Friday, March 26, 2021

सेवापूर्ती समारंभ: सौ राजश्री वैशंपायन

    चन्दनं शीतलं लोके , चन्दनादपि चंद्रमा : l
    चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधू संगति : ll
      चंदनाचा लेप शीतल मानला जातो. चंद्राचा प्रकाश त्यापेक्षा अधिक शीतल असतो. परंतु सज्जन व्यक्तीची संगती आपल्याला शीतलता आणि शांती प्रदान करत असते. अशा शांत, सुस्वभावी, सज्जन ,अत्यंत संवेदनशील, निगर्वी आणि हसतमुख          असणाऱ्या आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या डी.एस. कोठारी कन्या शाळा नाशिकरोड येथील मुख्याध्यापिका सौ.राजश्री कैलास वैशंपायन संस्थेतील ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मार्चअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत.
       राजा कालस्य कारणम् या उक्तीप्रमाणे राज्याची प्रगती अथवा अधोगती राजाच्या कर्तुत्वावर अवलंबून असते.त्याच न्यायाने मुख्याध्यापक हा विद्यालयाच्या प्रगती अथवा अधोगतीस कारणीभूत असतो. म्हणजेच शाळेच्या सर्वांगीण विकासास मुख्याध्यापक जबाबदार असतात.यात कोणाचेही दुमत असण्याचे काही कारण नसावे. सौ. वैशंपायन मॅडम यांनी मुख्याध्यापिका म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षकांमध्ये आपुलकीचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले. मायेच्या ममतेने शाळेतील विद्यार्थिनींवर प्रेम केले. हे करत असताना आपल्यातील उत्तम प्रशासक मात्र त्यांनी कायम जागृत ठेवला. त्यांच्या कार्यकालात डी.एस. कोठारी कन्या शाळेचा शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला ,हे त्याचेच फळ म्हणावे लागेल.
   मुख्याध्यापक हा शिक्षक आणि प्रशासन यांना जोडणारा दुवा असतो. सुवर्णमध्य साधणारा एक महत्त्वपूर्ण घटक असतो. त्यात अनुभवाची, विचारांची परिपक्वता असली तर मुख्याध्यापक शाळेला नंदनवन बनवू शकतात.या दृष्टीने मुख्याध्यापक हा घटक फार महत्त्वाचा ठरतो. उत्कृष्ट सारथ्य असेल तर त्या विद्यालयाचा रथ योग्य प्रगती पथावरून ध्येयपूर्तीकडे गेल्याशिवाय राहत नाही. सौ.वैशंपायन मॅडम यांनी या अनुषंगाने शाळेचे उत्तम सारथ्य आणि नेतृत्व केले, असे ठामपणे म्हणावे लागेल.
      मुख्याध्यापक विज्ञाननिष्ठ, विद्यार्थीनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, सृजनशील, कल्पक बुद्धीचा, नाविन्याचा ध्यास असणारा,न्यायाची कास बाळगणारा असावा .शिक्षकांना वेळप्रसंगी कौतुकाची थाप देणारा व सौम्य शिक्षा करणारा असावा. मुख्याध्यापक स्वतः नीतिमान, शिस्तप्रिय, वक्तशीर, गुणग्राहक, कलागुणांना वाव देणारा असावा. माझ्या माहिती व अनुभवाप्रमाणे सौ. वैशंपायन मॅडम यांच्या व्यक्तिमत्त्वात वरील सर्व गुण कमी-अधिक प्रमाणात असल्याने शाळा सर्वांगाने प्रगतीकडे नेण्यात त्या यशस्वी ठरल्या.
   'अतिपरिचयात अवज्ञा' याप्रमाणे मुख्याध्यापक मनमोकळा असावा. तरीही आपल्या पदाचा आदर राखून सर्वांशी अंतर ठेवून वागणारा असावा. कारण यथा राजा तथा प्रजा. स्टाफ रूम मधील सौ. वैशंपायन मॅडम आणि मुख्याध्यापक कक्षातील सौ. वैशंपायन मॅडम याच्यात निश्चितच फरक होता.
    सौ.वैशंपायन बाई या मुळात बी.एड. फिजिकल च्या असल्यामुळे शिस्तप्रिय होत्या. खेळाच्या शिक्षिका म्हणून मुलांमध्ये मुलींमध्ये प्रिय होत्या. अत्यंत सौम्य शब्दात आणि ममत्वाने विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद असे. सतत कामांमध्ये स्वतःला झोकून देऊन, काम कधी पूर्ण होईल याचा त्या विचार करीत.
   ३१ वर्षांच्या सेवेमध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या ति.झं.विद्या मंदिर भगूर, सी.डी.ओ. मेरी हायस्कूल, सारडा कन्या विद्यालय, डी.एस. कोठारी कन्या शाळा,नाशिक रोड येथे त्यांनी सेवा केली. त्यांच्या शांत आणि सुस्वभावी वृत्तीमुळे कधीही शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी वादविवाद झालेले आठवत नाहीत.
    नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या नामवंत शिक्षक- शिक्षिका यांच्याबरोबर प्रारंभीच्या काळातील सेवाकाल गेल्यामुळे ना. ए.सोसायटीचा संस्कार त्यांचेवर झाला. तो संस्कार त्यांनी आयुष्यभर जपला. कोणासाठीही अनुदार उद्गार त्यांचे मुखातून ऐकावयास मिळाला नाही.
   The quality of a leader is reflected in the standards they set for themselves. याप्रमाणे त्यांनी स्वतःला आधी शिस्त लावून घेतली. प्रत्येक प्रकारचे काम,नियोजन त्या स्वतः करीत. त्यामुळे त्यांना कधी इतरांवर विसंबून राहावे लागले नाही. मग ते शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्यालयीन किंवा इतर कोणतेही शासकीय काम असो, स्वतः पुढाकार घेऊन ते समजावून घेऊन, काम कसोशीने पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विशेष म्हणजे आत्मविश्वासाने कोणतेही काम त्या तडीस नेत असत.
    Happiness helps relieve tension and makes the environment healthy for working. यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. म्हणून त्या कामाच्या ताणाने कधीही दुःखी किंवा नाराज झाल्याचे दिसले नाही. सदैव हसतमुख चेहरा ही सौ.वैशंपायन मॅडम यांची ओळख आहे.
   अर्थ सहकार्यवाह किंवा संस्थेत शिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असताना, वेळोवेळी सभा किंवा शाळांच्या भेटीदरम्यान सौ. वैशंपायन मॅडम यांचा सहवास लाभत असे. जे आपल्याला ठाऊक नाही ते आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्यांना विचारण्यात त्यांना कधी कमीपणा वाटत नसे. "मी मुख्याध्यापक" असा त्यांच्या चेहर्‍यावर कधी भाव नसे. कधी प्रत्यक्ष तर कधी दूरध्वनीवरून त्या सदैव शंका समाधान करून घेत असत. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट करणं, हा त्यांच्या दैनंदिन व्यवहाराचा एक चांगला भाग होता. त्यांच्या बोलण्यातील माधुर्य, नम्रता यामुळे ऐकणारा कधीही त्यांचा शब्द ओलांडून जाऊ शकत नव्हता.
   शाळांच्या भेटीदरम्यान किंवा शासकीय कार्यालयात जात असताना अनेकदा डी.एस. कोठारी कन्या शाळेत जाण्याचा योग आला. कार्यालयात गेल्यानंतर कळायचे सौ. वैशंपायन मॅडम नववी-दहावीच्या वर्गावर शिकवायला गेलेल्या असत. असे दृश्य आज-काल शाळांमध्ये फारसे पाहायला मिळत असेल, असे वाटत नाही.
    शाळांमधील गरीब आणि होतकरू विद्यार्थिनींची पालक म्हणून जबाबदारी घेणे हा त्यांचा एक आवडीचा छंद! परंतु , त्याचा कधी बोभाटा त्यांनी केलेला आठवत नाही. बऱ्याचदा स्वतःची पदरमोड करून विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजा त्यांनी पूर्ण केल्या. विद्यार्थ्यांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
    माझ्या माहितीनुसार शाळेच्या परीक्षा समितीमध्ये त्यांनी अनेक वर्ष उत्तम काम करून स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला आहे.
   त्यांच्याबाबत विशेषत्वाने अधोरेखित करण्यासारखी गोष्ट ही आहे की, त्यांनी आपल्या स्टाफ मधील सर्वांशी समान संबंध ठेवले. खास अशी मैत्री त्यांनी कोणाशी केली नाही. कोणाचा राग, द्वेष, मत्सर, तिटकारा कधीही केला नाही.
    सुस्वभावी आणि मितभाषी असलेल्या सौ. वैशंपायन मॅडम ह्या अजातशत्रू आहेत.
    निस्वार्थ सेवेचा कुटुंबाचा वारसा त्यांना मिळाला असावा. मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी वाटेल ते श्रम आणि मेहनत सौ. वैशंपायन मॅडम यांनी केली. त्यांचा मुलगा आपल्या पेठे विद्यालयाचा गुणवंत माजी विद्यार्थी असून एम.टेक ची पदवी संपादन करून सध्या आय.आय.टी.गांधीनगर येथून पी.एचडी. चा अभ्यास करीत आहे. त्यांची कन्या पुणे येथे स्थायिक झाली असून चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे.
     विशेष म्हणजे त्यांनी कधी इतरांना कमी लेखले नाही. सर्व स्टाफला विश्वासात घेऊन काम करून घेण्याची हातोटी सौ.वैशंपायन मॅडम यांच्याकडे होती.
