"उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू.."
कविवर्य वसंत बापटांच्या या स्फूर्ती गीताचे पारायण आपण सर्वांनीच शालेय जीवनात केले आहे. भारताचा उत्तरेकडील भाग प्रत्येक भारतीयाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. हिमालय पर्वत, पाकिस्तान, अफगाणिस्तान,चीन, नेपाळ, इत्यादी देशांच्या बॉर्डर्स, प्रचंड थंडी, डोंगराळ प्रदेश, बर्फ वृष्टी, सुकामेवा आणि बरंच काही... एका मित्राच्या आग्रहामुळे लडाखच्या सफरीवर जाण्याचा योग आला. सहलीला जाऊन आल्यानंतर आता वाटते... मित्रांच्या आग्रहाला मी प्रतिसाद दिला नसता तर...? पृथ्वीवरचे नंदनवन अनुभवण्याचे राहून गेले असते..!
विमान प्रवासाचा फारसा अनुभव गाठीशी नव्हता. विमानतळावर पोहोचल्यानंतर सुरक्षाविषयक सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर खराब हवामानामुळे तासन्तास ताटकळत बसावे लागले. धावपट्टी वरून धावणारी असंख्य विमाने पहात.. आता आपले कधी? या विचारात आम्ही सारे जण वेळ घालवत होतो. एकदाचे विमानात बसलो. या आधीच्या काश्मीरच्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाचा अनुभव होता. एअर होस्टेस ने," कुर्सी की पेटी बांधलो.."असा मधाळ आदेश दिल्यानंतर उतावळेपणाने मी शेजारच्यांचीच पट्टी माझ्या कमरे भोवती गुंडाळल्याने थोडा वेळ झालेला गोंधळ आणि त्यामुळे माझे झालेले हसे.. कसे विसरता येईल? विमान एकदाचे आकाशात झेपावले. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते लदाख अशी फ्लाईट होती.
या आधी काश्मीरच्या सहलीचा सुखद अनुभव होता. कडाक्याची थंडी आणि बर्फाने आच्छादलेल्या डोंगररांगा तरीदेखील सुखद आणि आल्हाददायक असे वातावरण.. खरे तर हा चमत्कार म्हटले पाहिजे. काश्मीर आणि लदाख जवळ जवळ असल्याने तोच सुखद अनुभव येईल,असे वाटले होते.
लेह विमानतळावर उतरल्यानंतर परिस्थिती अगदी उलट होती. उंचच उंच डोंगर रांगा, खडकाळ प्रदेश, ओसाड जमीन, तुरळक लोक वस्ती.. एवढा प्रवास करून आपण इथे काय पाहायला आलो? असे प्रश्न आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर होते. लेह मध्ये एका लाकडी बनावटीच्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती. हॉटेल छान व नीटनेटके होते. लाकडामध्ये केलेले सुंदर कोरीव काम, भिंतीवर लावलेले लडाखमधील बौद्ध स्तूप, याक, हिमालयाचे विविध फ्रेम केलेले फोटो लक्ष वेधून घेत होते. त्यातही हॉटेलभर भरून राहिलेला मोहरीच्या तेलाचा उग्र वास मात्र नकोसा वाटत होता. प्रवास करून आल्यानंतर खूप थकल्यासारखे जाणवत होते. उत्साह जाणवत नव्हता. दोन पावले अंतर चालण्याची इच्छा नव्हती. आपण फिरायला आलो आहोत आणि अंगात त्राण राहिलेला नाही... अशी परिस्थिती आम्हा सर्वांचीच होती. रिसेप्शन काउंटरवर जाऊन थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
टूर कंपनीने तयार करून दिलेल्या आयटीनरी नुसार सायंकाळी लेह मधील एक प्राचीन बौद्ध स्तूप, आणि लेह मार्केट मध्ये भटकंती करणे ठरले होते. बाहेर पडण्याची अजिबात इच्छा नसताना देखील आम्ही तयारी करून नेमून दिलेल्या वाहनांमध्ये स्थलदर्शनासाठी निघालो...
