Sunday, February 9, 2025

मनाच्या तळीचा पाझर : सुहास केशव वेल्हाणकर

मनाच्या तळीचा पाझर : सुहास केशव वेल्हाणकर

नमस्कार 
बदलते राजकारण,समाजकारण, कुटुंब व्यवस्था इतकेच काय आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण यांसारख्या विविध विषयांवर सामान्य माणसाचे देखील त्याचे स्वतःचे एक मत असते. परंतु त्याचे हे मत त्याच्यासारखेच सामान्य वाटून त्याला कुठेच व्यक्त होऊ दिले जात नाही.किमान तशी संधी त्याला मिळत नाही. अगदी चहाच्या कट्ट्यावर, समवयस्कांमध्ये, ऑफिस- कार्यालयात इतकंच काय कुटुंबात देखील अव्हेर करण्याइतके त्याचे मत सामान्य मानले जाते ! मत व्यक्त करण्याबाबत त्याची कुचंबना होतच असते... अशा सामान्यातले असामान्य प्रतिभा असलेले काहीजण व्यक्त होण्यासाठी लेखणीचा आधार घेतात... आणि व्यक्त होतात मनसोक्त ...कागदावर ! व्यक्त झालेल्या या भावना गद्य किंवा पद्याचा आकार घेतात. अशांपैकी काही निवडकांचे व्यक्त होणे पुस्तक किंवा ग्रंथांच्या रूपाने लोकांपुढे येतात.....
   सुहास केशव वेल्हाणकर हे असेच सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्व!
    अल्पावधीतच प्रकाशनाच्या क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या शब्दमल्हार प्रकाशनने एप्रिल २०२४ मध्ये मनाच्या तळीचा पाझर हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला. ७५ कविता, बालकविता, चारोळ्या, दोन-तीन हिंदी रचना या संग्रहात आहेत.
  " सुंदर फुलांच्या बागा जगभर आहेत, म्हणून आपण आपल्या अंगणात बाग फुलवायचीच नाही का..? स्वानंदासाठी केलेल्या कवितांचा हा संग्रह असल्याची पुष्टी प्रस्तावनेत ज्येष्ठ कवी नरेश महाजन यांनी जोडली आहे. 
  शासनाच्या अकाउंट - ऑडिट विभागातून निवृत्त झालेले अधिकारी सुहास वेल्हाणकर यांना वयाच्या पन्नासाव्या वर्षी पहिली कविता सुचली आणि आज ८० व्या वर्षात असताना त्यांचा हा कवितांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. खरंतर रोजचे ऑफिसचे काम, अकाउंट ऑडिट सांभाळणं, शासन निर्णयांचं वाचन - अभ्यास, शासकीय पत्रव्यवहार या सर्वांमुळे दैनंदिन कामाचा नक्कीच ताण वाढू शकतो. यातून मुक्त होण्यासाठी वेल्हाणकरांनी कविता करण्याचा जोपासलेला छंद त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दर्शवतो.
  आशयाच्या अंगाने त्यांच्या कवितांचा विचार केला तर त्यामध्ये विविधता आढळून येते. 
   चांदणे हासते,मंदावली पावले, मनातला मधुबन, प्रीत अशी यांसारख्या कविता सखी बद्दलच्या भावना व्यक्त करणाऱ्या अलवार प्रेम कविता आहेत. तो आणि ती च्या संवादाच्या या कविता आहेत. ती चे वर्णन करताना कवी म्हणतो,
      ओठ तुझे तर चुप्पी साधून 
      लज्जा होती घुंघट ओढून 
      डोळ्यांमध्ये भाव अनामिक
      खेळत होते छापा पाणी ll 

   मध्यमवर्गीयांचे जीवन, साहेब-कारकून आणि शिपाई, सामान्य माणूस आणि नोकरदाराच्या पाचवीला पुजलेला दुःख आसवांचे पूर या कवितेत कवी व्यक्त करतो.