    एकदा एक गुलाब होता, त्याला आपल्या सौंदर्यावर खूप गर्व होता. त्याला एकच दुःख होते की तो काटेरी कॅक्टस शेजारी वाढत होता. दररोज गुलाब त्या कॅक्टसचा दिसण्यावरून अपमान करीत असे, पण कॅक्टस शांत असे, बागेतल्या इतर रोपट्यांनी गुलाबाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण गुलाब स्वतःच्या सौंदर्याबद्दल खूपच जागरूक होता. एकदा उन्हाळ्यात बागेतली झाड़े कोरडी पडली. गुलाब कोमेजू लागला. गुलाबाने पाहिले एक चिमणी तिची चोच पाण्यासाठी कॅक्टस मध्ये डुबवत होती. गुलाबाला खूप लाज वाटली. तरीसुद्धा त्याने कॅक्टस ला विचारले,"मला पण पाणी मिळेल का?" दयाळू कॅक्टस लगेच "हो" म्हणाला.
    आपल्या दयाळू आणि प्रेमळ स्वभावाने सौ. वैशंपायन मॅडम यांनी सर्वांच्या हृदयात स्थान मिळविले आहे.
     शासनाच्या नियत वयोमानानुसार त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे एक संस्कारशील, उपक्रमशील ,विद्यार्थीप्रिय, आदर्श शिक्षिका, तसेच उत्तम प्रशासक संस्थेतून निवृत्त झाल्यामुळे निश्चितच उणीव भासणार आहे.
     सेवानिवृत्तीनंतरही श्री. व सौ.वैशंपायन दाम्पत्यास निरामय आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


श्री.शैलेश पाटोळे
उपशिक्षक
पेठे विद्यालय नाशिक
दि.३१/३/२०२१
नाशिक.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
   

Monday, March 22, 2021

ग्रंथ परीक्षण- तंतुवाद्य

      तंतुवाद्य (सतार शिकण्याचे पहिले पुस्तक)

   "साहित्यसंगीतकलाविहीन:
   साक्षात्पपशु: पुच्छ विषाणहीन: ll "
          भर्तृहरी यांच्या वरील नीतीश्लोकानुसार, जो मनुष्य केवळ दैनंदिन पोट भरण्यापुरताच मर्यादित राहत असेल तर पशूमध्ये आणि त्या मनुष्यात काहीही फरक नाही. मनुष्याचं रूप धारण केलेला तो केवळ पशूच असतो! केवळ खाणेपिणे आणि सुखोपभोग हेच त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असते.जो मनुष्य साहित्य, संगीत, कला यापासून लांब असतो, त्याची अवस्था शिंगे आणि शेपटी नसलेल्या पशु सारखी असते. भर्तृहरी यांनी नीतिशतकम् या १०० श्लोक संग्रहात कलेचे महत्त्व विशद करताना वरील विवेचन केले आहे.
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात..
       कला असे मानवासि भूषण
    एरव्ही कोण पुसतो आणिक |
      तुम्ही आहात राव की रंक..
          यासी कोणी पुसेना ||
  कलेचे महत्त्व सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात की, कला हेच माणसाचे भूषण आहे. आपल्याकडे कोणती तरी कला अवगत असावी. नाही तर ,"प्राणी जन्मला आणि मेला ."
  मानवाचा जन्म वाया गेला 
कला ही आपली खरी ओळख असते. कलेचे मानवाच्या जीवनातील स्थान असे अनन्यसाधारण असते.
    प्राचीन काळापासून राजे -  महाराजांनी कलेला राजाश्रय दिलेला दिसून येतो. त्या सर्वात संगीत कलेला विशेष महत्त्व दिसून येते.
    सध्याच्या काळात संगीत कला जोपासायची अथवा शिकायची असल्यास अनेक साधने, स्त्रोत अथवा शाळा उपलब्ध असतात. प्राचीन काळात मात्र कला शिकण्यात अनंत अडचणी येत.
     मानव हा मुळात गायन प्रिय प्राणी आहे. गायन आणि वाद्य यासारखी मनोरंजन करणारी दुसरी गोष्ट नाही.मनुष्य कितीही व्यग्र असला ,गायन किंवा वादनाने तो आनंदित होतो. केवळ मनुष्यच नव्हे तर पशुपक्षी देखील गायन वादनाने मंत्रमुग्ध होतात.महाभारत काळात श्रीकृष्णाच्या पाव्याच्या मंजूळ स्वरांनी पशुपक्षी तल्लीन होत. सर्वांना मोहिनी घालण्याचे सामर्थ्य संगीतात आहे, हे मात्र नि:संशय.
    दैनंदिन काम करत असताना आपल्याला विश्रांतीची आवश्यकता असते. प्राचीन काळी या कामी गवय्ये अथवा बज्वैये यांची व्यवस्था राजेरजवाडे करीत. संगीत कलेत गायन आणि वादन यांना तितकेच महत्त्व आहे.
