Saturday, March 21, 2026

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                    “तंबूपासून ताजमहालापर्यंत”
                  ------------------------

  “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन सांगते—चालत राहा, अनुभव घेत राहा; कारण प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे, तर मनाचा, विचारांचा आणि अनुभवांचा विस्तार होय. शाळेच्या चौकटीबाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात जे शिक्षण मिळते, ते पुस्तकांत सापडत नाही. प्रवास म्हणजे अनुभवांची शिदोरी, आठवणींचा खजिना आणि मैत्रीचे रंग अधिक गडद करणारी एक सुंदर प्रक्रिया असते.
हिरवीगार झाडे, शांत वातावरण आणि मुक्त हवा — या सगळ्यांत एक वेगळाच आनंद असतो.
  नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांतील स्काऊट आणि गाईडचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि काही समाजाभिमुख, मित्रत्वाने वागणारे शिक्षक यांना अशीच एक सुंदर संधी मिळाली. हरियाणा राज्यातील गद्पुरी येथील स्काऊट आणि गाईड नॅशनल ट्रेनिंग सेंटर येथे निसर्ग निवास शिबिरासाठी जाण्याचा योग आला. संत तुकाराम म्हणतात —
“जग पाहता पाहता, वाढे ज्ञानाची सीमा.”
असा ज्ञान, अनुभव आणि आनंद देणारा हा प्रवास अविस्मरणीय ठरला.
कॅम्पला निघताना एका विद्यार्थ्याने मित्राला विचारले..
“अरे, तिकडे मोबाईल चालेल ना?”
मित्र लगेच म्हणाला —
“मोबाईल चालेल की नाही माहीत नाही… पण आपण मात्र नक्की चालणार!”
आणि मित्रांच्या कंपूत हास्यकल्लोळ सुरू झाला..
प्रवासाची सुरुवात नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून झाली.स्टेशनवर विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून एका शिक्षकांनी हसत विचारले —
“काय रे, एवढा उत्साह कशाचा?”
एक विद्यार्थी म्हणाला —
“सर, पाच दिवस अभ्यास नाही ना!”
सगळीकडे हशा पिकला.
इतक्यात घोषणा झाली —
“गाडी उशिरा येणार आहे.”
एकाने त्यावर कोटी केली —
“सर, कॅम्प सुरू होण्याआधीच संयमाचा धडा सुरू झाला!”
दुसरा म्हणाला —
“रेल्वे उशिरा येईल म्हणजे आपण स्टेशनचे पर्यटन करूया!”
 प्रवासात थोडा ‘नाट्यमय’ रंग भरला तो रेल्वेच्या उशिरामुळे!रेल्वे उशिरा येणार असल्याची घोषणा झाली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता उमटली. पालकांच्या चेहऱ्यावर काळजीची रेषा, तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्कंठेची चमक.
“वाट पाहणे ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे” याचा अनुभव त्या दिवशी प्रत्येकाला आला.
स्टेशनवरील प्रत्येक फलक वाचून झाले.
जाहिराती, वेळापत्रक, सूचना — काहीच उरले नाही!
कोणी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे निरीक्षण करत होते.मुलांमुलींच्या गप्पा, विनोद, थट्टामस्करी… सगळे काही झाले.
कोणी जाहिराती वाचत होते.
कोणी प्रवाशांचे निरीक्षण करत होते.
एक विद्यार्थी फलाटावर झोपलेल्या कुत्र्याकडे पाहून म्हणाला —
“बघा, याला मात्र गाडी उशिरा आली तरी काही फरक पडत नाही.”
मित्र म्हणाला —
“तो अनुभवी प्रवासी असावा!”
गप्पा टिंगल टवाळी करून मुलं वेळ घालवत होते...
 स्टेशनवर विद्यार्थ्यांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता. प्रत्येकाच्या डोळ्यांत नवे स्वप्न, नवा अनुभव आणि नव्या ठिकाणाचे कुतूहल चमकत 
इतक्यात अचानक घोषणा झाली —
“गाडी काही क्षणांत येत आहे.”
क्षणात सगळीकडे धावपळ सुरू झाली. बॅगा उचलल्या, रांगा लावल्या आणि अखेर सगळेजण डब्यात बसले. पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
गाडी हळूहळू पुढे सरकू लागली…
आणि प्रवासाची खरी सुरुवात झाली.
  रेल्वे प्रवास म्हणजे एक छोटासा संसारच असतो. काही तासांतच अनोळखी लोकही ओळखीचे होतात.डब्यात गप्पांची मैफल रंगली.कोणी गाणी म्हणत होते.कोणी पत्ते खेळत होते.
कोणी खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहत होते.
खिडकीतून धावत जाणारी शेते, झाडे, लहान गावे — जणू निसर्ग स्वतःच चित्रफीत दाखवत होता.
“प्रवास हा माणसाला नम्र बनवतो” असे म्हटले जाते. कारण प्रवासात माणूस जगाचे विविध रूप पाहतो.
मौज, मजा, गप्पा आणि थोडीशी झोप — अशा वातावरणात कधी प्रवास संपला ते कळलेच नाही.
गदपुरी – निसर्गाच्या कुशीतले सुंदर ठिकाण !
गदपुरी येथे पोहोचल्यावर जणू निसर्गानेच सर्वांचे स्वागत केले.