      " बरबाद जीवनाचा शोक करणे व्यर्थ होते 
       शोधणे वादळांचे अर्थ तेही व्यर्थ होते."
   राजकारणी लोकांच्या भूलथापा आणि त्यांना बळी पडणारे सामान्य जन पराभूत प्रेषित मधून दिसतात. जीवावर उठले मधून गरिबांची कुचंबना लक्षात येते. सामान्यांवर होणारा अन्याय आणि त्यांची होणारी मुस्कटदाबी जखमी पक्षी मधून व्यक्त झाली आहे. धूर्त राजकारणी, भ्रष्ट अधिकारी, पुढारी यांवर तिखट टीका कवितेतून कवी करतो.
 अनुभवलेला निसर्ग, बदललेले समाज जीवन, व्यक्ती म्हणून आपल्यात झालेला काळानुरूप बदल, इत्यादी विषयांवर अतिशय संवेदनशील, कधी कधी खेळकर --- मिश्किल शैलीत कवीने आशय मांडला आहे.
   बदललेल्या सामाजिक स्थितीची जाणीव करून देताना कधी म्हणतो, 
      पैसाच प्यार आहे 
      पैसाच यार आहे 
      पैशाविना माणसाची 
      सर्वत्र हार आहे.....
    दुःख आणि हास्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या काही कवितांमधून अनुभवता येतो. उदाहरणार्थ: तेव्हा आणि आता, बाथरूम सिंगर या कविता. 
  आपण या समाजाचे घटक आहोत आणि म्हणून समाजाच्या अधोगतीला आपणच कारणीभूत असल्याची जाणीव कवीला होते.मग कवी स्वतःचीच हेटाळणी करतो. कवी जीवनाचे वास्तव सांगतो. 
  काही कविता अतिशय संवेदनशील असून वाचकांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. समाजात घडणाऱ्या अथवा घडवल्या जाणाऱ्या चोरी,भ्रष्टाचार, बलात्कार इ.घटनांचा धिक्कार कवीने केलेला दिसतो.
  मढ्यांची कैफियत, जगण्याचे वर्म, फाटकी झोळी, चंद्रास चटका, विचित्र स्वप्न इत्यादी कवितांमधून कवीचे समाजभान अवतरले आहे.स्वतःच्या अंत्ययात्रेचे वर्णन करणारी त्यांची कविता वाचकांना नि:शब्द आणि अस्वस्थ करून सोडते.
         पौर्णिमेच्या रात्री...
         माझी चिता जळावी 
         शांत शितल चांदण्याने 
         अखेर तरी सहन व्हावी ll
         ज्वाला चीतेच्या....
         उंच आकाशाला भिडाव्या
         माझ्या जाळणाऱ्या व्यथेने 
         चंद्रालाही चटका द्यावा..ll

गहिरा सागर, मोहरली फुलवेल, बळीराजाचे दुःख, देव दिसावा इत्यादी कवितांतून शेतकरी आणि शेतकऱ्याचे दुःख कवी वर्णन करतो. 
  " भिकेस लावी शेतकऱ्यांना उद्योगाची सेझ 
    सत्तेची सुंदरी सजविते धनवंताची शेज"
काही कवितांतून कवीच्या विनोदी आणि मिश्किल स्वभावाची कल्पना येते..
       पाजणार कोणी आहे 
       म्हणून काय पित सुटावी ?
       जनाची नसली तरी 
       मनाची काही असावी ...! 
पेरीत जावे मनामनातून आनंदाचे गाणे असा कवीचा तरल आशावाद कवितांमधून दिसून येतो.
  नवे शतक म्हणून २१ व्या शतकातील तरुण विद्यार्थी कसा दिशाहीन होत चालला आहे.. त्याचं वर्णन एका कवितेत करताना कवी म्हणतो...
   लहानपणीच डोळ्याला ढापण लावून 
   पाठीवरच्या ओझ्याने कमरेत वाकून 
   पहा तो कसा चालला आहे...