   ब्रिटिश भारतात येऊन गेल्यानंतरच्या कालखंडात संगीत शिक्षण क्षेत्रातही पाश्चात्त्य तंत्रज्ञानाचा प्रभाव पडला. त्यापूर्वीच्या काळात गायन, वादन नृत्य,आदी कला शिकायच्या असल्यास फारशा सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या किंवा त्यावर आधारित मार्गदर्शन पुस्तकाच्या रूपात उपलब्ध नव्हते.
     काही कलासक्त मंडळी मात्र आपापल्या परीने धडपड करताना दिसून येतात.१८७२ यावर्षी प्रकाशित झालेले' तंतुवाद्य' हे सतार शिकण्याचे पहिले पुस्तक वाचनात आले. लेखकाने उल्लेख केल्याप्रमाणे सतार या विषयाला वाहिलेले हे पहिलेच पुस्तक असावे. मुंबईच्या एशियाटिक छापखान्यात हे पुस्तक छापले गेले आहे. पुस्तकाचे लेखन सूर्याची सदाशिव महात्मे आणि विश्वनाथ रामचंद्र वकील या दोन तज्ज्ञांनी केले आहे. विशेष म्हणजे सदर पुस्तक आपल्याला कुठे उपलब्ध होऊ शकेल याचा उल्लेखही पुस्तकात केलेला आढळून येतो.
    मुखपृष्ठानंतर प्रास्ताविकाच्या आधीच तीन नकाशे जोडलेले असून, त्यात चल थाटाची सतार, अचल थाटाची सतार आणि तारा जुळण्याची सतार आकृती, सुचीसह दर्शविली आहे.
   पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ भक्कम अशा पुठ्ठा बांधणीचे आहे. सताऱ् तंतुवाद्य शिकण्याच्या दृष्टीने आवश्यक रचना, बैठक, स्वर, ताल, राग या बाबत सविस्तर माहिती हे पुस्तक आपल्याला देते.
    मुळात सतार हे तंतुवाद्य मूळ पर्शियन असावे. तेराव्या शतकात अमिर खुसरो यांनी हे वाद्य शोधले, असा दावा केला जातो. प्रारंभीच्या काळात तीन तारा असलेले हे वाद्य  त्रितंत्री म्हणून ओळखले जात होते. भारतात आल्यानंतर सात तारा असलेले हे वाद्य सतार म्हणून प्रचलित झाले.
    सतार हे तंतुवाद्य शिकणाऱ्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, त्या सोडविण्याच्या अनुषंगाने हे पुस्तक लिहिलेले आहे.अलीकडच्या काळात सतार वर्ग चालविणाऱ्याचादेखील इतका व्यासंग असतोच,असे नाही. तेव्हा शिकणाऱ्यांना स्वगृही राहून शास्त्रशुद्ध सतार शिकण्याकरिता या पुस्तकाचा लाभ होईल.
    पुस्तकाची पृष्ठसंख्या १२४ इतकी असून, सहा प्रकरणांमध्ये आशयाची विभागणी केली आहे. पहिल्या प्रकरणात, गायनातील ध्वनी किंवा स्वरूप सा रि ग म प ध नि यांची ओळख करून दिली आहे. मुख्य राग त्यांच्या रागीनी म्हणजे भार्या व त्यांची संतती म्हणजे जिल्हे ,यांची ओळख करून दिली आहे . गायनातील आणि वादनातील संज्ञा उदाहरणासह समजावून सांगितले आहेत. थोडक्यात,या प्रकरणातून सतार वादनातील पायाभूत माहिती आपल्याला मिळते.
    दुसऱ्या प्रकरणात सतार वाद्याच्या रचनेची प्रामुख्याने ओळख करून दिली आहे. सतारीच्या तारा ,खुंट्या, घोडी, तारदान ,पडदे, कट ,थाट, चल किंवा अचल यातील भेद स्पष्ट केला आहे. सतार लावणे, सतारीची स्वर सप्तके ,आरोह-अवरोह, याची ओळख या प्रकरणातून होते.
   सतार कशी धरावी? हे विशद करणारे तिसरे प्रकरण महत्त्वाचे वाटते. सतारीच्या तारांवर बोटे कशी फिरवावी, काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन मिळते. सतारीचे बोल, स्वर वाटिका, विविध चिन्हे, तसेच सरावाचे महत्त्व पटवून दिले आहे.
    सतारीच्या वाद्यात पाच प्रकारच्या गमका असतात. त्यांचा कसून सराव झाल्यावाचून पुढील अभ्यास करू नये .असे चौथ्या प्रकरणात आवर्जून सांगितले आहे.
   पाचव्या प्रकरणात सतारीच्या गती, विविध राग, यांचे नोटेशन दिलेल्या आहेत. ती शिकणाऱ्यांसाठी सराव करणेकामी उपयुक्त ठरतात.
  भूप, हमिर, केदार,छायानट, यमन कल्याण,खमाज, मालकंस या रागांच्या गती, आरोह-अवरोह सहाव्या प्रकरणात मांडल्या आहेत.