   शहराच्या गोंगाटापासून थोडे दूर असलेले हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य होते. शांत, प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण.सुमारे वीस - बावीस एक रात पसरलेला विस्तीर्ण कॅम्पस पाहून सर्वजण थक्क झाले.भक्कम आणि नीटनेटके तंबू पाहून विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. 

हिरवीगार झाडे, शांत वातावरण आणि मोठे कॅम्पस पाहून एका विद्यार्थ्याने म्हटले —
“अरे वा! हे ठिकाण तर अगदी चित्रपटात दाखवतात तसं आहे!”
दुसरा म्हणाला,“हो, पण इथे आपल्यालाच काम करावं लागणार आहे!”
तंबू पाहून काही विद्यार्थ्यांनी विचारले —
“सर, इथेच राहायचं का?”
शिक्षक हसून म्हणाले —“हो, आणि स्वतःची कामे स्वतः करायची!”
एक विद्यार्थी हळूच म्हणाला —“म्हणजे आईची आठवण येणार!”
प्रत्येक तंबू व्यवस्थित, स्वच्छ आणि सुरक्षित होता.कॅम्प साइटवर कार्यरत कर्मचारी वर्ग अतिशय विनम्र आणि प्रेमळ होता. मुलांच्या प्रत्येक गरजेची काळजी ते मनापासून घेत होते. मुला-मुलींसाठी सुरक्षित वातावरण पाहून शिक्षकांनाही दिलासा मिळाला.फेब्रुवारी महिन्याची गुलाबी थंडी आणि सकाळचा गार वारा — वातावरण अधिकच प्रसन्न करत होता.कॅम्पचे प्रभारी अधिकारी मोहंती सर अतिशय शिस्तप्रिय आणि सुस्वभावी होते.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळेच आकर्षण होते. ते कठोर शिस्त पाळत होते, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे संवादही साधत होते.
“शिस्त ही यशाची पहिली पायरी आहे” हे त्यांनी आपल्या वर्तनातूनच दाखवून दिले.
कॅम्पमधील स्वयंपाकघर अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटके होते.चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पौष्टिक आणि चविष्ट अन्नामुळे मुलांना घरची आठवण फारशी आली नाही.
या सर्वांमध्ये ज्यांनी आम्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले अशी एक विशेष व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील श्री.मच्छिंद्र भाऊ. सर्व मुलांचे मदतनीस. स्वभाव अतिशय प्रेमळ आणि आपुलकीचा होता. मुलांची काळजी ते अगदी घरच्यांसारखी घेत होते.“सेवा हीच खरी पूजा” हे त्यांचे ब्रीदवाक्य असल्यासारखे वाटत होते.
कॅम्पमधील पाच दिवस म्हणजे जणू साहस आणि आनंदाची मेजवानीच होती.
रोप क्लाइंबिंग - उंच दोरीवर चढताना सुरुवातीला थोडी भीती वाटत होती. पण शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनी धाडसाने हा उपक्रम पूर्ण केला.“धाडस केल्याशिवाय विजय मिळत नाही” हे या अनुभवातून शिकायला मिळाले.
रोप क्लाइंबिंग सुरू झाले.दोरी पाहून एका विद्यार्थ्याने विचारले —“सर, ही इतकी उंच आहे का?”
प्रशिक्षक हसत म्हणाले —
“उंच नाही… तुमचं धाडस मोठं असलं पाहिजे!”
पहिला विद्यार्थी वर चढू लागला.खाली उभा असलेला मित्र ओरडला —
“अरे, पडू नको… माझा फोटो अजून काढायचा आहे!” पुन्हा हशा पिकला.
सायकलिंग- कॅम्प परिसरात सायकलिंग करताना जणू स्वातंत्र्याची अनुभूती मिळत होती.गार वारा, हिरवळ आणि मित्रांची साथ — हा अनुभव अविस्मरणीय होता.घोडेस्वारी - घोड्यावर बसण्याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच होता. सुरुवातीला भीती वाटली; पण नंतर तोच अनुभव सर्वात आनंददायी ठरला.
घोड्यावर बसताना एक विद्यार्थी थोडा घाबरला.
तो म्हणाला —“सर, हा घोडा शांत आहे ना?”
प्रशिक्षक म्हणाले —“घोडा शांत आहे… पण तू शांत राहा!”
घोडा चालू लागला.विद्यार्थी म्हणाला —
“अरे वा! आता मी खरा रायडर झालो!”
नाईट सफारी - रात्रीच्या अंधारात जंगलातील फेरफटका म्हणजे एक रोमांचक अनुभव होता.चंद्रप्रकाश, शांतता आणि निसर्गाची गूढता — या सर्वांनी वातावरण जादुई बनवले.रात्री जंगलात फेरफटका होता.
एक विद्यार्थी मित्राला हळू आवाजात म्हणाला —
“अरे, आवाज ऐकू येतोय का?”
मित्र म्हणाला,“हो… पण घाबरू नको.”
तो विचारतो —“का?”
मित्र म्हणतो —“कारण मीही घाबरलोय!” अशाही स्थितीत अनेकांना हसू आवरले गेले नाही.
कॅम्पमध्ये अनेक प्रकारचे खेळ आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्व आणि आत्मविश्वास वाढला.
   कॅम्पमध्ये मोबाईल आणि कुटुंबापासून दूर राहावे लागले.सुरुवातीला थोडीशी घरची आठवण आली. पण हळूहळू सर्वजण त्या वातावरणात रमून गेले.