लेह हे लडाख केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यालय असून तेथील मोठे शहर आहे. ते हिमालय पर्वत रांगेत सिंधू नदीच्या काठावर साधारणपणे११५०० फूट उंचीवर असून त्याच्या पूर्वेला तिबेटचे पठार आणि पश्चिमेला काश्मीरचे खोरे आहे. येथे लडाखी, बालटी आणि हिंदी भाषा बोलली जाते. येथे मुस्लिम,बौद्ध, हिंदू आणि शीख धर्मीय लोक आहेत.येथून नॅशनल हायवे क्रमांक १ (NH 1) ने श्रीनगरला जाता येते.लेह ते श्रीनगर हे अंतर साधारणत : ५३४ किलोमीटर आहे. येथील संस्कृती ही तिबेटियन संस्कृतीशी एकरूप झालेली दिसते. लडाख या शब्दाचा अर्थ उंचावरची जमीन असा होतो. हे भारतातील सर्वात उंच पठार आहे.
पहिल्या दिवशी लेह शहरातील शांती स्तूप ज्याला पीस पॅगोडा असे म्हणतात ते पाहण्यासाठी निघालो. समुद्रसपाटीपासून ११८४१ फूट उंचावरील टेकडीवर ते वसलेले आहे. १९१४ मध्ये जपानी बौद्ध लोकांनी ते बांधले आहे. या टेकडीवरून लेह शहराचे पॅनोरमिक दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड हवा, कमालीची शांतता असूनही उंचावर असल्याने आणि वातावरणाशी जुळवून न घेतल्याने शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासते. साधारणपणे पाचशे पायऱ्या या टेकडीला आहेत. सूर्यास्ताच्या वेळी अतिशय मनोहारी दृश्य दिसत होते; शांती स्तूपाच्या अगदी जवळ आम्ही श्वास घेण्यात अडचण येऊ लागल्याने धापा टाकत पोहोचलो. पुढे दोन पावले चालण्याची शरीर आणि मनात ताकद उरली नव्हती. एक पाऊलही पुढे टाकणं अशक्य होते. आम्हा सर्वांचिच परिस्थिती लक्षात घेता स्तूपाच्या दरवाज्यापासूनच पुन्हा हॉटेलवर जाण्यासाठी गाडीत बसलो. जे स्थळ दर्शन करण्यासाठी आम्ही आलो होतो ते न पाहताच सफरीची सुरुवात झाली ! आम्ही निराश झालो. हॉटेलवर गेल्यानंतर आराम करण्याशिवाय पर्याय नव्हता. साधारणपणे रात्रीचे आठ वाजले असावेत, जेवणासाठी आम्ही डायनिंग हॉलमध्ये जमलो. आमच्यापैकी बहुतेकांना बसल्या जागी चक्कर येऊ लागले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत मदत केली. कुठलीतरी एक गोळी त्यांनी आम्हा सर्वांना दिली. लडाखच्या सफरीची सुरुवात अशी झाली...
दुसरा दिवस उजाडला. सूर्योदयापूर्वी जाग आली. हॉटेलच्या गॅलरीत जाऊन बाहेरचे दृश्य न्याहाळले. दूर उंच टेकडीवर भारताचा तिरंगा दिमाखात फडकत होता. लांब अंतरावर बर्फाने आच्छादलेले उंचच उंच डोंगर लक्ष वेधून घेत होते. चित्रपटात किंवा वॉलपेपर मध्ये पाहिलेले दृश्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पहात होतो. कालचा थकवा आणि निरुत्साह अचानक गायब झाला. शक्य तितके निसर्गाच्या मनोहारी दृश्याचे ते क्षण कॅमेरात बंदिस्त केले. भरपेट नाश्ता केल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या स्थलदर्शनासाठी हॉटेल बाहेर ड्रायव्हर गाडी घेऊन तयार होता.