   अशा रीतीने जणू एखाद्या गुरु कडून आपण प्रत्यक्ष शिकत असल्याचा भास या पुस्तकाच्या वाचनातून होतो. तशी पुस्तकाची भाषाशैली आहे. शास्त्रशुद्ध सतार शिकण्याची इच्छा असणाऱ्यां  करिता हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरेल.
  सध्याच्या कोरोना लॉकडाउनच्या परिस्थितीत क्लासेसना प्रत्यक्ष जाता न येणाऱ्यांसाठी तसेच ऑनलाईन सतार शिकणाऱ्यांसाठी देखील हे पुस्तक अधिक फायद्याचे आहे, हे नक्की !
  मुळातच लेखक स्वतः सतारवादनात पारंगत आहेत,हे त्यांच्या निवेदनाच्या शैलीवरून लक्षात येते."जे जे आपणासी ठावे l ते ते लोकांशी सांगावे l 
शहाणे करून सोडावे ll सकळ जन ll
हा लेखकांचा उदार दृष्टिकोन या ग्रंथप्रपंचावरून लक्षात येतो.

 श्री.शैलेश पाटोळे
 उपशिक्षक
 पेठे विद्यालय नाशिक
(संदर्भ: न्या.रानडे मोफत वाचनालय,नाशिक)

Thursday, March 18, 2021

आनंदाचे डोही l आनंद तरंग l

                         आनंदाचे डोही l आनंद तरंग ll
      एका सुंदर सजवलेल्या हॉलमध्ये एका वक्त्याचे भाषण सुरू होते. साधारण शंभर लोक भाषण ऐकत होती. तेवढ्यात वक्त्याने अशी उद्घोषणा केली की, मी प्रत्येकाला एक फुगा देणार आहे. त्या फुग्यावर प्रत्येकाने आपले नाव लिहा. नाव लिहून झाल्यावर सर्व फुगे त्याने गोळा केले. संपूर्ण हॉल मध्ये फुगे विखुरले गेले. वक्त्याने मग सर्वांना सूचना केली की, आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःचा फुगा शोधून स्वतःजवळ ठेवा. शंभर फुग्यांमध्ये स्वतःचा फुगा शोधणं जवळपास कोणालाच शक्य झाले नाही. थोड्या वेळानंतर वक्त्याने सांगितले की ,आता मिळेल तो फुगा तुम्ही पकडा आणि त्यावर ज्याचे नाव असेल त्याला तो फुगा द्या. अगदी दोन मिनिटात ज्याचा फुगा त्याला मिळाला.
         सर्वजण आपापल्या जागेवर बसले आणि मग वक्त्याने भाषणाचा समारोप करताना म्हटले की, स्वतःचा आनंद शोधतांना विखुरलेल्या फुग्यातून स्वतःचा फुगा शोधणे जसे अवघड गेले, तसे आनंदाचे आहे. त्याऐवजी दुसऱ्याचा फुगा आपल्या जवळ आल्यानंतर ,आपण त्या व्यक्तीकडे तो सुपूर्द केला. त्यातून ,माझा फुगा मला मिळाल्याचा आनंद झालाच परंतु दुसऱ्याच्या आनंदाला आपण कारणीभूत ठरतो आहे.याचा आंतरिक आनंद काही औरच असतो. सुख आणि आनंद यात हाच खरा फरक आहे.
   मित्रांनो, तुम्ही म्हणाल, आता ही गोष्ट सांगण्यामागे कारण काय? सांगतो..
   दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेमार्फत सन.२०१२ पासून १५६ देशांचा जागतिक आनंद अहवाल जाहीर केला जातो. नुकताच २०२० यावर्षीचा अहवाल प्रसिद्ध झाला . देशांमधील नागरिकांचे उत्पन्न, निरोगी जीवन, सामाजिक स्तर ,स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता या घटकांचा विचार करून अहवाल तयार केला जातो.
    आता तुम्ही म्हणाल यात आपला म्हणजे भारताचा क्रमांक कितवा? अंदाज करा बरं.....!
या अहवालात भारताचा क्रमांक आहे १४० वा...!!
पहिला क्रमांक आहे, फिनलंड या देशाचा. यावरून आपण भारतीय किती आनंदी आहोत,याची कल्पना आपल्याला आली असेलच ! या अहवालाने आपण भारतीयांना आरसा दाखवला आहे, हे मात्र खरे !
    केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील सर्व देशांचा आनंदी असण्याचा आलेख घसरत चालला आहे. जगात आर्थिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचा क्रमांक देखील एकोणिसावा आहे. ही अधिक चिंताजनक बाब आहे. याचाच अर्थ असा पैसा,धन, संपत्ती असणे याचा आनंदाशी काहीही संबंध नाही.
            या वर्षाच्या आनंद दिवसाची थीम आहे," सर्वांसाठी एकत्रित आनंद ".(Happiness for all together ). जागतिक मानव कुटुंबातील ७.८ अब्ज मानवी सदस्यांना म्हणजे पृथ्वीवरील सर्व मानवजातीला कोविड - १९ विरुद्ध लढण्यासाठी एकता आणि दृढ संकल्प करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन यातून केलेले आहे.