स्वतःची कामे स्वतः करणे, वेळेचे नियोजन करणे आणि इतरांबरोबर मिळून काम करणे — हे सर्व अनुभव विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवत होते.
“स्वावलंबन हेच खरे स्वातंत्र्य” ही म्हण येथे खरी ठरली.
कॅम्प परिसरात अनेक सुंदर ठिकाणे पाहायला मिळाली.हिरवीगार झाडे, फुलांनी सजलेले बगीचे, स्वच्छ रस्ते आणि शांत वातावरण — या सर्वांनी मन प्रसन्न झाले.प्रत्येक ठिकाण जणू निसर्गाच्या कलेचे एक सुंदर चित्र होते.
मुलं मुली नव्या मित्रांना निरोप देताना भावुक झाले होते.शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान होते—कारण या पाच दिवसांत विद्यार्थ्यांनी केवळ खेळ केले नाहीत, तर जीवनाचे धडे शिकले होते.
  निसर्गनिवास शिबिरादरम्यान गदपुरीहून जवळ असलेल्या अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाणांना भेट देण्याचा सुंदर योग आला. या प्रत्येक स्थळाचे वेगळे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे.
   उत्तर भारतातील ऐतिहासिक वारसा जपणारे शहर म्हणजे आग्रा. मुघलकालीन वैभव, प्राचीन वास्तुकला आणि इतिहासाच्या आठवणी जपणारे हे शहर भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानले जाते.
या शहरात उभा असलेला ताज महाल म्हणजे जणू प्रेमाचे अमर स्मारकच आहे. शुभ्र संगमरवरी दगडांत घडवलेले हे अप्रतिम सौंदर्य जणू चंद्रप्रकाशात न्हालेल्या स्वप्नासारखे भासते. मुघल सम्राट शहाजहानने आपल्या प्रिय पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ उभारलेली ही वास्तू प्रेम, समर्पण आणि शाश्वत सौंदर्य यांचे प्रतीक मानली जाते. सूर्योदयाच्या मंद किरणांत किंवा संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात ताजमहालाचे रूप जणू स्वर्गीय भासते. म्हणूनच जगभरातील पर्यटक या अद्भुत कलाकृतीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. आग्र्याचा प्रसिद्ध पेठा आणि दही वडा खाल्ल्याशिवाय परतणे अशक्य होते.
   दिल्लीच्या मध्यभागी अभिमानाने उभे असलेले इंडिया गेट हे भारताच्या शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. प्रथम महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेले हे भव्य स्मारक प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर आणि कृतज्ञतेची भावना जागवते.या स्मारकाखाली प्रज्वलित असलेली अमर जवान ज्योती जणू राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांच्या स्मृतीचे अखंड तेज दर्शवते. संध्याकाळच्या प्रकाशात इंडिया गेटचे रूप आणखी भव्य दिसते आणि ते पाहताना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते. 
    भारताची राजधानी असलेले दिल्ली हे शहर इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा अद्भुत संगम आहे. येथे प्राचीन काळापासून अनेक साम्राज्यांनी राज्य केले आणि त्यामुळे या शहरात विविध संस्कृतींचे रंग मिसळले आहेत.दिल्लीतील प्रसिद्ध बाजारपेठ म्हणजे चांदणी चौक. मुघलकालीन वैभवाची साक्ष देणारी ही बाजारपेठ आजही उत्साहाने गजबजलेली असते. अरुंद रस्ते, रंगीबेरंगी दुकाने, सुगंधी मसाले, पारंपरिक मिठाया आणि असंख्य लोकांची वर्दळ — या सगळ्यामुळे चांदणी चौक जणू एक जिवंत सांस्कृतिक चित्रच वाटते.
येथे खरेदी करताना आणि फिरताना जणू इतिहासाच्या पानांमध्ये फिरत असल्याची अनुभूती येते.दिल्लीतील आणखी एक भव्य ऐतिहासिक वास्तू म्हणजे कुतुब मिनार. सुमारे ७३ मीटर उंच असलेला हा मनोरा भारतातील सर्वात उंच प्राचीन मनोऱ्यांपैकी एक आहे.लाल आणि पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेला हा मनोरा जणू आकाशाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत उभा आहे असे वाटते. त्यावरील नाजूक नक्षीकाम आणि कुराणातील आयतींची कोरीव अक्षरे त्या काळातील वास्तुकलेची उत्कृष्टता दर्शवतात.
कुतुब मिनार केवळ एक मनोरा नसून तो भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे.
वृंदावन
   भगवान श्रीकृष्णाच्या बाल लीलांनी पावन झालेले पवित्र स्थळ म्हणजे वृंदावन ! येथे असंख्य मंदिरे, भक्तीमय वातावरण आणि सतत ऐकू येणारे भजन-कीर्तन यामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक आनंदाने भरलेला वाटतो.येथील मंदिरे, घाट आणि अरुंद गल्ल्या जणू श्रीकृष्णाच्या कथा सांगत असतात. भक्तांच्या श्रद्धेने भारलेले हे ठिकाण मनाला शांतता आणि समाधान देणारे आहे. येथे कांदा-लसूण न घालता देखील स्वयंपाक पौष्टिक आणि चविष्ट होऊ शकतो, याची अनुभूती आली.
   भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला ते पवित्र स्थान म्हणजे मथुरा. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी हे एक मानले जाते.येथील मंदिरांचा घंटानाद, भक्तांची गर्दी आणि धार्मिक वातावरण मनाला भक्तिभावाने भारून टाकते. मथुरेच्या पवित्र भूमीत फिरताना जणू हजारो वर्षांचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मथुरेतील चविष्ट पेढ्यांचा स्वाद चाखण्याचा मोह आवरता आला नाही.
या सर्व स्थळांना दिल्याचा पुरावा म्हणजे सर्वांनी काढलेले मनसोक्त फोटो !
   या सर्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देताना भारताच्या समृद्ध परंपरेची आणि विविधतेची जाणीव प्रकर्षाने झाली. प्रत्येक ठिकाण जणू इतिहासाची एक जिवंत कथा सांगत होते.
या सहलीमुळे केवळ निसर्गाचा आनंदच नाही, तर भारताच्या महान इतिहासाची आणि सांस्कृतिक वैभवाचीही सुंदर ओळख झाली.

दिल्लीच्या ऐतिहासिक वैभवाचा मुकुटमणी मानला जाणारा लाल किल्ला पाहण्याचा योग या सहलीदरम्यान आला, आणि तो क्षण खरोखरच अविस्मरणीय ठरला. लालसर दगडांनी उभारलेली ही भव्य वास्तू जणू भारताच्या वैभवशाली इतिहासाची आणि पराक्रमाची एक जिवंत साक्षच आहे.
सतराव्या शतकात मुघल सम्राट शहाजहानने उभारलेला हा किल्ला केवळ एक संरक्षणात्मक वास्तू नाही; तो भारताच्या राजकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. लाल दगडांच्या उंच तटबंदीवरून फिरताना जणू भूतकाळातील अनेक ऐतिहासिक घटना आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
किल्ल्याच्या विशाल प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच त्याचे आखीव-रेखीव बांधकाम, मजबूत तटबंदी, सुंदर कमानी आणि नाजूक कोरीव काम पाहून मन थक्क होते. प्रत्येक भिंत, प्रत्येक दालन आणि प्रत्येक अंगण जणू एखादी ऐतिहासिक कथा सांगत असल्यासारखे भासते.या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ती ऐतिहासिक जागा जिथून भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला स्वर संपूर्ण जगभर दुमदुमला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी याच किल्ल्याच्या भव्य तटावर उभे राहून देशाला उद्देशून पहिले स्वातंत्र्यदिनाचे भाषण केले. त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची ज्योत पेटवते.
त्या ठिकाणी उभे राहताच जणू इतिहासाचे प्रतिध्वनी कानात घुमू लागतात — स्वातंत्र्याची घोषणा, जनतेचा उत्साह आणि नव्या भारताच्या स्वप्नांची सुरुवात. त्या क्षणांचे स्मरण करताना मनात एक वेगळीच भावनांची लहर उसळते.लाल किल्ल्याची उंच तटबंदी जणू देशाच्या पराक्रमाची आणि स्वाभिमानाची प्रतीकात्मक भिंत आहे. या तटांवरून अनेक साम्राज्यांचे उत्थान-पतन पाहिले गेले आहे. अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत आणि अनेक पिढ्यांनी आपल्या इतिहासाची साक्ष येथे अनुभवली आहे.आजही प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान याच किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित करतात. त्यामुळे लाल किल्ला केवळ ऐतिहासिक स्मारक नाही; तो भारताच्या स्वातंत्र्याची, एकतेची आणि लोकशाहीची जिवंत परंपरा आहे.या भव्य वास्तूचे दर्शन घेताना विद्यार्थ्यांच्या मनात अभिमान, आदर आणि कुतूहल या तिन्ही भावना एकत्र जागृत झाल्या. इतिहासात वाचलेली ही जागा प्रत्यक्ष पाहताना जणू आपणही त्या महान ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झालो आहोत अशी अनुभूती सर्वांना आली.
खरंच, लाल किल्ल्याची भेट म्हणजे केवळ एका किल्ल्याचे दर्शन नाही; ती भारताच्या स्वातंत्र्याचा, पराक्रमाचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा भव्य, तेजस्वी आणि प्रेरणादायी अनुभव आहे.