प्रवासाला सुरुवात झाली. त्याआधी मेडिकल शॉप मधून ऑक्सिजनचे एक सिलेंडर आणि जीव गुदमरू लागल्यानंतर घ्यावयाची गोळी सोबत घेतली. आज आम्ही लेह पासून कारगिल पर्यंतचा प्रवास करणार होतो. १९९९ चे ऑपरेशन विजय आणि भारतीय सैन्याचा पराक्रम वर्तमानपत्रात वाचला होता. आज या स्फूर्तीदायी आणि अनेक भारतीय सैन्याच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीला स्पर्श करता येईल याबाबत उत्साह मनात होता. उंच उंच डोंगर रांगा, वेडी वाकडी वळणे, अरुंद रस्ते, प्रचंड खोल दऱ्या, इत्यादींमुळे भय आणि आनंद अशा संमिश्र भावना प्रत्येकाच्या मनात होत्या. ड्रायव्हर सरावाचा असल्याने तो खुबीने गाडी चालवत होता. समोरून येणाऱ्या वाहनांना पास देणे, दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरला मदत करणे, न चिडता अत्यंत संयमाने गाडी चालवणे याबद्दल तिथल्या ड्रायव्हरचे मला कौतुक वाटले. अर्थात असे न केल्यास हजारो फूट खोल दरीत वाहन पडण्याची शक्यताच अधिक !
लेह पासून साधारणपणे ५२ किलोमीटर अंतरावर लिकीर मॉनेस्ट्री हा बौद्ध मठ त्याच्या रचनेसाठी आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तेथे जाऊन दर्शन घेतले. आज मात्र ऑक्सिजनची कमतरता फारसी जाणवली नाही. थंड हवा, शांत परिसर, आणि निसर्गाचे अलौकिक सौंदर्य मनाला भुरळ पाडत होते. त्यादरम्यान मॅग्नेटिक हिल ही पृथ्वीवरील चमत्कारिक जागा पाहता आली. गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार करणारी ही चुंबकीय टेकडी जेथे गाडी विशिष्ट ठिकाणी आपोआप वरच्या दिशेने ताशी ६० किलोमीटर वेगाने जाऊ लागते.
लेह ते कारगिल प्रवासादरम्यान ड्रायव्हरने पाथर साहिब (पत्थर साहेब) गुरुद्वारा जवळ गाडी थांबवली. रस्त्याच्या अगदी मधोमध हे ठिकाण आहे. मिलिटरी चेक पोस्ट असल्याने ड्रायव्हरला सुरक्षाविषयक पूर्तता करण्यासाठी थांबावे लागले. तोपर्यंत आम्ही गुरुद्वारामध्ये दर्शन घेण्यासाठी शिरलो. मी मात्र नेहमीप्रमाणे गुरुद्वाराच्या गेट जवळच घुटमळत राहिलो. "तुम्ही दर्शन घेऊन या. मी बाहेर थांबतो..."असे मी म्हणालो. सवयीप्रमाणे तिथे लिहिलेल्या बोर्डवरची माहिती जी इंग्रजी व हिंदी भाषेत लिहिलेली होती ती मी वाचली. तेथे गुरुद्वारा बद्दलची आख्यायिका लिहिलेली होती... साधारणपणे १५१७ मध्ये शिखांचे धर्मगुरू गुरुनानक देव चीन,भूतान, नेपाळ असा प्रवास करीत करीत लडाख मध्ये आले. त्याकाळी त्या गावात एक दृष्ट राक्षस अथवा दरोडेखोर गावातील लोकांना प्रचंड त्रास देत असे. त्याच्या जाचामुळे गावातील लोक भयभीत झाले होते. गुरुनानक देव एका झाडाखाली साधनेला बसले होते. गावातील लोकांनी त्या राक्षसी वृत्तीच्या माणसाबद्दल गुरुनानकांना सांगितले. "राक्षसाचा बंदोबस्त मी करतो. तुम्ही काळजी करू नका," असे आश्वासन गुरुनानक देवांनी त्यांना दिले. याबाबत डोंगरावर राहणाऱ्या त्या राक्षसाला कळले. त्याने डोंगरावरून एक भला मोठा दगड गुरुनानक देव बसलेल्या दिशेकडे फेकला. तो दगड गुरुनानकांच्या पाठीला लागला. चमत्काराची गोष्ट म्हणजे गुरुनानकांच्या पाठीला दगडाचा स्पर्श झाल्यानंतर दगड आतल्या बाजूला दाबला गेला