संस्थेच्या विविध शाळांतील स्काऊट्स आणि गाईडच्या विद्यार्थ्यांच्या ॲडवेंचर कॅम्पचे आयोजन कल्पक आणि स्काऊट साठी समर्पणाची भावना असलेले पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कैलास पाटील यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली यावर्षी पचमढी - मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आला होता. जवळपास १०० विद्यार्थी १० शिक्षकांबरोबर आम्हालाही त्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळाली. तसा मला लांबच्या प्रवासाचा मनस्वी कंटाळा ; परंतु मित्रांचा आग्रही आदेश मला टाळता आला नाही. जर मी काहीतरी कारण सांगून जाणं टाळलं असतं, तर आयुष्यातील निसर्ग निवासाची मोठी संधी गमावल्याचा पश्चाताप मला निश्चितच झाला असता !
मुख्याध्यापक कैलास पाटील आणि दहा शिक्षकांची टीम स्काऊटर्स आणि गायडर्स यांना घेऊन आधीच रेल्वेने रवाना झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी आमचा चमू पूर्वतयारीनिशी पचमढीवर स्वारी करण्यास निघाला. रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाल्याचा आनंद रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर मात्र पार विरून गेला. रिवा सुपरफास्ट एक्सप्रेस चक्क चार तास उशिराने नाशिक रोड स्टेशनवर आली. रेल्वेची वाट पाहणे म्हणजे आमच्या सहनशीलतेची परीक्षाच ! स्टेशनवर येणारी जाणारी माणसं, त्यांची लगबग, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, जवळून जाताना त्यांचा कर्ण कर्कश आवाज, मित्रा मित्रांची चेष्टा मस्करी,सारं भांडवल संपत आलं... साधारण रात्री नऊच्या सुमारास लोह गजगामिनी स्टेशनवर दाखल झाली. स्वेटर ,टोपी इत्यादी उगाच अंगावर चढवले असे झाले. आधी पोहोचलेल्यांनी थंडीची दहशत मनात भरवली होती; म्हणून जाड जुड लोकरी कपडे अंगात घातली. जवळपास भुसावळ जंक्शन येईपर्यंत या गाडीला सुपरफास्ट असं का म्हणत असावेत यावर चित्र विचित्र चर्चा झाली.विनोद, चेष्टा- मस्करी यात वेळ कळत नव्हता.पण तरीही गाडी नक्की कधी पोहोचेल ? असा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होताच. नाशिक ते पिपरिया जंक्शन असा जवळपास नऊशे किलोमीटरचे अंतर पार करायचं होतं. भुसावळ येईपर्यंत सर्वजण निद्राधीन झाले. सहा साडेसहा वाजता जाग आल्यावर कळलं आपण पिपरिया येथे पोहोचलो आहोत.रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. प्रचंड धूके, कडाक्याची थंडी आणि जोरदार पाऊस असा वातावरणाचा अनुभव घेण्याची ही पहिलीच वेळ ! होते नव्हते ते सारे उबदार कपडे, शाल अंगावर पांघरली. अशावेळी कशाचीही लाज वाटली नाही. पाऊस आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगावर घेतलेले पांघरून, कपडे यामुळे आमचा अवतार एखाद्या चित्रपटातील डाकू दरोडे खोरांसारखा वाटत होता ! आम्हीच एकमेकांकडे पाहून हसत होतो.अशाही स्थितीत फोटो घेण्याचा मोह मात्र टाळता आला नाही !
