कर्तव्यपूर्ती : सौ.श्रद्धा सतीश जोशी
अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे,"The only thing that you absolutely have to know is the location of the library."इतकं शालेय ग्रंथालयांचे महत्त्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या जीवनात असते. ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांचे समाधान करण्याचं तंत्र जर ग्रंथपालांना अवगत असले तर अनेकांची पावलं आपोआप ग्रंथालयाकडे वळतात. मला वाटतं आपल्या पेठे विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ.श्रद्धा जोशी यांच्या दालनात म्हणूनच विद्यार्थी आणि फावल्या वेळात शिक्षकांचा घोळका कायम दिसून येत असतो. आज अचानक ग्रंथालय या विषयावर लेखन का...? पुढे वाचा..
आपल्या पेठे विद्यालयातील ग्रंथपाल सौ श्रद्धा सतीश जोशी या दिनांक ३१ जुलै २९२४ रोजी शासकीय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती ही अटळ आहे; परंतु दोन गोष्टींसाठी मनाला रुखरूख लागते. एक म्हणजे शासनाची नवीन पदभरती बाबत असलेल्या अनास्थेमुळे १ ऑगस्टपासून शंभर वर्षे जुने व अद्ययावत असलेले ग्रंथालय, शालेय वाचनालय ग्रंथपाल नसल्याने बंद राहणार ! दुसरी बाब म्हणजे विद्यार्थ्यांना वाचनानंद मिळावा,वाचनाचा संस्कार त्यांच्यावर व्हावा म्हणून तळमळीने झटणाऱ्या सौ. श्रद्धा जोशींसारख्या ग्रंथपाल सेवानिवृत्त झाल्याने एक अभ्यासू,ग्रंथालय शास्त्रातल्या जाणकार, मृदभाषी, शांत,संयमी व्यक्ती संस्थेतून जाणार ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे. अशा व्यक्ती संस्थेतून बाहेर पडणं ही खरे तर शाळा आणि संस्थेची मोठी हानी आहे.
काही लोक बोलून, गाजावाजा करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात; परंतु सौ.श्रद्धा जोशींसारख्या व्यक्तींचे अस्तित्व त्यांच्या कृतीतून, कार्यातून सतत जाणवत राहते. त्यांचा स्वभाव- बोलणं- वागणं इत्यादींमुळे ग्रंथालयाचा दरवाजा उघडा दिसला की, पाय आपोआप तिकडे वळतात!
मा.कै.श्री. नाना नेऊरगावकर,श्रीमती शिंगणे,श्रीमती हेरकल ,इत्यादी वाचन आणि वाचकप्रिय ग्रंथपालांचा वारसा सौ.श्रद्धा जोशींनी चालवला.
अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून सौ.श्रद्धा जोशी १९९३ मध्ये संस्थेच्या टी.झेड.विद्यामंदिर भगूर येथे रुजू झाल्या. परंतु सहा महिन्यांतच संस्थेने त्यांची बदली माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे केली. त्यांच्या कामाची पद्धत, उरक, आवाका लक्षात घेऊन १९९५ मध्ये त्यांना पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून नियुक्त केले. पुढे २०१२ मध्ये आपल्या पेठे विद्यालयाच्या ग्रंथपाल पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. शाळा कोणतीही असो आपले कर्तव्य त्या कधी विसरल्या नाहीत.
नाशिक जिल्ह्यात पोलीस खात्यात नोकरीला असणाऱ्या वडिलांच्या शिस्तशीर स्वभावाचा संस्कार त्यांच्यावर झाला असावा.चार बहिणी आणि एक भाऊ सर्व सुशिक्षित आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तव्य बजावून सध्या सेवानिवृत्त झाले आहेत.सौ. जोशी यांचे पती श्री.सतीश जोशी प्रारंभी दैनिक देशदूत मध्ये अर्धवेळ कम्प्युटर जॉब वर्क करायचे.पुढे ते सोडून स्वतःचे पूर्णवेळ संगणक जॉबवर्क ते करत. त्यांनी देखील या कामातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.एक मुलगी आणि जावई असून ते परदेशात आहेत.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन श्री.व सौ.जोशी कुटुंबीयांनी आपला उत्कर्ष साधला आहे.कमवा आणि शिकाचा संस्कार त्यांच्यावर बालपणापासूनच झालेला असल्याने ग्रंथालयात आलेल्या विद्यार्थ्यांशी त्या संवाद साधून,त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात.विशेषतः मुला-मुलींना त्यांच्याशी बोलावेसे वाटते !
ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांचे समाधान करण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे. त्यांच्या स्वभावातील नम्रता, संयम, चिकाटी या गुणांमुळे सौ. जोशींचे व्यक्तिमत्व सर्वांनाच भावते !
वाचनालय, पुस्तके,तिथले वातावरण वाचनासाठी पूरक त्या ठेवतात. आहे त्या सुविधांचा पुरेपूर उपयोग त्यांनी ग्रंथालय नीटनेटके ठेवण्यासाठी करून घेतला. संगणकीय नोंदी देखील त्यांच्या कार्यकाळात करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळेच सेवानिवृत्ती जवळ येत असताना कर्तव्यपूर्तीचा निर्भेळ आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत आहे.
प्रतिवर्षी ग्रंथ खरेदी करताना त्यांच्यातील उत्तम ग्रंथपालाची चुणूक दिसून यायची. नवनवीन ग्रंथांची त्या निवड करीत.त्यासाठी शिक्षकांना आणि प्रसंगी विद्यार्थ्यांची आवड ही त्या लक्षात घेत. ग्रंथालय अद्ययावत ठेवत. मध्यंतरी एका वाचनालयातील भिंतीवर लिहिलेला सुविचार माझ्या वाचनात आला, तो असा ," BAD LIBRARIES BUILD COLLECTIONS, GOOD LIBRARIES BUILD SERVICES, GREAT LIBRARIES BUILD COMMUNITIES ! ",मला वाटते आपल्या पेठे विद्यालयाचे वाचनालय हे सौ.श्रद्धा जोशी यांच्यासारख्या ग्रंथपालांमुळे केवळ पुस्तकांचा संग्रह नक्कीच नाही!
राम कृष्णही आले गेले... अशा काव्याने आपण आपल्या मनाचे समाधान करून घ्यावे. काळ कोणासाठी थांबत नसतो, हेच खरे.....
शांत, सुस्वाभावी,मृदूभाषी, संयमी, कर्तव्यनिष्ठ, ग्रंथालय शास्त्राच्या जाणकार, अशा आपल्या विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ.श्रद्धा जोशी यांना सेवानिवृत्तीनंतर देखील उत्तम आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा!
शैलेश पाटोळे
पेठे विद्यालय,नाशिक
२७ जुलै २०२४
No comments:
Post a Comment