व तेथे पाठीच्या आकाराचा खड्डा पडला. अशी मान्यता आहे की, गुरुनानक देवांच्या स्पर्शाने तो दगड मऊ झाला. आजही या दगडाचा स्पर्श इतर खडकांच्या तुलनेने मऊ किंवा मुलायम भासतो ! पुढे तो राक्षस गुरुनानकांना शरण आला.... माझ्यातील जिज्ञासा आणि प्रत्यक्ष गुरुनानकांच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या त्या भल्या मोठ्या दगडाला स्पर्श करण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली आणि मी गुरुद्वारामध्ये प्रवेश केला... मनोभावे दर्शन घेतले. हा परिसर आणि गुरुद्वारा भारतीय सैन्याच्या शिख बटालियन कडे सोपविण्यात आला असून त्यांच्या नियंत्रणात आहे. गुरुद्वारा मधील सर्व प्रकारची व्यवस्था बटालियन मधील सैनिकांमार्फत होते. कदाचित भारतातील हे असे एकमेव ठिकाण असावे !
हजारो फूट उंचीच्या डोंगर रांगांमधून वळणे घेत रस्ते कसे तयार केले असतील याचे देखील आश्चर्य वाटते. सतत वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे डोंगरावर दगड कमी आणि मातीचे किंवा रेतीचे थर साचलेले दिसतात. डोंगरावरील खडक उष्णता आणि थंडीमुळे आकुंचन आणि प्रसरण पावत असल्याने ठिसूळ झालेले असतात. त्यामुळे कधीही दरड कोसळण्याची भीती असते. रस्त्याच्या कडेला खोल दऱ्या असून बचावाची कोणतीही शक्यता नसते.BRO या संस्थेमार्फत आणि भारतीय सैन्यामार्फत रस्त्याची निगराणी व काळजी घेतली जाते. हॉलीवुड ॲक्शनपटामध्ये दिसणाऱ्या , भयकंपित करणाऱ्या उंच उंच डोंगर रांगा आणि त्यातून वळणे घेत झेपावणारी विमाने, हेलिकॉप्टर्स यांचा भास व्हावा असे रस्ते ... प्रवासाचा अद्भुत अनुभव या रस्त्यांवर येतो.
बहुप्रतिक्षित कारगिलला आम्ही पोहोचलो. कारगिल हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून नियंत्रण रेषेजवळील शहर आहे .नॅशनल हायवे क्रमांक एकने जोडलेले हे ठिकाण ८७८० फूट उंचावर आहे. कारगिल युद्ध स्मारकाला आम्ही भेट दिली.१९९९ मध्ये ६० दिवस चाललेल्या कारगिल युद्धामध्ये ५५७ सैनिकांनी बलिदान दिले. स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आत मध्ये प्रवेश करतानाच अंगावर रोमांच उभे राहिले. युद्धामध्ये वापरले गेलेले रणगाडे,तोफा, बंदुका, इत्यादींचे जतन तेथे केले आहे. कॅप्टन विजय बात्रा यांच्या विजयाची गाथा तेथे एका शोमध्ये पाहिली .नियंत्रण रेषेवर असणाऱ्या सैनिकांच्या बद्दल मनामध्ये आदर तर असतोच ; परंतु सैनिकांचे शौर्य पाहून उर अभिमानाने भरून आला! त्या स्मारका जवळ उभे राहून फोटो काढण्याचा मोह प्रत्येकाला होणे स्वाभाविक ! आमच्यात अपवाद माझ्या मुलाचा..ज्याने तिथे एकही फोटो काढला नाही. त्याचे कारण त्या विशितल्या तरुणाकडून ऐकून आम्हाला लाजल्यासारखे झाले."बाबा, ही फोटो काढण्याची जागा नाही. तुम्हाला फोटो काढायचा असेल तर तुम्ही जरूर काढा. अनेक शूरवीर सैन्याच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीवर आपण आहोत." बलिदान केलेल्या सैनिकांच्या स्मृति तेथे कोरलेल्या आहेत. त्या स्मृतीस्थळावर तो नतमस्तक झाला. आमच्यातल्या दिखाऊ देशभक्तीला जणू त्याने हात घातला होता! वाटले..