पिपरिया ते पचमढी हे मोटारीतून सव्वा दीड तासांचे अंतर आम्ही पार केले. दरम्यान समुद्रसपाटीपासून आपण उंचावर जात असल्याचे सहजी लक्षात आले. तीव्र नागमोडी वळणे तरीही नेहमीचे ड्रायव्हर अत्यंत सफाईदारपणे गाडी चालवत होते. दरम्यान लांबच लांब गव्हाची शेते आणि त्यावर पडणारा सूर्यप्रकाश.. अतिशय नयनरम्य दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारं होतं. जसजशी मोटार गाडी पुढे पुढे जाऊ लागली तसतशी शेती जाऊन घनदाट जंगल क्षेत्र सुरू झालं. उंच उंच वाढणारी विविध प्रकारची झाडी आणि वळणदार रस्ते काश्मीर आणि केरळची आठवण करून देत होते. दरम्यान एका ढाब्यावर खाल्लेला आलू पराठा आणि गरमागरम चहा शरीर आणि मनाला उब देऊन गेला. साधारणपणे आम्ही पोहोचलो तोपर्यंत धुकं जाऊन उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. प्रवासाला विलंब झाला असला तरी दाट धुके, पावसाळी सर्द हवा, हवेतला गारवा उंच उंच वाढलेली झादे, लांबलचक गव्हाची शेते, शुद्ध - स्वच्छ हवा, सारं काही आल्हाददायक होतं. त्यात समविचारी मित्रांची विनोदाची साथ होतीच! वय- हुद्दा- पद-प्रतिष्ठा सारं सोडूनआम्ही सर्वजण निसर्गाचा आनंद लुटत होतो.
ॲडवेंचर कॅम्प मधील सहभागी मुलांची राहण्याची व्यवस्था स्काऊट्सच्या नियमाप्रमाणे छान आणि भक्कम अशा तंबूत केलेली होती. जंगल क्षेत्र असूनही सुरक्षित व्यवस्था होती. आजूबाजूंनी जंगलाने वेढलेला हा परिसर अतिशय शांत निवांत आहे. विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठीची सोय जवळच केलेली दिसली. उंच वाढलेल्या झाडांवर माणसांपेक्षा माकडांची संख्या कितीतरी पटीने अधिक! माणसांकडे पाहून आपल्याला काहीतरी मिळेल या आशेने विशिष्ट आवाज काढणारी, या फांदीवरून त्या फांदीवर झोके घेणारी, कधीकधी दात विचकावणारी असंख्य लहान मोठी लाल काळया तोंडाची माकडे दिसून आली. आमचे सामान आम्ही एका झाडाला केलेल्या गोलाकार ओट्यावर ठेवून चहा घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेलो. पेट्रोलिंगची जबाबदारी असणारी दोन सातवीतली बालवीरांवर (मुले) लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या ट्रूप लीडरने दिली.चहा पिऊन परत येईपर्यंत आमच्या जेवणाच्या डब्याची पिशवी माकडांनी फस्त केली होती. छोट्या दिसणाऱ्या या माकडांनी आपली ताकद दाखवूनच आमचे स्वागत केले!
भारत स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात आम्ही आता आलो होतो. एकूण ५६ एकरचा परिसर. दाट झाडं झुडपं आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त इमारती, ऑफिस- कार्यालये, १९५६ मध्ये मध्य प्रदेशातील पचमढीची भौगोलिक स्थिती,नैसर्गिक परिसर, कॅम्पिंगसाठी उपयुक्त परिसर इत्यादी कारणांमुळे तत्कालीन स्काऊटचे राष्ट्रीय आयुक्त डॉ. हृदयनाथ कुंझरू यांच्या प्रयत्नामुळे या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली. मुळात हा लष्कराचा परिसर असून तेथे स्काऊटच्या वूड बॅचचे प्रशिक्षण दिले जाते. येथील सुंदर इमारती अतिशय नियोजनपूर्वक असून अमेरिकन आर्किटेक्ट मिस्टर पोलक् यांनी या सेंटरचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. येथे प्रशासकीय ब्लॉक, बीपी मेमोरियल भवन, कुंजरू कम्युनिटी हॉल, थूर्मन पार्क , क्विनी पार्क नगाझिया पार्क, इन्स्टिट्यूट लक्ष्मी मुजुमदार पार्क इत्यादी देखण्या इमारती आहेत. शेठ किरोडीमल भवन ही प्रशासकीय इमारत आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५६ मध्ये बीपी मेमोरियल गाईड भवनची पायाभरणी केली होती; तर १९६१ मध्ये लेडी बेडन पॉवेल यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. येथील प्रत्येक खोलीला भारतातील राज्यांची नावे देण्यात आली आहेत हे विशेष !