   एकविसाव्या शतकाचा सूर्य तो पाहत आहे...
शाळेचे दिवस, नंदूचे स्वप्न, सारख्या अविट गोडीच्या बालकविता या संग्रहात असून लहान मुलांचे भावविश्व कवीने चपखलपणे साकारलं आहे. 
    नंदू ने मारली ढगांवर उडी 
    विजेची मग कडाडली छडी l 
बदललेल्या सामाजिक स्थिती-गतीचे वर्णन करताना कवी म्हणतो... 
    द्रौपदीने बांधलेल्या चिंधीची
    कृष्णाने लज्जा राखली 
    राखीने नेसलेल्या चिंधीची
    मीडियाने मजा चाखली...
  आपल्या आयुष्याचा संध्या -- काल जवळ येत असताना (वयाच्या ८० व्या वर्षी देखील!) कवीला आईची आठवण झाल्या वाचून राहत नाही. 
  सय आईची मध्ये आई बद्दलच्या अव्यक्त भावनांना कवीने वाट करून दिली आहे.
    किती काळ झाला आई 
    भेटायची राहिली आहे.....
    आत्मा म्हणे अमर असतात 
    इथून गेलेली माणसे स्वर्गात असतात....
या संग्रहात विशेष म्हणजे चार हिंदी कवितांचाही समावेश कवीने केला आहे. मैत्रीचं महत्त्व विशद करताना कवी म्हणतो..
       रब तेरी दुनिया में जीना जरुरी है l
       दोस्तो में तनहा रहू भी तो कैसे ll 
उपमा- उत्प्रेक्षा, गेयता, शाब्दिक आणि व्याकरणिक चमत्कृती, कोपरखळ्या, विनोद, इत्यादींचा अंतर्भाव कवितेतून नजरेस पडतो. 
  वृद्धापकाळाकडे झुकलेल्या कवीच्या कवितेची बाग मात्र साऱ्यांचेच मन प्रफुल्लित आणि टवटवीत करते,हे मात्र खरे !

शैलेश पाटोळे 
नाशिक

नाबाद अर्धशतक : श्री व सौ.नांदुर्डीकर

.                    नाबाद अर्धशतक !!

"अहो ,ऐकलं का? " 
"हो.."
" हो.. काय..!
" अगं ,तू काही बोललीस का ?
"तुम्ही काय ऐकलं मग..?"
" काही नाही."
"मग बोलायचे आधीच हो काय..?
" अगं म्हणजे..!
" म्हणजे काय..???
  पाटा खेळपट्टीवर स्विंग होणाऱ्या गोलंदाजांसमोर नांगी टाकून दिलेल्या फलंदाजांप्रमाणे माझी अवस्था झाली. तिच्या खोचक प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच नेहमीप्रमाणे माझी सारी शस्त्रे खाली टाकून मी सपशेल शरणागती करणे पसंत केले .टीव्हीचा आवाज कमी केला.
  "...अगं काय म्हणत होतीस?"
" जा तिकडेच... तुम्हाला क्रिकेटची मॅच महत्त्वाची ना..? असं म्हणत सौ रागारागात चपातीच्या पिठावर लाटणं फिरवू लागली. आता आपलं काही खरं नाही असं लक्षात आल्यावर मी लाडिकपणे समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागलो. मग कुठे स्वारी ठिकाणावर आली.....
 " काय गं काय सांगत होतीस.?"
" नीट ऐकणार असाल तर सांगते."
" सांग सांग ...बघ टीव्ही देखील बंद केलाय मी." "अहो... नांदुर्डीकरांचा मेसेज होता."
" काय म्हणताय..?"
" त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे." "पन्नासावा..! अगं बाईंचा पन्नासावा वाढदिवस असेल. नीट वाचलास का मेसेज..?"
 " हो.. हो.. लग्नाचाच वाढदिवस..."