   दिल्लीतील विविध ऐतिहासिक स्थळांना भेट देताना एक असा क्षण आला की,ज्याने संपूर्ण सहलीला जणू एक वेगळेच वैभव आणि अभिमानाचे रूप प्राप्त झाले. तो क्षण म्हणजे भारताच्या राष्ट्रजीवनाचे प्रतीक असलेल्या भव्यदिव्य राष्ट्रपती भवन या वास्तूचे प्रत्यक्ष दर्शन.दिल्लीच्या रायसीना टेकडीवर उभे असलेले हे भव्य भवन पाहताना प्रथमदर्शनीच मनात आश्चर्य, अभिमान आणि आदर या तिन्ही भावना एकाच वेळी जागृत होतात. लालसर दगडांनी उभारलेली ही विशाल वास्तू जणू भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याची आणि परंपरेची जिवंत साक्ष देत अभिमानाने उभी आहे.राष्ट्रपती भवनाच्या परिसरात प्रवेश करताना सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ती काटेकोर सुरक्षा व्यवस्था. देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या राष्ट्रपतींचे निवासस्थान असल्यामुळे येथे असलेली सुरक्षा यंत्रणा अत्यंत दक्ष आणि शिस्तबद्ध आहे. प्रत्येक पावलागणिक जाणवणारी ती सजगता जणू राष्ट्राच्या सुरक्षिततेची शांत पण प्रभावी हमी देत असते.भवनाचे भव्य प्रवेशद्वार ओलांडताच जणू इतिहासाच्या विशाल दरवाज्यातून आपण एका नव्या कालखंडात प्रवेश करतोय असे वाटते. विशाल सभागृहे, उंच कमानी, आणि भिंतींवर केलेले अप्रतिम कोरीवकाम — हे सर्व पाहताना भारतीय वास्तुकलेची सौंदर्यपरंपरा डोळ्यांसमोर उभी राहते.राष्ट्रपती भवनातील प्रत्येक दालन जणू भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाची कथा सांगत असते. भिंतींवर सजवलेली जुनी चित्रे आणि पेंटिंग्ज पाहताना इतिहास जणू रंगांच्या रूपाने जिवंत झाल्यासारखा भासतो. अनेक ऐतिहासिक प्रसंग, राष्ट्रीय चळवळीचे क्षण आणि देशाच्या नेतृत्वाचा प्रवास या चित्रांतून जणू आपल्याशी संवाद साधू लागतो.विशेषतः लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे अशोक मंडप. उंच घुमट, भव्य सजावट आणि गंभीर पण आकर्षक वातावरण यामुळे या मंडपात उभे राहिल्यावर मनात एक वेगळेच दैदिप्यमान भाव निर्माण होतो. येथे अनेक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय समारंभ पार पडले आहेत. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताचे स्वातंत्र्य घोषित केले, हे याच भवनातून... हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले.म्हणूनच या ठिकाणी उभे राहताना जणू इतिहासातील अनेक महत्त्वाच्या क्षणांचे आपणही साक्षीदार झालो आहोत,अशी भावना मनात दाटून येते.
  याच भवनात भारताच्या विविध राष्ट्रपतींनी आपली कार्यकाळे पार पाडली आहेत. त्या सर्वांच्या आठवणी जपणारी छायाचित्रे आणि नोंदी पाहताना देशाच्या लोकशाही प्रवासाचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक राष्ट्रपतीने आपल्या कार्यकाळात देशाच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान जणू त्या भिंतींच्या शांततेतही जाणवत राहते.राष्ट्रपती भवनाबाहेरील विस्तीर्ण उद्यान हेही तितकेच आकर्षणाचे केंद्र आहे. रंगीबेरंगी फुलांनी सजलेले ते बगीचे, नीटनेटक्या रगांत उभ्या असलेल्या झाडा-वेली आणि त्यातून वाहणारी मंद हवा — हे सर्व पाहताना जणू निसर्गानेही या भव्य वास्तूच्या सौंदर्यात आपले रंग भरले आहेत असे वाटते. फुलांचा सुगंध आणि शांत वातावरण मनाला प्रसन्नतेची एक अनोखी अनुभूती देतात.या संपूर्ण भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात एक विशेष भावना जागृत झाली —
“आपण देशाच्या इतिहासाच्या आणि लोकशाही परंपरेच्या एका जिवंत स्मारकात उभे आहोत.”
इतिहासाच्या पानांत वाचलेले राष्ट्रपती भवन प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव हा विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सहलीचा भाग नव्हता; तो त्यांच्या आयुष्यातील एक अमूल्य, प्रेरणादायी आणि अभिमानाने भरलेला सोनेरी क्षण होता.या भेटीने त्यांच्या मनात देशाबद्दल आदर, इतिहासाबद्दल कुतूहल आणि भविष्याबद्दल प्रेरणा यांची सुंदर ज्योत प्रज्वलित केली.
आणि म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की —
“राष्ट्रपती भवनाचे दर्शन म्हणजे केवळ एका भव्य इमारतीचे दर्शन नव्हे; ते भारताच्या लोकशाही परंपरेचे, इतिहासाचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे साक्षात दर्शन आहे.”
   पाच दिवस कसे गेले ते कळलेच नाही.कॅम्प सोडताना एक विद्यार्थी म्हणाला —“अरे, परत यायला मिळेल का?”
मित्र म्हणाला —“नक्की… पण आधी घरी जाऊन आईला सांगावं लागेल की,आपण भांडीही धुवू शकतो!”
 परतीच्या प्रवासात प्रत्येकाच्या मनात आठवणींचा खजिना होता.
नवीन अनुभव, नवीन मित्र, आणि निसर्गाशी जुळलेले नाते.संत ज्ञानेश्वर म्हणतात —“विश्वची माझे घर.” त्या भावनेप्रमाणे या प्रवासाने विद्यार्थ्यांचे विश्व मोठे केले.
खरंच—
प्रवास संपतो, पण आठवणींचा प्रवास मात्र आयुष्यभर चालू राहतो.
    हा प्रवास केवळ सहल नव्हता; तो एक जीवनानुभव होता.या पाच दिवसांत विद्यार्थ्यांनी धाडस, शिस्त, स्वावलंबन आणि मैत्री यांचे सुंदर धडे घेतले.
पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे —
“आनंद हा शोधायचा नसतो, तो अनुभवायचा असतो.”