या ठिकाणी उन्हाळा आणि हिवाळ्यात कॅम्पिंगचे उपक्रम होतात साधारणपणे एका वेळी ७०० ते ८०० विद्यार्थी येथे सहभागी होऊ शकतात.निवासाची उत्तम सोय, पाण्याची स्वतंत्र व मुबलक व्यवस्था, कॅन्टीन, मेडिकल स्टोअर, स्काऊटशी संबंधित वस्तूंचे दुकान, बँक शाखा, पोस्ट ऑफिस इत्यादी महत्त्वाच्या सुविधा येथे सहज उपलब्ध आहेत.
या सेंटर मधील फेरीस लायब्ररी हे महत्त्वाचे आकर्षणाचे केंद्र मला जाणवले. क्वीनी पार्क मध्ये ही लायब्ररी असून अतिशय दुर्मिळ पुस्तके तसेच स्काऊट गाईड चळवळीशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावरील महान विभूतींनी स्वहस्ताक्षरात लिहिलेला पत्रव्यवहार येथे पहावयास मिळतो.
आमची निवासाची सोय बीपी मेमोरियल भवनात झाली.एका ऐतिहासिक वास्तूत निवास करताना अंगावर रोमांच उभे राहिले. उत्तम भोजन,शांत परिसर, स्वच्छ शुद्ध ताजी हवा यामुळे मन उल्हासित झाले. दुपारच्या भोजनानंतर आम्ही पचमढी कॅम्प परिसरात भटकंती केली. सूर्यनमस्कार गार्डन,राजेंद्र गिरी, झील इत्यादी ठिकाणी कधी जिप्सी तर कधी पायी जाऊन भेटी दिल्या.
राजेंद्र गिरी हे निसर्गरम्य ठिकाण आहे. येथून सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन होते. दर्या खोऱ्यांनी, दाट झाडांनी बहरलेला हा परिसर असून येथे उंचावर एक उद्यान आहे. या उद्यानातून पचमढीचे दर्शन होते. येथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी लावलेला १९५३ सालच्या एका वटवृक्षाचे जतन येथे केलेले दिसून येते. सातपुडा पर्वताचे हे शेवटचे टोक असून उंच उंच टेकड्या पहावयास मिळतात. राजेंद्र गिरीकडे जाताना काही व्ह्यू पॉईंट्स पाहायला मिळतात. जसे पांडव गुहा, हंडी खो, प्रियदर्शनी, बडा महादेव मंदिर, गुप्त महादेव मंदिर, इ. ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाणी भेटी देताना मन तृप्त होत होते. जिप्सी आणि गाईडचे नाममात्र शुल्क भरून आम्ही भेटीचा आणि सफरीचा मनमुराद आनंद लुटला.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता पंचमढी बायोस्फियर रिझर्व जंगल सफारीसाठी आम्ही सज्ज झालो. मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेतील हे संवर्धनक्षेत्र युनेस्कोने २००९ मध्ये बायोस्फियर रिझर्व म्हणून घोषित केले. प्रचंड थंडी आणि धुक्यातून वाट काढित जिप्सी वळणावळणाने मार्गक्रमण करीत होती. जंगलात सागवानी झाडांचे प्रमाण अधिक होते. जंगली आंबा, जांभूळ, अर्जुन, बदाम इत्यादींची झाडे मुबलक आहेत. या राखीव वनक्षेत्रात वाघ, बिबट्या, अस्वल, चितळ, हरिण, सांबर, निलगाय,लांडगा, उडणारी खार, इत्यादी प्राणी असल्याचे गाईड मार्फत कळले.आम्हाला वाघाचे दर्शन होईल ह्या अपेक्षेने आम्ही कडाक्याची थंडी सहन करीत जीव मुठीत धरून प्रवास करीत होतो. मोर, नीलगाय, हरिण, रानगवा, तसेच काही पक्षांचे दर्शन झाले. एका पाण्याच्या ओढ्याजवळ वाघाच्या पावलांचे ठसे पाहूनच समाधान मानावे लागले ! अतिशय दाट झाडी, निसर्गाने नटलेला परिसर पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.