"बापरे ..! पन्नास वर्षे आणि तोही लग्नाचा. आश्चर्यच म्हटले पाहिजे.."
" का ..?होऊ नाही शकत का..?"
" तसं नाही... होऊ शकतात.. अगं आजकाल दहा-बारा धावा काढणं कठीण होत असताना श्री व सौ नांदुर्डीकरांनी चक्क अर्धशतक ठोकलं... याचं आश्चर्य वाटतं...
सौ स्वयंपाकात आणि मी क्रिकेटच्या विश्वात रममाण झालो .सोफ्यावर लोळत सामना पाहण्यात दंग झालो. 
      नाबाद ५० ...लग्नाचा सुवर्ण महोत्सव..!म्हणायला सोपं आहे;पण प्रत्यक्षात हे कसं जमलं असेल ….मन भुतकाळात रमलं.श्री व सौ नांदुर्डीकरांची पहिली भेट कधी झाली असेल...? आठवलं... ज्योतिष विषयक सल्ला घेण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांना भेटलो. अतिशय शांत मितभाषी, स्पष्ट उच्चार असलेले श्री.नांदुर्डीकरांशी संवाद साधला. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालो. सौ नांदुर्डीकर माझ्या संस्थेतील एका शाळेतून संस्कृत शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या.बाई थोड्याशा अघळ - पघळ..पण निर्मळ अंत:करण्याच्या. गप्पा मारणे, आलेल्याचें स्वागत करणे, स्वतः बनवलेली व्यंजने खाऊ घालणं... हा त्यांचा खास छंद!  घरामध्ये तसेच ते दोघेच; परंतु घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न.खुर्च्या,टीपॉय त्यावर वर्तमानपत्रं, पुस्तकं , सारं कही नीटनेटकं मांडलेलं.बैठकीत एका कोपऱ्यात अतिशय स्वच्छ एकावर एक रचून ठेवलेली तांब्याची भांडी.. येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेणारे.. दरवाज्यापाशी काढलेली रेखीव रांगोळी, स्वतःच्या बागेतली जास्वंद, चाफ्याची फुले फुललेली. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद भरभरून वाहतोय.दुःखाचा लवलेश नाही. खरं म्हणजे पहिल्याच भेटीत या दांपत्याने आपलंसं करून टाकलं. त्यांनी वर्तवलेले अंदाज पुढे खरे ठरले..! विद्यार्थी जसं प्रश्नाचे उत्तर नाही मिळालं की गाईड चाळतात. तसे आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाले की, नांदुर्डीकरांच्या "वरद" बंगल्यात जाऊन उत्तर शोधायची सवयच जडली! त्यांच्या आपुलकीच्या शब्दांत सारी दुःखं विसरायला होतात. शेवटी घरातून निरोप घेताना बाई चाफ्याची चार फुलं ओंजळीत टाकायला कधीच विसरत नाहीत.. थोडक्यात काय..आचार,विचार आणि सहवासाने सुगंधित व्हायला होतं त्यांच्या सहवासाने....!
 हळूहळू परकेपणा कमी झाला. आधार शोधण्याच्या त्यांच्या वयात आम्हालाच त्यांचा आधार वाटू लागला. न चिडता.. रागावता, अतिशय संयमाने, संस्काराने परिपूर्ण श्री व सौ नांदुर्डीकरांच्या लग्नाला पन्नास वर्षे झाली.पन्नास वर्षे एकमेकांशी नातं टिकून राहणं हे खरंतर आजच्या युगात सन्मानजनक आहे. एकमेकांची काळजी करत... समजून घेत, आवड -  निवड जपत, एकमेकांसाठी आयुष्य वेचत जगणं याचा आदर्श म्हणजे श्री व सौ नांदुर्डीकर जोडपं !इतकी वर्षे एकत्र राहणं म्हणजेच एकमेकांच्या स्वभावात परिवर्तन होत असताना एकात दुसऱ्याने मिसळून जाणं .वाटतं एवढी वर्षे लग्न टिकून राहणं म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.