सहलीचा खरा हेतू सफल झाला. भारतातील अशी स्फूर्तीदायक ठिकाणे तरुणांसाठी तीर्थक्षेत्र व्हावीत ! भारतीय सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेला भीमपराक्रम ऐकून आपण भारतीय असल्याचा गर्व वाटला. -२० अंश सेल्सिअस तापमानात कसे लढले असतील ? स्वतःच्या वजनापेक्षा दुप्पट वजनाचे ओझे पाठीवर घेऊन डोंगरदऱ्या कसे चढले असतील? सलग साठ दिवस शत्रूशी सामना कसा केला असेल? कल्पनेनेच आपल्यासारख्यांना धडकी भरते.शेकडो सैन्यातल्या अधिकाऱ्यांचा मृत्यू.. तेही अगदी तरुण वयात... पुढे त्यांच्या कुटुंबीयांचे काय.. असंख्य प्रश्न मनाला भंडावून सोडतात.. सलाम त्यांच्या शौर्याला..... त्यागाला.. बलिदानाला..देशभक्तीला ! आपोआपच आपले हात भूमीला स्पर्श करतात आणि गुलाल म्हणून ती माती भाळी लावण्याचा मोह आवरता येणे केवळ अशक्यच! पर्यटनादरम्यान असा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतला होता. पर्यटन म्हणजे केवळ निसर्गदर्शन आणि मनोरंजन एवढाच हेतू नसतो,हे कारगिलला भेट दिल्यावर कळले. प्रत्यक्ष युद्ध लढले गेलेले द्रास सेक्टर,झोझिला पास असा प्रवास करीत पुन्हा लेह येथे मुक्कामासाठी पोहोचलो.
भरपेट नाश्ता करून आमची गाडी पुढच्या प्रवासासाठी साधारणपणे साडेनऊ ते दहा च्या दरम्यान निघाली. अंगाला झोंबणारा गार वाऱ्यापासून संरक्षण महत्त्वाचे होते. स्वेटर्स, कान टोप्या,ग्लोव्हज इत्यादी अंगावर चढवून आज नुब्रा व्हॅली पाहण्यासाठी निघालो होतो. नुब्रा व्हॅली ही गुलाबाच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. लडाखच्या इतर भागांपेक्षा हा प्रदेश उबदार म्हणून ओळखला जातो. साधारणपणे ६७३० फूट उंचावर हे ठिकाण असून गुलाब आणि पिवळ्या रंगांच्या गुलाबांसाठी ते प्रसिद्ध आहे. म्हणून याला व्हॅली ऑफ फ्लावर्स असे देखील म्हटले जाते. उंच उंच टेकड्यांनी वेढलेले हे ठिकाण लेह पासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. दुर्दैवाने फुल येण्याचा ऋतू नसल्यामुळे व्हॅलीचे निसर्गदर्शन होऊ शकले नाही. परंतु लांबच लांब पसरलेली वाळू, वाळूचे ढिगारे, निर्जन रस्ते, गोठविणारी थंडी,श्योक नदीचे विस्तीर्ण पात्र, वेगाने वाहणारे थंडगार वारे इत्यादींचा अनुभव घेता आला. नुब्रा व्हॅलीमध्ये राजस्थान मध्ये न दिसणारे पाठीवर दोन उंचवटे(कुबड्या) असलेले, अंगावर भरपूर केस असलेले उंट पाहायला मिळतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उंट सफारी, उंटाची शर्यत, विविध प्रकारचे मनोरंजन करणारे खेळ दाखवले जातात. खारदुंगला पास वरून नुब्रा व्हॅलीपर्यंत जाताना लांबच लांब निर्जन रस्ते, वेडी वाकडी वळणे, डोंगरदऱ्यांमधून जाताना साहसी प्रवासाचा अनुभव येतो. या भागात जरदाळूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.ही व्हॅली फुलांनी बहरलेली असताना येथे भेट देणे म्हणजे एक अविश्वसनीय अनुभव असतो. पृथ्वीवरील स्वर्ग असे या ठिकाणचे वर्णन स्थानिक लोक करतात. हिंदी चित्रपट भाग मिल्खा भाग या चित्रपटाचे काही शूटिंग येथे झाल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले.रात्रीच्या मुक्कामाची सोय लोकवस्ती असलेल्या ठिकाणी झाली.