गदपुरीतील हा अनुभव प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा ठरला.प्रवास संपला, पण आठवणी कायमच्या मनात राहिल्या.स्काऊटिंग ही केवळ एक चळवळ नाही;ती जीवन घडवणारी एक सुंदर शाळा आहे!


शैलेश अशोक पाटोळे 
नाशिक 
८ मार्च २०२६








Sunday, March 1, 2026

डोंगरकुशीत हरवलेले स्वप्निल क्षण ! M o u n t. A b u

   
          डोंगरकुशीत हरवलेले स्वप्निल क्षण !
               M o u n t. A b u 
   धावपळीच्या आयुष्यातून जेव्हा थोडी विश्रांती किंवा विरंगुळा हवा असतो तेव्हा निसर्गात सामावून जाण्यासारखा दुसरा उत्तम मार्ग नसतो ! 
स्काऊट आणि गाईड निसर्ग निवास आणि एडवेंचर कॅम्प च्या निमित्ताने नॅशनल सेंटर माउंट आबू येथे जाण्याचा योग आला.
  नाशिकच्या पवित्र भूमीहून जेथे गोदावरीच्या तरंगांनी आठवणींची गाणी गात ते राजस्थानच्या एकमेव हिल स्टेशन माउंट आबू पर्यंतचा हा प्रवास म्हणजे सूर्योदयाच्या किरणासारखा उजळून निघणारा अनुभव ! चार चाकी गाडी रस्त्यांवर लाटांसारखी वळण आणि हृदयातून उसळणाऱ्या हास्य विनोदाचा धबधबा... हा प्रवास फक्त अंतर नाही तर मित्रतेच्या अमूल्य धाग्याने विणलेला सुवर्ण तान्हा होता !
  अगदी पहाटे प्रवासाला सुरुवात झाली. मनात आनंदाची लहर उसळली. जणू जीवनाच्या.. अनेक मैलांच्या पलीकडे ...डोंगरांच्या हृदयात दडलेल्या शांततेचा शोध घेण्यासाठी आमचा कंपू कूच करीत होता.
  सूर्योदयाआधीच प्रवासात चहाचा शोध घेता घेता बरोबर आणलेल्या न्याहारीचा आस्वाद घेतला. खानदेशी शेतीची.. सोन्याची पिकं पाहत मन भरून आलं. रस्त्यांवर लाटांसारखी वळण घेत महाराष्ट्राची सीमा सोडून आम्ही गुजरातची सीमा ओलांडली. गुजरातचे रस्ते आणि त्या रस्त्यांवर ट्रकचालकांचा थरार पाहून मन कधी कधी भयचकीत होते. पहिल्यांदाच या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही. हळूहळू रस्ता कापत गुगल वाटाड्याच्या मदतीने पुढे पुढे जात होतो. प्रवासातला रोमांच आणि मित्रांची साथ ! बहुदा हेच जीवन असावे !
  रात्री नऊच्या दरम्यान राजस्थानातील माउंट आबू येथे पोहोचलो. हवेतला गारवा जाणू लागला होता. खास राजस्थानी पद्धतीच्या जेवणावर ताव मारून विश्रांती घेतली. 
  माउंट आबूच्या डोंगराळ भागात वसलेले नॅशनल ट्रेनिंग सेंटर हे भारतातील एक प्रमुख केंद्र आहे. साहसी प्रशिक्षणासाठी आदर्श असलेले हे ठिकाण कॅम्प साइट्स, रॉक क्लाइंबिंग वॉल्स,रोप कोर्सेस, ट्रेकिंगचे रस्ते इत्यादींसाठी सुपरीचीत आहे.१९७० मध्ये स्थापन झालेले हे ट्रेनिंग सेंटर सध्या श्री.जितेंद्र भाटी यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे कार्य करीत आहे.
गोमुख रोडच्या कुशीत लपलेले हे केंद्र विद्यार्थी आणि युवकांसाठी जीवनाच्या लाटांवर नौका चालवणाऱ्या तरुण योध्यांचे तपोस्थान आहे.जेथे प्रत्येक शिळा नेतृत्वाची गोष्ट सांगते आणि वारा अनुशासनाचे गाणे गातो !
 येथील अनुभव म्हणजे सूर्योदयाच्या किरणांसारखा उजळणारा साहसाचा सैलाब ! सकाळी रॉक क्लाइंबिंगच्या शिळांवर चढताना जणू डोंगराच्या कवचाला आव्हान देणारे तरुण हत्ती तर रोप कोर्सच्या उंच झिपलाईन वरून खाली उतरताना हवेच्या पंखांवर स्वार झालेले गरुड ! कॅम्प फायरच्या तापट गोळ्यात मित्रांच्या हास्याच्या लाटा उसळतात आणि रात्रभर ट्रेकिंग करताना तारकामंडळांनी सजलेले आकाश जणू जीवनाचे रहस्य उलगडते ! स्वच्छ निवास गृहे- तंबू,पौष्टिक जेवण- रोज नवीन मेनू, सहज उपलब्ध मेडिकल सुविधा...जणू आईच्या मायेचे प्रतिबिंब ! हिरव्या गवताच्या बिछान्यावर उभे तंबू...जेथे सकाळी पक्षांचे संगीत जागे करते आणि रात्री झोपवतात...तारकांचे दिवे ! जितेंद्र भाटी येथील प्रभारी अधिकारी ..सहकार्यपूर्ण, प्रेरणादायी आणि तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारे ! त्यांचा स्वभाव हिमनदीसारखा शांत पण शक्तिशाली! विद्यार्थ्यांना आत्मविश्वास प्रदान करतो. स्वावलंबन, शिस्त, सामाजिक सेवा शिकवतो. हे केंद्र म्हणजे साहस, सेवा आणि स्वप्नांचा चिरंतन संनाद !