    धार्मिक परंपरा, रीतिरिवाज, संस्कार, कुळाचार,  पूजा - अर्चा  उत्साहाने करणारं असं दांपत्य सापडणं कठीण..!  ३६ गुण जुळणाऱ्यांचाही संसार छत्तीसच्या आकड्यासारखाच असतो..! मग श्री व सौ नांदुर्डीकरांचे किती गुण जुळले असतील..? सहज प्रश्न पडतो.आकाशातल्या ग्रहताऱ्यांचा किती परिणाम माणसावर होतो माहित नाही... तो संस्कार असावा लागतो.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारा." शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी..." म्हणतात ना.. अगदी तसा. संस्कारशील कुटुंबातून दोघेही असल्याने हा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं  भाग्य त्यांना लाभलं आहे, असे निश्चितपणे वाटतं.
  श्री.प्रकाश नांदुर्डीकर तसे नाशिकच्या निफाड तालुक्यातीलच; परंतु वडिलांच्या साखर कारखान्यातील नोकरीमुळे त्यांचं बालपण आणि शिक्षण नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे गेलं .आई-वडिलांप्रमाणेच शाळेतील गुरुजनांचे उत्तम संस्काराने ते घडत गेले.वाचनाची, शुद्धलेखनाची आवड निर्माण करणाऱ्या गंधे गुरुजी आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने इतिहास शिकवणाऱ्या ना.वि. जोशी सरांचा पगडा आजही त्यांच्या मनावर कायम आहे. सहा भाऊ आणि दोन बहिणी, आई-वडील असा त्यांचा परिवार. पुढे थोरल्या बंधूंना रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नागपुरात नोकरी मिळाल्याने श्री नांदुर्डीकरांचे पुढील शिक्षण नागपुरात झाले. फलटणच्या महाविद्यालयात त्यांना शिक्षणाची संधी मिळाली. प्राचार्य राम शेवाळकरांना ,प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना तसेच अनेक दिग्गज शिक्षकांना ऐकता आलं.पुढे उल्हासनगरच्या महाविद्यालयातून त्यांनी प्राणिशास्त्रातून बी.एससी. पदवी उत्तीर्ण केल्यावर महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागात फिशरी स्कूलमध्ये मुख्याध्यापकाची नोकरी त्यांना मिळाली. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीच्या निमित्ताने भ्रमंती करण्याचा योग आला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने काटकसरीची सवय लागली. नोकरीत भ्रमंती करत असताना माणसांचे स्वभाव जवळून अनुभवता आले. "सार सार को ग्रही लै,और थोथा देई उडाय l ", या कबीराच्या वचनाप्रमाणे जे जे चांगले त्याचा स्वीकार व वाईटाचा त्याग त्यांनी केला.अतिशय प्रामाणिक व अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. "साधेपणा " हा त्यांच्या सर्वात अनमोल असा गुण.. जो अलीकडच्या अधिकाऱ्यांमध्ये क्वचितच पहायला मिळतो ! नोकरीच्या निमित्ताने भेटलेले वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशीही त्यांचे स्नेहाचे संबंध राहिले. श्री. सुरेश कुलकर्णी,श्री. श्रीनिवास जडे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी मार्गक्रमण केले. गुरुतुल्य प्रभाकर कुलकर्णी यांचा खरा आधार त्यांना लाभला. नोकरीतल्या खाचा - खोचा  त्यांच्यामुळेच कळल्या... उत्तम आणि प्रामाणिक नोकरीचा संस्कार, त्यांनीच केला. त्यांच्याशी झालेली भेट म्हणजे खरे तर ईश्वरी प्रसादच..! अतिशय कर्तृत्ववान आणि दिशादर्शक असलेले श्री.शेळके साहेब, श्री रांगणेकर, श्री.देसाई यांचे ऋण कधीच न विसरता येण्यासारखे..!  श्री.चव्हाण आणि श्री.पंडोरे  शासकीय वाहनांचे ड्रायव्हर ; परंतु त्यांच्याशी असलेले नाते देखील जिव्हाळा निर्माण करणारे असेच..! " जशी दृष्टी तशी सृष्टी",यानुसार श्री नांदुर्डीकरांना सर्वांमध्ये केवळ चांगलेच दिसते. माणूस जोखण्याची  विवेकबुद्धी त्यांचे जवळ आहे. माणूस आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांमुळे घडत किंवा बिघडत जातो. Man is known by the company he keeps. नुसार ते कायम उत्तमाच्या सानिध्यात वावरले. तसे ते घडत गेले.  "राजा शिवछत्रपती " हे बाबासाहेब पुरंदरेंचं पुस्तक इयत्ता आठवीत असताना त्यांनी वाचलं.विचारांना दिशा देणाऱ्या या पुस्तकाचा विशेष प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाला.