नव्या दिवसाची सुरुवात नुब्रापासून तूर्तुकच्या प्रवासाने झाली. भारत आणि पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ भारतातील उत्तरेकडील सर्वात शेवटचे गाव तूर्तुक १९७२ या युद्धात भारतीय सैन्याने जिंकले होते. दोन देशांतील तणावामुळे २०१० पर्यंत येथे पर्यटकांना प्रवेश नव्हता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि तेथील लष्कराची सुसज्जता डोळ्यांनी पाहता आली. फोटोशूट आणि प्रत्यक्ष दर्शन असे दिवसभर सुरूच होते. जवळच असलेल्या हंडर या गावात मुक्कामाची सोय होती.
सकाळी लवकर उठून सूर्योदयाचा आनंद घेता आला. गाडी आता निघाली होती भारत आणि चीन या दोन देशांच्या मध्ये विभागला गेलेल्या प्यांगोंग लेककडे .१३४ किलोमीटर लांबीच्या लेकच्या पन्नास टक्के भागावर चीनचे नियंत्रण असून ४० टक्के भाग भारताच्या ताब्यात आहे. तर १० टक्के भाग आजही विवादित क्षेत्र म्हणून घोषित आहे. प्रचंड थंड असलेले या लेकचे पाणी खारट आहे. या लेकची खोली ३३० फूट आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे नौकाविहारास परवानगी नाही. लेक जवळ जाण्यासाठी इनर लाईन परवानगीची आवश्यकता असते. येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. थ्री इडियट या चित्रपटातील काही दृश्य येथे चित्रित केली गेली आहेत. लेकचे विस्तीर्ण पात्र, निळेशार पाणी, प्रचंड वेगाने वाहणारे गार वारे, चोहोबाजूंनी उंचच उंच डोंगरांनी वेढलेला परिसर, शांतता, स्वच्छता तन आणि मनाला आनंद देते. निचांकी तापमानामुळे सोबत असलेल्या कपड्यांव्यतिरिक्त हॉटेलमधील उबदार पांघरून सुद्धा थंडीला रोखू शकत नव्हते ! लदाखच्या सफरीत सर्वात तीव्र थंडीचा अनुभव येथे आला. दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याचे मनोहारी दृश्य केवळ अविस्मरणीय ! पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या स्फटिकांनी गोठलेल्या लेक वर सूर्याची पिवळी धम्म कोवळी किरणे पडून साऱ्या आसमंताला एक वेगळीच लकाकी प्राप्त झाली होती. एखाद्या सुवर्णनगरीत आपण असल्याचा भास होतो. म्हणूनच या प्रदेशाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणत असावेत !
