नमस्कार
बदलते राजकारण,समाजकारण, कुटुंब व्यवस्था इतकेच काय आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण यांसारख्या विविध विषयांवर सामान्य माणसाचे देखील त्याचे स्वतःचे एक मत असते. परंतु त्याचे हे मत त्याच्यासारखेच सामान्य वाटून त्याला कुठेच व्यक्त होऊ दिले जात नाही.किमान तशी संधी त्याला मिळत नाही. अगदी चहाच्या कट्ट्यावर, समवयस्कांमध्ये, ऑफिस- कार्यालयात इतकंच काय कुटुंबात देखील अव्हेर करण्याइतके त्याचे मत सामान्य मानले जाते ! मत व्यक्त करण्याबाबत त्याची कुचंबना होतच असते... अशा सामान्यातले असामान्य प्रतिभा असलेले काहीजण व्यक्त होण्यासाठी लेखणीचा आधार घेतात... आणि व्यक्त होतात मनसोक्त ...कागदावर ! व्यक्त झालेल्या या भावना गद्य किंवा पद्याचा आकार घेतात. अशांपैकी काही निवडकांचे व्यक्त होणे पुस्तक किंवा ग्रंथांच्या रूपाने लोकांपुढे येतात.....
सुहास केशव वेल्हाणकर हे असेच सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्व!
अल्पावधीतच प्रकाशनाच्या क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या शब्दमल्हार प्रकाशनने एप्रिल २०२४ मध्ये मनाच्या तळीचा पाझर हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला. ७५ कविता, बालकविता, चारोळ्या, दोन-तीन हिंदी रचना या संग्रहात आहेत.
" सुंदर फुलांच्या बागा जगभर आहेत, म्हणून आपण आपल्या अंगणात बाग फुलवायचीच नाही का..? स्वानंदासाठी केलेल्या कवितांचा हा संग्रह असल्याची पुष्टी प्रस्तावनेत ज्येष्ठ कवी नरेश महाजन यांनी जोडली आहे.
शासनाच्या अकाउंट - ऑडिट विभागातून निवृत्त झालेले अधिकारी सुहास वेल्हाणकर यांना वयाच्या पन्नासाव्या वर्षी पहिली कविता सुचली आणि आज ८० व्या वर्षात असताना त्यांचा हा कवितांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. खरंतर रोजचे ऑफिसचे काम, अकाउंट ऑडिट सांभाळणं, शासन निर्णयांचं वाचन - अभ्यास, शासकीय पत्रव्यवहार या सर्वांमुळे दैनंदिन कामाचा नक्कीच ताण वाढू शकतो. यातून मुक्त होण्यासाठी वेल्हाणकरांनी कविता करण्याचा जोपासलेला छंद त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दर्शवतो.
आशयाच्या अंगाने त्यांच्या कवितांचा विचार केला तर त्यामध्ये विविधता आढळून येते.
चांदणे हासते,मंदावली पावले, मनातला मधुबन, प्रीत अशी यांसारख्या कविता सखी बद्दलच्या भावना व्यक्त करणाऱ्या अलवार प्रेम कविता आहेत. तो आणि ती च्या संवादाच्या या कविता आहेत. ती चे वर्णन करताना कवी म्हणतो,
ओठ तुझे तर चुप्पी साधून
लज्जा होती घुंघट ओढून
डोळ्यांमध्ये भाव अनामिक
खेळत होते छापा पाणी ll
मध्यमवर्गीयांचे जीवन, साहेब-कारकून आणि शिपाई, सामान्य माणूस आणि नोकरदाराच्या पाचवीला पुजलेला दुःख आसवांचे पूर या कवितेत कवी व्यक्त करतो.
" बरबाद जीवनाचा शोक करणे व्यर्थ होते
शोधणे वादळांचे अर्थ तेही व्यर्थ होते."
राजकारणी लोकांच्या भूलथापा आणि त्यांना बळी पडणारे सामान्य जन पराभूत प्रेषित मधून दिसतात. जीवावर उठले मधून गरिबांची कुचंबना लक्षात येते. सामान्यांवर होणारा अन्याय आणि त्यांची होणारी मुस्कटदाबी जखमी पक्षी मधून व्यक्त झाली आहे. धूर्त राजकारणी, भ्रष्ट अधिकारी, पुढारी यांवर तिखट टीका कवितेतून कवी करतो.
अनुभवलेला निसर्ग, बदललेले समाज जीवन, व्यक्ती म्हणून आपल्यात झालेला काळानुरूप बदल, इत्यादी विषयांवर अतिशय संवेदनशील, कधी कधी खेळकर --- मिश्किल शैलीत कवीने आशय मांडला आहे.