  २४ जून १९७४  रोजी श्री.प्रकाश नांदुर्डीकर यांचा विवाह वाईच्या सदावर्ते घराण्यातील कुमुद (शुभांगी) यांच्याशी झाला. सहा बहिणी आणि दोन भावांच्या कुटुंबात कुमुद सर्वात सर्व बहिण भावंड त्यामुळे शिक्षणाचा वारसा त्यांना कुटुंबाकडूनच लाभला होता.एकत्र कुटुंबात वाढलेल्या शुभांगी संस्कारशील,धार्मिक आणि शेतकरी कुटुंबातून आल्या असल्याने जगण्यातील उन्हाळे आणि पावसाळे सहन करण्याची सहनशीलता उपजतच त्यांच्यात होती.त्यांची आई गृहिणी... साक्षात अन्नपूर्णाच ! तोच संस्कार सौ. नांदुर्डीकरांमध्ये अवतरला आहे.सुग्रास, नाविन्यपूर्ण स्वयंपाक ही बाईंची खरी ओळख. पत्नीला एका अर्थाने अर्धांगिनी म्हटलं जातं.त्यानुसार सासरकडच्या मंडळींच्या सुखदुःखात त्या पतीबरोबर समरस झाल्या. नोकरीच्या निमित्ताने बदलीच्या गावी त्यांनी जमेल त्या परिस्थितीत आनंदाने संसार केला. जेथे जात तिथे संसाराला हातभार लावण्यासाठी त्या नोकरी करीत. सासू-सासर्‍यांचे विशेष प्रेम त्यांना लाभलं. त्यांनी सुनेला शिक्षणासाठी कायमच प्रोत्साहन दिलं .मदत केली. सुनेने बी.एड. करावं म्हणून सासर्‍यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी सात-आठ किलोमीटर पायी चालत जाऊन कोल्हापूरला  सुनेचा फॉर्म भरला ! आजकाल असे चित्र पाहायला मिळेल का ? वाईला शाळेत असताना काशीताई नातू या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकेच्या मार्गदर्शनाखाली बाईंची जडणघडण झाली. शिक्षणानंतर १९९० मध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीत शिक्षिका म्हणून त्यांना नोकरीची संधी मिळाली.या काळात श्रीमान एस.के.कुलकर्णी, श्रीमान का.विं.जोशी,श्रीमान एम .पी.कुलकर्णी यांचे एक संस्कारशील व अभ्यासू शिक्षिका घडविण्यात मोलाचे योगदान लाभले. मराठी संस्कृत आणि भूगोल या विषयांचे मार्गदर्शन बाई करीत.संस्थेच्य ति.झं. विद्यामंदिर भगूर आणि डी.एस.कोठारी कन्या शाळेत अठरा वर्षे नोकरी करून २००७ साली बाई सेवानिवृत्त झाल्या. घरदार ,सासू-सासरे, मुलगा, शाळा अशी तारेवरची कसरत बाईंनी यशस्वीपणे केली.शारीरिक थकल्या तरी मनाने त्या कधी थकलेल्या वाटत नाहीत .शालेय जीवनापासून त्यांना खेळाची आवड.. नवनवीन पाककृती करणे... स्वयंपाकात नवनवीन प्रयोग हे त्यांचे आवडीचे छंद. लोकांना गरजवंतांना अडचणीच्या काळात मदत करणं, लोकसंग्रह करणे, याची त्यांना खास आवड. सेवानिवृत्तीनंतरही त्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांत सहभागी घेत राहिल्या. गजानन महाराज मंदिर, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळ, संस्कार वर्ग, इत्यादी उपक्रमांत त्या सक्रिय सहभागी होतात. एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक होता. एका सामाजिक संस्थेने त्यांचा आदर्श शिक्षिका म्हणून गौरव केला.इतक्या सर्व कामांमध्ये सक्रिय राहिल्याने त्या सदैव उत्साही दिसत असाव्यात..!  त्यांचा एकुलता एक मुलगा मनीष उच्चशिक्षित असून पत्नी वैशाली आणि मुलगी गौरीसह पुण्यात स्थायिक झाले आहेत.