दुपारच्या भोजनानंतर जटाशंकर ही पवित्र गुफा पाहण्यासाठी निघालो. भगवान शंकराचे प्राकृतिक शिवलिंग तेथे असून निसर्गाचा एक चमत्कार म्हणून या ठिकाणाकडे पाहिले जाते.पुढे पांडव गुफा,महादेव गुफा,चौरागड इत्यादी क्षेत्रांना भेटी दिल्या. त्यानंतर कॅम्प क्षेत्रात परत आल्यावर स्काऊटर्स सोबत विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग घेतला.जसे रॉक क्लाइंबिंग, पॅरासेलिंग, बॅलन्सिंग,बोटिंग, घोड्यांवर रपेट इत्यादी उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर आनंद लुटला.
पचमढी हे मध्य प्रदेशातील नर्मदापुरम किंवा होशंगाबाद जिल्ह्यातील सातपुडा पर्वतराजीतील एक थंड हवेचे ठिकाण असून साधारण समुद्रसपाटीपासून १०६७ मीटर उंचीवरील हे ठिकाण पाच पुरातन गुहांवरून त्याला पचमढी हे नाव पडले आहे. येथील शांत नयनरम्य परिसर, शुद्ध हवा,स्वच्छ सूर्यप्रकाश, निसर्ग इत्यादीमुळे पंचमढीला सातपुड्याची राणी म्हणून संबोधले जाते. कॅम्प मध्ये सहभागी मुले ही साधारण ११ ते १५ वयोगटातील स्काउट्स आणि गाईड्स होते. घरापासून लांब असूनही मुलं सर्वार्थाने आनंदी होते. शिस्त आणि स्वावलंबन याचा अवलंब करताना दिसत होते.कॅम्प फायर, शेकोटी, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत होते. त्यांच्यासोबत असणारे स्काऊट मास्टर ट्रेनर कैलास पाटील, चिन्मय देशपांडे,भरत खत्री, राहुल सोनवणे, प्रणव अहिरे, विकास खंबाईत,भाऊसाहेब भोंडवे मंगेश बोढाई, सौ.संगीता सोनार, सौ.धांडे यांचे आणि विद्यार्थ्यांचे मैत्रीपूर्ण संबंधांमुळे एक कौटुंबिक वातावरण तेथे निर्माण झाले होते. एकमेकांशी मिळून मिसळून राहणे, आपल्यापेक्षा इतरांची काळजी घेण्यात सर्वजण पुढाकार घेत होते. नॅशनल ट्रेनिंग सेंटर मधील प्रशासकीय अधिकारी आणि त्यांची टीम अतिशय तत्पर आणि आदरपूर्वक सेवा देत होते. घरापासून हजार किलोमीटर दूर राहूनही प्रत्येकाला कौटुंबिक जिव्हाळा येथे मिळत होता.
ॲडव्हेंचर कॅम्प मध्ये सहभागी मुलांकडे पाहून आम्हाला खरे तर त्यांचा हेवा वाटू लागला.शालेय जीवनात अशी संधी आपल्याला का नाही मिळू शकली?
अतिशय जड अंतकरणाने आम्ही या सातपुड्याच्या राणीचा निरोप घेतला...
शैलेश अशोक पाटोळे
पेठे विद्यालय नाशिक
२४/४/२४
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
No comments:
Post a Comment