        आनंद म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांना आयुष्यभर पडत असतो. सुख मिळविण्यासाठी सर्वजण धडपड करत असतो. कुणाला तो गवसतो तर अनेकजण खऱ्या आनंदाला मुकतात.
  आनंद मिळाला म्हणजे मनुष्य खुश होतो. सुखी होतो .आनंद ही एक मानसिक किंवा भावनिक स्थिती आहे. यामध्ये सकारात्मक समाधानी भावना दर्शविली जाते .आनंद हा आपली मानसिक आणि भावनिक स्थिती चांगली ठेवतो.
   सुख आणि आनंद यात काही फरक आहे का?
सुख हे भौतिक गोष्टींशी निगडित आहे आणि आनंद आंतरिक गोष्टींशी. रस्त्यावर चालताना मला दहा रुपये सापडले आणि मी आनंदी झालो. कारण ते माझे नव्हते, तरी ते मला मिळाले. माझ्या मित्राला शेअर मार्केट व्यवसायात एक लाख रुपये मिळाले परंतु,तरीही तो दुःखी कारण त्याची अपेक्षा दोन लाखांची होती.
     घरात सर्व सुखसोई, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, फ्लॅट,गाडी,नोकरी, पत्नी-मुले ,इतके असले की, मी सुखी होईल असे सर्वांना वाटते. परंतु, हे सर्व असूनही माणूस आनंदी असतो का?
    सापेक्ष आणि निरपेक्ष कर्म या दोन गोष्टी आनंदासाठी कारणीभूत असतात. कोणतेही कर्म करताना अपेक्षा ठेवून कर्म केले की,आनंद मिळण्याची शक्यता कमी होते. त्याउलट निरपेक्ष निस्वार्थ भावनेने कर्म अथवा कार्य करीत गेल्यास आनंद प्राप्तीची शक्यता शतपटीने वाढते.
    अपेक्षा या वाढतच असतात. अपेक्षापूर्ती झाली की आनंद आणि अपेक्षा भंग झाला की दुःख! याचा अर्थ सुख मानण्यावर अवलंबून असतं .म्हणजे माझे सुख माझ्या आचार-विचार ,अपेक्षांवर अवलंबून असते .याचा सरळ अर्थ असा आहे की , आपल्याला बाहेरून कोणीही सुखी अथवा दुःखी करू शकत नाही. आपल्या सुखदुःखासाठी आपणच कारणीभूत असतो.
    मुलगा किंवा मुलगी झाल्यावर त्याने किंवा तिने आई - बाबा असा शब्द उच्चारल्या नंतरचा जो आनंद असतो, तो खरा आनंद. पहिल्या पावसात मातीचा गंध आल्यानंतरचा आनंद, आपण लावलेल्या झाडाला फळे किंवा फुले आल्याचा आनंद,आपल्या वागण्या बोलण्याने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आनंद पसरतो तेव्हा आपला आनंद गगनात मावेनासा होतो. सुखाचा आनंदाशी संबंध नसतो. मग आपण का सुखाच्या मागे धावतो?
     महागडी- मऊ लुसलुशीत गादी.. हे सुख आणि शांत झोप... हा आनंद ! छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता आला पाहिजे. तो साठवता आला पाहिजे . आनंद वाटता आला पाहिजे ,हे मात्र सर्वात अवघड असते.
    जीवनाचा खरा आनंद निस्वार्थ सेवेत आणि दुसऱ्यांच्या आनंदात लपलेला असतो. 
            एकदा काही मच्छीमार बांधव मासेमारीसाठी खोल समुद्रात बोटीने जातात. परंतु काही कारणामुळे त्यांना दिवसभरात मासे मिळाले नाहीत. परंतु एक देव माशाचे लहानसे पिल्लू त्यांच्या बोटी जवळ पुन्हा पुन्हा येत होते. आपल्या सर्वांना माहीत आहे की, जगभरात देवमाश्याच्या लहान पिल्लांची शिकार करण्याला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे ते मच्छीमार देवमाशाच्या पिलाला पकडू शकत नव्हते. मात्र,ते पुन्हा - पुन्हा बोटीच्या जवळ येत होते. तेव्हा, मच्छीमारांच्या प्रमुखाला लक्षात आले की, त्या छोट्याशा पिलाच्या शेपटीला एक दोरखंड गुंडाळला गेला होता. त्यामुळे त्याला खोल समुद्रात जाता येत नव्हते. जणू काही मच्छीमार बांधवांकडे ते मदतीची अपेक्षा करत होते. मच्छिमारांनी मोठ्या प्रयासाने त्याच्या शेपटाला गुंडाळले गेलेले दोरखंड बाजूला केले. पिलाला मदत झाली. त्याने शेपटी हलवून आनंदाने सर्वांचे जणू आभार मानले. दिवसभरात फार मासे मिळाले नसले तरी त्या छोट्याशा पिलाला मदत केल्यामुळे, त्याला झालेला आनंद पाहून सर्व मच्छीमार आनंदी झाले. आनंद हा असा असतो. परोपकारात तो दडलेला असतो.