बदललेल्या सामाजिक स्थितीची जाणीव करून देताना कधी म्हणतो,
पैसाच प्यार आहे
पैसाच यार आहे
पैशाविना माणसाची
सर्वत्र हार आहे.....
दुःख आणि हास्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या काही कवितांमधून अनुभवता येतो. उदाहरणार्थ: तेव्हा आणि आता, बाथरूम सिंगर या कविता.
आपण या समाजाचे घटक आहोत आणि म्हणून समाजाच्या अधोगतीला आपणच कारणीभूत असल्याची जाणीव कवीला होते.मग कवी स्वतःचीच हेटाळणी करतो. कवी जीवनाचे वास्तव सांगतो.
काही कविता अतिशय संवेदनशील असून वाचकांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. समाजात घडणाऱ्या अथवा घडवल्या जाणाऱ्या चोरी,भ्रष्टाचार, बलात्कार इ.घटनांचा धिक्कार कवीने केलेला दिसतो.
मढ्यांची कैफियत, जगण्याचे वर्म, फाटकी झोळी, चंद्रास चटका, विचित्र स्वप्न इत्यादी कवितांमधून कवीचे समाजभान अवतरले आहे.स्वतःच्या अंत्ययात्रेचे वर्णन करणारी त्यांची कविता वाचकांना नि:शब्द आणि अस्वस्थ करून सोडते.
पौर्णिमेच्या रात्री...
माझी चिता जळावी
शांत शितल चांदण्याने
अखेर तरी सहन व्हावी ll
ज्वाला चीतेच्या....
उंच आकाशाला भिडाव्या
माझ्या जाळणाऱ्या व्यथेने
चंद्रालाही चटका द्यावा..ll
गहिरा सागर, मोहरली फुलवेल, बळीराजाचे दुःख, देव दिसावा इत्यादी कवितांतून शेतकरी आणि शेतकऱ्याचे दुःख कवी वर्णन करतो.
" भिकेस लावी शेतकऱ्यांना उद्योगाची सेझ
सत्तेची सुंदरी सजविते धनवंताची शेज"
काही कवितांतून कवीच्या विनोदी आणि मिश्किल स्वभावाची कल्पना येते..
पाजणार कोणी आहे
म्हणून काय पित सुटावी ?
जनाची नसली तरी
मनाची काही असावी ...!
पेरीत जावे मनामनातून आनंदाचे गाणे असा कवीचा तरल आशावाद कवितांमधून दिसून येतो.
नवे शतक म्हणून २१ व्या शतकातील तरुण विद्यार्थी कसा दिशाहीन होत चालला आहे.. त्याचं वर्णन एका कवितेत करताना कवी म्हणतो...
लहानपणीच डोळ्याला ढापण लावून
पाठीवरच्या ओझ्याने कमरेत वाकून
पहा तो कसा चालला आहे...
एकविसाव्या शतकाचा सूर्य तो पाहत आहे...
शाळेचे दिवस, नंदूचे स्वप्न, सारख्या अविट गोडीच्या बालकविता या संग्रहात असून लहान मुलांचे भावविश्व कवीने चपखलपणे साकारलं आहे.
नंदू ने मारली ढगांवर उडी
विजेची मग कडाडली छडी l
बदललेल्या सामाजिक स्थिती-गतीचे वर्णन करताना कवी म्हणतो...
द्रौपदीने बांधलेल्या चिंधीची
कृष्णाने लज्जा राखली
राखीने नेसलेल्या चिंधीची
मीडियाने मजा चाखली...
आपल्या आयुष्याचा संध्या -- काल जवळ येत असताना (वयाच्या ८० व्या वर्षी देखील!) कवीला आईची आठवण झाल्या वाचून राहत नाही.
सय आईची मध्ये आई बद्दलच्या अव्यक्त भावनांना कवीने वाट करून दिली आहे.
किती काळ झाला आई
भेटायची राहिली आहे.....
आत्मा म्हणे अमर असतात
इथून गेलेली माणसे स्वर्गात असतात....
या संग्रहात विशेष म्हणजे चार हिंदी कवितांचाही समावेश कवीने केला आहे. मैत्रीचं महत्त्व विशद करताना कवी म्हणतो..
रब तेरी दुनिया में जीना जरुरी है l
दोस्तो में तनहा रहू भी तो कैसे ll
उपमा- उत्प्रेक्षा, गेयता, शाब्दिक आणि व्याकरणिक चमत्कृती, कोपरखळ्या, विनोद, इत्यादींचा अंतर्भाव कवितेतून नजरेस पडतो.
वृद्धापकाळाकडे झुकलेल्या कवीच्या कवितेची बाग मात्र साऱ्यांचेच मन प्रफुल्लित आणि टवटवीत करते,हे मात्र खरे !
शैलेश पाटोळे
नाशिक
No comments:
Post a Comment