावे लागले. अर्ज विनंती केल्यावर,आईच्या कृपेने नंदूला संस्था कार्यालयात काम मिळाले. नोकरीतला हा अनुभव त्याला खूप काही शिकवून गेला. एखाद्याची फसवणूक केल्यास किती वाईट प्रसंग निर्माण होऊ शकतो, याची त्याला जाणीव झाली. पुढे काही काळ रंगुबाई जुन्नरे शाळेत त्याने मानधनावर सेवा केली. 
आतापर्यंत केलेले काम, प्रामाणिकपणा, नम्रता इत्यादींमुळे त्याचे नशीब फळफळले ! १९९२ मध्ये झालेल्या कर्मचारी भरतीत शासनमान्य शिपाई म्हणून ज्या शाळेत नंदू शिकला, खेळला, बागडला त्या पेठेत शिपाई म्हणून रुजू झाला. तेथे सलग वीस वर्षे सेवा करून पुढे सी.डी.ओ. मेरी नंतर माध्यमिक विद्यालय उंटवाडी आणि पुन्हा सीडीओ मेरी हायस्कूल असा नोकरीतला प्रवास करून नंदू आज निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. 
  पेठेत रुजू झाल्यावर पहिल्याच दिवशी आणखी एक वाईट अनुभव आला.जो नोकरीत तत्पर आणि दक्ष राहण्याची किती आवश्यकता आहे, हे शिकवून गेला. शाळेत एका खांबाला अडकवलेला लाऊड स्पीकर चोरीला गेला होता. कडक शिस्तीच्या श्री.का.विं जोशी सरांनी शिपायांना पटांगणात उभे करून प्रत्येकाची कान उघाडणी केली. स्पीकर परत मिळवून द्या.नाहीतर पैशांची वर्गणी करून नवीन स्पीकर आणून द्या... असे फर्मान काढले. नोकरीचा पहिलाच दिवस असलेला नंदू... वर्गणीचे पैसे कुठून देणार? कसेतरी ते निभावून नेले. वसंतराव कुलकर्णी, नाना नाईक, विठ्ठलराव पठाडे,मधुकर ब्राह्मणकर, रामभाऊ जोशी इत्यादी विविध कामांत तरबेज असलेले कर्मचारी त्याकाळी पेठेत होते. संस्कारशील शिक्षक आणि शाळा म्हणून पेठेचालौकिक भरास होता. पेठेत नोकरी म्हणजे समाजात कौतुकाचा विषय होता! बालपणापासून उत्तम शिक्षक आणि नोकरीच्या काळात उत्तम पदाधिकारी व सहकारी कर्मचारी लाभले म्हणून व्यसनाची हवा नंदूला लागली नाही! अर्थात आई-वडिलांचे कष्ट, कुटुंबासाठीची त्यांची ओढाताण त्याने प्रत्यक्ष अनुभवली होती. आपण वाईट वागलो तर आई-वडिलांनी मिळवलेले प्रतिष्ठा धुळीस मिळेल याची त्याला जाणीव होती.
 हो...पण एक व्यसन मात्र त्याला होते. कोणते...? थांबा सांगतो.. शाळेत असताना साठये सरांचा तास नंदूचा अत्यंत आवडीचा. SOUND MIND IN A SOUND BODY सुविचार साठये सर पोट तिडकीने सांगायचे. या विचारांनी तो प्रेरित झाला. शरीर निरोगी ठेवायचे तर व्यायाम महत्त्वाचा ; परंतु व्यायामशाळेत परिस्थितीमुळे जाणे शक्य नव्हते. गंगेवर टाळकुटेश्वर मंदिरासमोरच्या पटांगणात इतर मुलांबरोबर अनेक देशी व्यायाम प्रकार तो शिकला.शरीर पिळदार बनवले.अगदी अलीकडे, म्हणजे आजोबा होईपर्यंत नंदू नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ व्यायाम करीत असे. तुम्ही म्हणाल शरीर पिळदार बनवून फायदा काय झाला..? शिपाईच राहिला ना..? हो, नंदू शिपाईच राहिला ! पण वयाच्या साठीत पदार्पण करीपर्यंत सर्वत्र आढळणाऱ्या शुगर.. डायबिटीस, बी.पी. इत्यादी व्याधी त्याच्या अवतीभोवती देखील फिरकल्या नाहीत ! आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल.. थोडी आर्थिक गणितं जुळवून नंदू ने जुन्या नाशकातलं आपलं विऱ्हाड मेरी परिसरात एका फ्लॅटमध्ये टाकलं. दरम्यानच्या काळात त्याची माध्यमिक विद्यालय उंटवाडी बदली झाली. घरी पोहोचेपर्यंत उशीर होत असल्याने त्याला व्यायामासाठी वेळ देता येत नव्हता. त्यावर उपाय म्हणून शाळा सुटल्यानंतर सिडको ते मेरी हे अंतर तो पायी जात असे! आता याला तुम्ही काय म्हणाल? व्यायामाची व्यसन की वेडेपणा...!
  सेवानिवृत्त होण्याच्या आतच नंदूने त्याच्यावरील सर्व सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. त्याची पत्नी सौ. चित्रा या तितक्याच कष्टाळू आणि सोशिक आहेत.मुलगी आणि दोन्ही मुलांची लग्न झाली असून नातवंड- पतवंड असलेला त्याचा सुखी संसार आहे. या अर्थाने नंदू खरोखरच नशीबवान आहे! 
 शाळेतल्या सर्व घटकांशी त्याचे अगदी सलोख्याचे संबंध. संस्था, शाळा, शिक्षकांबद्दल, वरिष्ठांबद्दल नितांत आदर त्याच्या मनात ठासून भरलेला आहे. एक प्रामाणिक, नम्र, विश्वासू कर्मचारी म्हणून नंदू सर्वांच्या हृदयात स्थान मिळवू शकला! शाळेच्या कोणत्याही कामाला त्याने कधीही नकार दिला किंवा कुरकुर केलेली ऐकिवात नाही. दोन पिढ्यांपासून मिळवलेला विश्वास नंदूने कायम टिकून ठेवला आहे. 
प्रत्येकासाठी धावपळ करणारा, सर्वांशी प्रेमळपणे वागणारा नंदू.. सबका बंधू असाच राहिला! 
 कर्तव्य आणि कर्मालाच भक्ति मानणारा श्री.नरेंद्र तथा नंदू जवादे यांचं आयुष्य सेवानिवृत्तीनंतरही आनंदोत्सवांनी भरून राहो,ह्याच सदिच्छा ! 

✍️✍️✍️
शैलेश पाटोळे 
पेठे विद्यालय, नाशिक 
२७ जुलै २०२४
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...