    कोणाला सतत एखाद्या कार्यात मग्न राहिल्याने आनंद मिळतो. कोणाला इतरांना काहीतरी मदत केल्याचा आनंद मिळतो.काहींना रोज नवनवीन मित्र जोडले गेल्याने आनंद मिळतो. शिक्षकांना आपले विद्यार्थी यशस्वी झालेले दिसले की,आनंद होतो. एखाद्या गृहिणीला घरातल्या सर्वांना पोटभर खाऊ घातल्याने आनंद होतो.कोणाला ज्येष्ठांची सेवा, लहानांशी मौजमस्तीत आनंद मिळतो. मित्रांशी गप्पा,चेष्टा-मस्करी यात कोणाला आनंद मिळतो.कोणाला वाचन- लेखन- चिंतन यात आनंद मिळतो.तर कोणाला मस्तपैकी सकाळ संध्याकाळ फेरफटका मारल्याने आनंद मिळतो. व्यक्ती तितक्या प्रकृती,या न्यायाने आनंद मिळण्याची कारणे देखील भिन्नभिन्न असू शकतात. 
     ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आणि राजेश खन्ना यांच्या अभिनयाने नटलेला.. आनंद, आपण सर्वांना खरेतर मार्गदर्शक आहे. असाध्य व्याधीमुळे मृत्यू जवळ दिसत असूनही आपले दुःख जगापासून लपवून,उरलेले दिवस आनंदाने जगणारा आनंद तुम्हा - आम्हाला जीवनानंद शिकवून जातो.
    परंतु ,दुसऱ्याला यातना देऊन स्वतःला जर आनंद मिळत असेल, तर ही राक्षसी प्रवृत्ती मानली जाते. अशा कृतीने मिळणारा आनंद चिरकाल टिकत नाही. हा आनंद वरवर आणि तात्पुरत्या स्वरूपाचा असतो.
  स्वतःच स्वतःशी जोडलं जाणं म्हणजे आनंद !
            आनंद कशात असतो?
   प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असतो आणि तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे होत असतो.ही भ्रामक समजूत लोकांनी करून घेतली आहे.त्यामुळे प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. अगदी साधे उदाहरण बघा ,सुट्टी मिळाली की आनंद होईल.या आशेवर आपण कामाचे दिवस ढकलत असतो.
    कुणाला आनंद कशात वाटेल,हे सांगता येत नाही.एखाद्या भिकाऱ्याला पोटभर अन्न मिळालं की आनंद होतो. कुणाला शांत झोप मिळाली की आनंद होतो.कुणाला प्रवासात तर कुणाला आराम करण्यात आनंद मिळू शकतो.
   आपण अशाश्वत गोष्टींपासून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो.अशा गोष्टी परिवर्तनशील असतात म्हणून त्यातून मिळणारा आनंद चिरंतन नसतो.
       मित्रांनो आनंद कसा मिळवाल?
त्यासाठी इतरांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवा. अपेक्षापूर्ती झाली नाही, तर आनंदाची जागा दुःखाने भरली जाते. रोज जीवन जगताना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. एखादी छोटीशी गोष्ट आपल्या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकते. व्यायाम आणि ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करा.कारण निरोगी शरीर आणि आनंद यांचा घनिष्ठ संबंध आहे. वेळोवेळी आवश्यक तेवढे जेवण करा. त्याने मन तृप्त व शांत राहते.
     अतिविचार करणे टाळा. ज्यामुळे आनंद मिळण्याऐवजी मानसिक त्रास होण्याची शक्यताच अधिक असते. जीवनात सफलता,मैत्री, प्रेम हे सर्व अनुभव आहेत .जर ते मिळाले तर चांगलेच.अन्यथा वाईट अनुभव म्हणून सोडून द्यायला देखील शिकले पाहिजे.आपल्या जीवनात अनेक संधी आपल्याला मिळत असतात, त्या पकडायला शिका.
    खरं तर फार अवघड आहे.. परंतु तरीही खरं बोलायला शिका. कारण जर आपण खोटे बोललो तर ते लपवण्यासाठी अजून शंभर खोटे बोल बोलावे लागतात.
   दिवसातील काही वेळ आपल्या आवडीचा छंद जोपासण्यासाठी घालवा. जसे मनपसंत गाणी ऐकणे , नृत्य करणे, पाककला किंवा अजून आपल्या आवडीनुसार...
   एक मात्र खरं ,आपलं मन शांत आणि डोकं हलकं होऊ शकेल, अशी कोणतीही एक व्यक्ती आपल्या सान्निध्यात असावी. ज्याचे जवळ आपण निसंकोचपणे सर्व काही बोलू शकू. कुटुंबाचा आणि मित्रांचा सहवास आपल्याला निश्चितपणे आनंदी ठेवतो. त्यांच्यासाठी योग्य वेळ द्या.