 सतत वाहणारी नदी जशी स्वच्छ आणि निर्मळ असते तसेच सतत काळांनुरूप, परिस्थितीनुरूप स्वतःमध्ये आवश्यक तो बदल करून घेतल्याने श्री व सौ नांदुर्डीकर सुखी, समाधानी, आनंदी,निर्मळ दिसून येतात ! काळाबरोबर चालण्याची नुसती इच्छा असणं आणि प्रत्यक्ष तसं करण यातलं अंतर त्यांनी पार केलं आहे. श्री.नांदुर्डीकर यांचा ज्योतिष शास्त्राचा दांडगा व्यासंग आहे. " जे जे आपणासी ठावे l  तें तें लोकांशी सांगावे l  शहाणे करोनी सोडावे l  सकळ जण l  या उक्तीप्रमाणे आपल्या व्यासंगातून ते लोकांना सहाय्य करीत असतात.
  येत्या २४ जून रोजी त्यांच्या सहजीवनाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. परिपक्वता, रसरशीतपणा, नाविन्याची ओढ, भावनांचे बंध आणि शारीरिक म्हातारपणास ठामपणे दूर ठेवण्याची ताकद अशा बळकट पायांवर त्यांच्या आयुष्याची बळकट इमारत उभी आहे. श्री व सौ नांदुर्डीकरांच्या स्वभावात अनेक बाबतीत साम्य आढळून येते. वाचन, पूजाअर्चा, धार्मिक व्रतवैकल्ये, स्वच्छता, नीटनेटकेपणा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, लोकसंग्रहाची आवड, इत्यादी अनेक बाबी दोघांच्याही मिळत्या -  जुळत्या आहेत. आकाशस्त ग्रहताऱ्यांच्या मिलनापेक्षा मला वाटते हे साधर्म्य फार महत्त्वाचे असते... नाही का..? विवाहाचा सुवर्ण महोत्सव साजरा केल्याबद्दल उभयतांचे हार्दिक अभिनंदन !  दोघांनाही सहस्रचंद्र दर्शन लाभो हीच सदिच्छा! 
  खरंतर आजकालच्या तकलादू होड्यांना नांदुर्डीकरांच्या होडीकडे बघून जीवनसागर पार करायची जिद्द येओ, ही अपेक्षा...
  " जीवनात ही घडी अशीच राहू दे..
  प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे..." 
  या यशवंत देवांच्या यमन रागातील गीताप्रमाणे श्री व सौ नांदुर्डीकरांचे सहजीवन असेच वृद्धिंगत होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
  पुनश्च एकवार विवाह सुवर्ण महोत्सवाबद्दल उभयतांचे हार्दिक अभिनंदन!

शैलेश अशोक पाटोळे
                   नाशिक
          २४ जून २०२४

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...