लांबच लांब वेडी वाकडी वळणे घेणारे निर्जन रस्ते, अधून मधून दिसणाऱ्या लष्कराच्या छावण्या पार करत आम्ही प्यांगोंग् पासून लेहकडे प्रवासाला सुरुवात केली. दूर टेकडीवर खुरटे गवत खाणारे याकचे काही कळप नजरेस पडले. केसाळ मेंढ्या, शेळ्यांव्यतिरिक्त इतर प्राणी दिसले नाहीत. बर्फाचे वितळलेल्या पाण्यामुळे काही ठिकाणी दलदलीची जागा दिसून आली. तेथे काळे - पांढरे बगळे, करकोचे यांसारखे काही पक्षी दृष्टिक्षेपात आले. लष्करी छावण्यांच्या जवळपास विरळ झाडे आहेत. पर्यटन आणि काही प्रमाणात ड्रायफ्रूट विक्री करून येथील लोक उपजीविका करतात. प्रतिकूल हवामानात शेती करणे शक्य नाही. भाजीपाला किंवा खाद्यपदार्थ श्रीनगर किंवा जवळपासच्या प्रांतातून आयात करावी लागते. भारतीय लष्कर स्थानिक लोकांना दैनंदिन परिस्थितीत सहकार्य करताना दिसून येते. उत्तरेकडील वाळवंट असा उल्लेख या प्रदेशाचा केला जातो. येथील लोकांना प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगावे लागते. स्त्री आणि पुरुषांमध्ये जन्मतः काटकपणा आहे. शुद्ध हवा,यंत्रांचा कमीत कमी वापर, पायी प्रवास, नैसर्गिक आहार आणि विहार यामुळे या प्रदेशातील लोकांचे आयुर्मान तुलनेने जास्त आहे.
प्रचंड थंडीमुळे येथे रोजच्या जेवणात अंडी आणि मांसाहाराला प्राधान्यक्रम असतो. आमच्या सोबत असलेल्या निव्वळ शाकाहारी पर्यटकांची जेवणाची खूप आबाळ झाली. मांसाहारी जेवणाचे आणि मोहरीच्या तेलाचा उग्र वास नाकात भरून राहिल्याने सुरुवातीचे तीन दिवस अशा पर्यटकांना उपास घडला. उर्वरित दिवस नूडल्सवर विसंबून राहावे लागले.
प्रवासाच्या अंतिम टप्प्यात असताना १७६८८ फूट उंचीवरील लडाख पर्वतरांगेतील सर्वात उंच पर्वतीय खिंड चांगलापास इथला अनुभव अविस्मरणीय होता. आतापर्यंत लडाखच्या प्रवासात अतिशय थंड हवा, निर्जन रस्ते, स्वच्छ सूर्यप्रकाश, शांत वाहणाऱ्या नद्यांची विस्तीर्ण पात्रे, उंच उंच डोंगर, वळणावळणाचे रस्ते इत्यादींचा अनुभव घेतला होता. चांगलापास जवळ अचानक बर्फवृष्टी सुरू झाली. निसर्गातील अचानक झालेला हा बदल आश्चर्यचकित करणारा होता. सर्वांनी बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटला. सोबत असलेल्या ड्रायव्हरला पुढील संकटाची जाणीव असल्याने इच्छा नसताना देखील बर्फवृष्टीला आणि आनंदाला अलविदा करावा लागला ! प्रवासात लेह जवळ तारे जमीन पर आणि थ्री इडियट या चित्रपटांत दाखविलेली शाळा व काही दृश्यांचा अनुभव घेता आला. प्रत्येक ठिकाणी यथेच्छ फोटोग्राफी केली. शेवटच्या दिवशी लेह मधील अत्याधुनिक हॉटेलमध्ये राहण्याची सोय होती. सहा दिवसानंतर प्रत्येकाला स्वतःच्या चवीप्रमाणे रात्रीचे जेवण करत आले. पुढल्या दिवशी पहाटे चार वाजता लेह विमानतळावरून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली मन मात्र रेंगाळत राहिले लडाखच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये ! निसर्गाच्या मनोहारी, शांत आणि रौद्ररूपाचा एकाच वेळी अनुभव घ्यावयाचा झाल्यास जीवनात एकदा लदाखला भेट दिलीच पाहिजे !
लेखन✍️✍️
शैलेश पाटोळे
नाशिक