   शेवटी, आनंदाचे डोही l आनंद तरंग...
परंतु,आजकाल लोकांच्या आनंदाच्या व्याख्या बदलत आहेत.आनंद अनुभवण्यापेक्षा तो दाखविण्याकडे कल वाढत चालला आहे .वाढदिवस पार्ट्या विविध डेज ,लग्न समारंभ, इत्यादी. आनंद साजरा करण्यात बाजारूपणा येत चालला आहे. जणू मी किती सुखी आहे. आनंदी आहे, हे दाखविण्याची स्पर्धा समाजात रूढ झाली आहे.
   प्रत्येक माणूस समाजाचा घटक आहे ,हे प्रत्येकाने जाणून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. नाही तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊन समाज व्यवस्था बिघडू शकते. आज कुटुंब व्यवस्था पार कोलमडली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातील लहान-थोरांवर आपोआप संस्कार होत असत. घरातील सदस्यांना इतरांकडून प्रेम, माया, लळा - जिव्हाळा मिळत असे .काय चांगले, काय वाईट, याची जाणीव होत असे.सर्व निर्धास्त जीवन जगत. कोणताही ताण तणाव त्यांच्या आयुष्यात नसे. आजच्या मुलांना असे जीवन जगण्याची संधी मिळते का ? नाही ! परंतु, आज मन मानेल तेच, स्वैर,स्वच्छंद,धुंद, मस्त जीवन जगण्यात माणसाला रस आहे. यातून एकत्र कुटुंब पद्धती उद्ध्वस्त झाली आणि विभक्त कुटुंब पद्धतीला खतपाणी मिळालं. विभक्त कुटुंबात आई-वडील आणि एखादे मुल.आई-वडील नोकरीत व्यस्त. कामाच्या व्यापाने थकून-भागून आई वडील घरी परततात. मुलांची मानसिक भूक शमविण्याची इच्छा असूनही त्यांना ते शक्य होत नाही .पुढे मुले मोठी होतात. आई-वडिलांऐवजी ते मित्रांमध्ये रमतात. टी.व्ही., मोबाईल किंवा इतर आक्रस्ताळी तंत्रज्ञानाच्या आहारी जातात. त्यावेळी ते नकळत आई-वडिलांपासून दूर लोटले जातात. आई वडील आणि मुलांमध्ये वाद-विवाद ,मतभिन्नता वाढू लागते. पुढे मुलांची लग्न होतात .आई-वडील जेष्ठ नागरिक बनतात आणि आपोआप आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यास मुले धजावतात.अशा रीतीने कुटुंब व्यवस्था पार कोलमडली आहे.कुटुंब सुखी तर समाज सुखी. युनायटेड नेशन च्या अहवालात नमूद भारतीयांची ही सामाजिक परिस्थिती कमीजास्त फरकाने भारतभर सारखीच आहे.
             पैशांच्या मागे धावून चिरंतन सुखाला पारखी होण्यात लोक आपली हयात घालवतात. त्यांना पैशामुळे अशाश्वत सुख मिळते. परंतु, आनंदप्राप्ती होत नाही.तेव्हा एकमेकांना जाणून घेऊन, एकमेकांशी जुळवून घेऊन, एकमेकांना सहाय्य करून ,एकमेकांना सुखी करू .हा मूलमंत्र सर्वांनी जपण्याची गरज आहे.
   आपल्या जीवनात येणारे सुखाचे क्षण हे आपण आनंदाचे मानतो. त्यामुळे आपल्या मनाला आनंद होतो. काही काळापुरता दुःखाचा विसर पडतो. जीवनात आनंद आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु ,आपले मन केवळ आनंदाचे क्षण अपेक्षित करते. आनंदा नंतर दुःख येणारच. तेव्हा दुःख देखील आपण सहज भावनेने स्वीकारले पाहिजे .मनाचा समतोल राखण्यासाठी हे आवश्यकच आहे. "सुख पर्वता एवढे दुःख जवापाडे", असे म्हणून जीवनातले आनंदाचे क्षण शोधले पाहिजेत.
     जागतिक अहवालानुसार आपल्या देशातील सर्वांचे जीवनमान उंचावेल, अशी अपेक्षा करू या. अनावश्यक चिंता, विविध कारणांमुळे निर्माण होणारी उदासी आणि क्रोधासह नकारात्मक भावनांमध्ये घट होऊन, नकारात्मक अहवाल सकारात्मकते कडे वाटचाल करेल, अशी आशा बाळगू या.
     सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात आपण सुरक्षित, एकत्रित व आनंदी रहावे हीच सदिच्छा..!!

आपला,
श्री.शैलेश पाटोळे
२० मार्च २०२१
जागतिक आनंदी दिवसाचे निमित्ताने
नाशिक
🌹🌹🎭🌹🎭🌹📺🌹🎙️🌹🎤🌹🎧
    

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...