  माउंट आबू राजस्थानचा एकमेव डोंगराळ भाग.प्राचीन काळी याला अर्बुदांचल म्हणत. पौराणिक कथेनुसार, हिमालयाचा पुत्र अर्बुदा (एक शक्तिशाली सर्प) याने भगवान शिवाच्या वाहन नंदीला खाईतून वाचवले, म्हणून हे नाव पडले.हे अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर, प्राचीन काळापासून ऋषीमुनींचे तपोस्थान राहिले आहे. ऋषी वशिष्ठांच्या पावनस्पर्श या भूमीला झाला आहे. ऋषी वशिष्ठ हे वैदिक काळातील सप्तऋषींपैकी एक,जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात. इक्ष्वाकूवंशाचे (सूर्यवंशाचे) राजगुरू आणि भगवान रामाचे गुरु होते.ऋषी वशिष्ठांनी येथे यज्ञ करून अग्नीकुंडातून चौहान ,परमार, सोलंकी आणि प्रतीहार राजवंशाची उत्पत्ती केली. अकराव्या ते तेराव्या शतकात परमार राजांनी दिलवाडा जैन मंदिरे बांधली. १३११ मध्ये चौहान राजांनी यावर विजय मिळवून राजपुताना मुख्यालय आणि उन्हाळी राजधानी केली. जैन धर्माचे प्रमुख तीर्थस्थान म्हणून ओळखले जाणारे माउंट आबू येथील दिलवाडा जैन मंदिरे संगमरवरातील नक्षीकामासाठी जगप्रसिद्ध आहेत. भगवान शिवाने एका भील दांपत्याला दर्शन दिले आणि भगवान महावीर येथे आले अशा पौराणिक कथा याच्याशी जोडलेल्या आहेत. हिंदू आणि जैन मंदिरे, अचलगड किल्ला येथील सांस्कृतिक वारसा जपतात.
   देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर माउंट आबू  बॉम्बे राज्यात म्हणजे गुजरात प्रांताला जोडण्याच्या विरोधात आंदोलन झाले. माउंट आबू हे अरवली पर्वतरांगेतील दक्षिण पश्चिम भागात बाराशे वीस मीटर उंचीवर वसलेले असून गुरुशिखर (१७२२) हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. राजस्थान मधील एकमेव हिल स्टेशन म्हणून थंड हवामान, झील, वन्यजीव अभयारण्य आणि पाण्याचे स्रोत असलेले 'रेगिस्तानातील हिरवा भाग' म्हणून प्रसिद्ध आहे. 
  प्रभू श्रीरामचंद्रांचे गुरु वशिष्ठ मुनींचा आश्रम येथे असून तेथे अग्नीकुंड आणि गोमुख कुंड आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. गोमुख कुंडातून सतत गाईच्या तोंडा सारखी पाण्याची धारा वाहते, ज्याचा संबंध ऋषी वशिष्ठांनी केलेल्या यज्ञाशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार हे पाणी पवित्र असून भगवान शिवाने एका दाम्पत्याला दर्शन देऊन हे कुंड निर्माण केले,असे मानले जाते. येथील जल हिंदू तीर्थयात्रेकरूसाठी पवित्र स्नानाचे स्थान आहे. गोमुख कुंडातील जलस्रोत प्राकृतिक असून वर्षभर अविरत शिवलिंगावर जलाभिषेक करत असते. हे पाणी अत्यंत शुद्ध, थंड आणि पवित्र मानले जाते.
  सातशे एकर क्षेत्रात पसरलेला आशिया खंडातील सर्वोत्तम किल्ला चित्तोडगड येथे जवळच असून १८० मीटर उंचीच्या टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून मेवाड राजवंशाच्या शौर्याची आणि जौहर परंपरेचे प्रतीक आहे. सातव्या शतकात मौर्य राजा चित्रांगद मोरी यांनी हा किल्ला बांधला असून आठव्या शतकात बप्पा रावल यांनी येथे मेवाडची राजधानी बनवली. १३०३ मध्ये अलाउद्दीन खिलजी,१५३५मध्ये बहादुर शहा आणि १५६८ मध्ये अकबराने यावर आक्रमण केले. ७ दरवाजे,८४ कुंड, शेकडो मंदिरे आणि १३ किलोमीटर भिंत असलेला हा जलकिल्ला बेराज नदी काठावर आहे.या किल्ल्यातील महल आणि संग्रहालय हे राजपूत वास्तुकला आणि इतिहासाचे प्रतीक आहेत. किल्ल्यातील राणा कुंभा महाल हा राणा कुंभा यांनी बांधला असून मीराबाईचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. पद्मिनी महाल देखणा असून यात समर आणि विंटर पॅलेस अशी विभागणी केली आहे. कलाकुसर केलेला रतनसिंह महाल पर्यटकांना आकर्षित करतो. जैन धर्माशी संबंधित प्राचीन वास्तुशिल्पाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कीर्ती स्तंभ ! तेराव्या शतकातील साधारण २४ मीटर उंचीचा चार मजली हा स्तंभ आहे.एका जैन व्यापाऱ्याने तीर्थंकर आदिनाथ स्वामींच्या सन्मानार्थ बांधला असून ते दिगंबर जैन धर्माचे तीर्थस्थळ आहे.
त्याचा आकार चौकोनी असून जैन तीर्थंकर आदिनाथाच्या चार दिगांत विशाल मूर्तीसह, विष्णू अवतार, शिव, ब्रम्हा, नृत्यांगना,रामायण- महाभारत दृश्य आणि तत्कालीन सामाजिक जीवन चितारले आहे.स्तंभावर जाण्यासाठी गोलाकार ६९ पायऱ्या आहेत.
  माउंट आबू आणि जवळपासच्या परिसरामध्ये अनेक आकर्षणे आपल्याला खुणावतात. आबू शहराच्या मध्यभागी जगातील सर्वात मोठी खोल नैसर्गिक झील आहे. त्याला नक्की झील असे म्हणतात. जेथे बोटिंग आणि सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहता येते. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर संगमरवरी दिलवाडा जैन मंदिर आहे .अकराव्या ते तेराव्या शतकातील उत्कृष्ट नक्षीकामासाठी ते प्रसिद्ध आहे. १७२२ मीटर उंचीवरील गुरुशिखर या पर्वत शिखरावरून अबू शहराचे विहंगम दृश्य दिसते. येथे गुरु दत्तात्रयाची गुफा मंदिर आणि चरण पादुका असून शांतता आणि निसर्गदृश्यांसाठी प्रसिद्ध असे हे ठिकाण आहे. इस्रोची इन्फ्रारेड वेधशाळा देखील येथे आहे. अबू शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर अचलगड किल्ला सध्या मात्र भग्नावस्थेत असून प्राचीन शिव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमातील पीस पार्क हे ध्यानधारणाकरिता प्रसिद्ध ठिकाण आहे. डोंगरदऱ्या आणि टेकड्या यांनी वेढलेला हा परिसर असल्याने अनेक ठिकाणी सनसेट पॉईंट पाहण्यासाठी स्थानिकांची व पर्यटकांची रोजच गर्दी झालेली असते.
  गुजरातच्या सीमेजवळ असल्याने राजस्थानपेक्षा सौम्य आणि थंड हवामान आढळते. ग्रीष्म ऋतूतही थंडावा जाणवतो. दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि रात्री थंडावा असे आल्हाददायक वातावरण आबू शहराचे आहे. मॉन्सून मध्ये सरासरी १३०० मिलिमीटर पाऊस पडतो.हिवाळ्यात सरासरी ३ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली जाते. वर्षभर पर्यटनासाठी अतिशय उत्तम वातावरण असते. आबू शहराची लोकसंख्या साधारण ३५ हजार असून हिंदू, जैन आणि आदिवासी भील संस्कृतीचा संगम दिसून येतो. पर्यटनामुळे आर्थिक दृष्ट्या हा भाग सक्षम असून शहरात साधुसंतांची उपस्थिती वैशिष्ट्ये पूर्ण आहे. घूमर, दांडिया,गैर यांसारखी सांस्कृतिक परंपरा आणि जून महिन्यात होणारा समर फेस्टिवल प्रसिद्ध आहेत. 
  येथील लोक पारंपरिक राजस्थानी पोशाख परिधान करतात.दाल - बाटी चुरमा, गट्टे की सब्जी, रबडी, जाड दुधाची थंड मिठाई, सात चटण्या असलेले मसालेदार पराठे... खवय्यांसाठी यापेक्षा दुसरी मेजवानी काय असू शकते! ज्वारी बाजरी मका आणि चणाडाळ याचा अधिकाधिक वापर जेवणात असतो. दूध आणि दहाचे पदार्थही मुबलक मिळतात. 
  माउंट आबू आणि परिसरात प्रामुख्याने हिंदी भाषा बोलली जाते. मारवाडी आणि स्थानिक बोलींनी युक्त राजस्थानी देखील ऐकायला मिळते. आदिवासी लोक हिंदी मिश्रित भीली बोली बोलतात. तीर्थक्षेत्र असल्याने काही प्रमाणात संस्कृतचा प्रभाव दिसून येतो. परदेशी पर्यटकांसाठी आवश्यक इंग्रजीचा वापरही काही प्रमाणात आढळतो.
  सहा दिवसांचा एडवेंचर कॅम्प संपल्यानंतर संस्कृती,निसर्गाचा अनोखा नजराणा, डोंगरदऱ्या, स्वच्छ सूर्यप्रकाश, आल्हाददायक हवा, तीर्थक्षेत्रे, किल्ले, महाल,सूर्योदय सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेले माउंट आबू शहराचा अनुभव घेतल्यानंतर परतीचा प्रवास.... कधी संपूच नये असा ! आबू शहराच्या प्रेमात पडला नाही असा पर्यटक विरळाच.. परतताना विरहाच्या वेदनांनी मन आतल्या आत रुदन केल्याशिवाय राहत नाही. 
   जर तुम्हाला साहस,आनंद आणि शांती हवी असेल तर मित्रांसोबत निघा...आबू वाट पाहतोय..! 

शैलेश पाटोळे 
नाशिक
 

  

  

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...