Monday, January 1, 2024

संकल्प नववर्षाचा....


                     संकल्प नववर्षाचा...
नववर्षाचा संकल्प ही पाश्चिमात्य संकल्पना असली तरी भारत आणि जगभरात ती रूढ झाली आहे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी पासून प्राचीन बॅबिलोनिअन्स लोक मार्च महिन्याच्या मध्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षाला प्रतिज्ञा किंवा संकल्प करून प्रारंभ करीत असत.राजाप्रती निष्ठा आणि देवाला दिलेले वचन असे त्या संकल्पाचे स्वरूप असे. पुढे ज्युलियस सिझरने कॅलेंडरमध्ये सुधारणा केल्यानंतर नववर्षाचा प्रारंभ एक जानेवारीपासून सुरू झाला.त्याला त्याने जानुस म्हणजे सरत्या वर्षाला धन्यवाद देणारे आणि येणाऱ्या वर्षाला वचन देणारे असे नाव व दोन चेहऱ्यांचे प्रतिकात्मक चिन्ह दिले. पुढील काळात नवीन वर्ष संकल्पना दृढ होऊन देश,राजा, ईश्वर असे स्वरूप हळूहळू कमी होत जाऊन संकल्प स्वतः पुरता मर्यादित झाला.
   पाश्चात्यांच्या अनुकरणातून भारतातही ही प्रथा रूढ झाली. नववर्षाचा संकल्प.. न्यू इयर रिझोल्युशन हा शब्द १८१३ पासून वापरला जात आहे.
  नववर्षाचा संकल्प करणे ही संकल्पना चांगली आहे. कारण त्या निमित्ताने एखादी कृती करण्यास आपण प्रवृत्त होतो, सरसावतो. आपल्या भविष्याकडे आशावादी,सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहू लागतो.भूतकाळात म्हणजे मागील वर्षांत घडलेल्या घटना विशेषतः चुका आपण सुधारू शकत नाही; मात्र नववर्षात असा संकल्प केल्याने वर्तमान आणि भविष्यात उत्तम आनंददायी आयुष्य जगण्याची संधी उपलब्ध होते.म्हणजे संकल्प प्रगतीसाठी पूरक ठरतो. संकल्प म्हणजे निर्णय, वचन हे आपण घेतलेले असते.ते आपल्यावर लादलेले नसते .आपलं जीवन सुधारण्यासाठी आपणच स्वतःला वचन देत असतो. आपल्या स्वतःसाठी ठरवलेले ते उद्दिष्ट असते. परिश्रमपूर्वक सकारात्मक राहून ठरवलेले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास ते आपल्या सवयीचे होते. आनंद आणि यश दोन्हींची प्राप्ती यामुळे होऊ शकते. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतो.अर्थात यात निर्धार फार महत्त्वाचा असतो. उत्साहाच्या भरात केलेले संकल्प, इतरांचे अनुकरण करत केलेले संकल्प, लादलेले संकल्प, इर्षेपोटी केलेले संकल्प दीर्घकाळ टिकत नाहीत. परंतु काही लोकांचे संकल्प वर्षानुवर्षे पाळले जातात. त्यात ते खंड पडू देत नाहीत, अशा लोकांचे जीवन चांगल्या अर्थाने बदललेले दिसून येते. संकल्प कसे असावेत? यात स्वतःचा उत्कर्ष साधेल, आनंद मिळेल, आपल्याला उत्तम सवयी लागतील, आपले आरोग्य चांगले राहील अशा बाबींचा समावेश असावा. किंबहुना आपल्या संकल्पामुळे आपले कुटुंबीय मित्रपरिवार शेजारी पाजारी इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक असते.
  संकल्प आणि कृतींचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे. संकल्प केल्याशिवाय कृती आणि कृतीचे स्पष्टीकरण संकल्पनेशिवाय होत नाही. म्हणजेच नववर्षाच्या संकल्पाला कृतीची जोड देणे गरजेचे असते. म्हणून ' एक ना धड भाराभर चिंध्या ' असे आपल्या संकल्पाचे होऊ द्यायचे नसल्यास छोट्या छोट्या गोष्टी, सहज साध्य बाबींपासून संकल्प करावेत.कमीत कमी संकल्प करावेत. म्हणजे संकल्प पूर्ण करण्याचे दडपण किंवा दबाव मनावर येत नाही. कारण संकल्प ही मानसिक क्रिया असून त्याला शारीरिक कृतींची जोड दिल्याशिवाय संकल्प सिद्धी होत नाही.आपण ठरवलेल्या उद्दिष्टांप्रती कायम सकारात्मक राहून ध्येयापर्यंत पोहोचता येऊ शकते. असे न झाल्यास संकल्पपूर्ती होण्यापेक्षा संकल्प मोडल्याची यादी वर्षानुवर्षे वाढत जाते. संकल्प पूर्तीसाठी काळजीपूर्वक नियोजन करण्याची आवश्यकता असते.
   नवीन वर्षाचे संकल्प हे केवळ तरुण प्रौढांसाठीच असतात असे नाही; तर ते लहान मुले,शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त ठरतात. परंतु लहान मुलांकडून हे संकल्प पूर्ण करून घेण्यासाठी पालकांना धडपड करणे गरजेचे असते.सध्याच्या मोबाईल युगात मुलांची वाचनाची, लेखनाची, ऐकण्याची, बोलून व्यक्त होण्याची सवय मोडत चालली आहे. त्याचा विपरीत परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक प्रगतीवर होताना दिसत आहे. अशावेळी मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठीचे संकल्प सुचवावेत. शारीरिक हालचाली आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करण्याबाबत सांगावे. जंक फूड, फास्ट फूड यांचे प्रमाण कमी करणे, भाज्या फळे इत्यादींचा जेवणात समावेश करणे, इतरांचा आदर करणे,झोपण्यापूर्वी वाचनाची सवय लावणे, घरात सर्वांनी एकाच वेळी जेवणास बसणे, मुलांशी संवाद साधने,त्यांच्याबरोबर खेळ खेळणे, मुलांसोबत आकाशवाणी, दूरदर्शन youtube वरील चांगले कार्यक्रम पाहणे किंवा ऐकणे. अशा सवयींसाठी संकल्प शालेय विद्यार्थी आणि पालक यांनी करावे जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागेल.
   बैठ्या जीवनशैलीमुळे आणि फास्ट फूडमुळे लहान मुलांप्रमाणेच तरुणांमध्ये ही स्थूलत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे.व्यायाम आणि आरोग्य याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण, नोकरी व्यवसायातील चढ उतार यामुळे ताणतणाव वाढत आहेत. त्याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर व शारीरिक हालचालींवर होऊ लागला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी दिवसभरातून स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवून छंद जोपासण्याची गरज आहे. छंदांमुळे ताण कमी होण्यास मदत होते. संगीत ,नृत्य नाट्य,गायन, चित्रकला, लेखन इत्यादींचा छंद या काळात जोपासता येईल.सतत सकारात्मक राहण्याचा संकल्प देखील उपयुक्त ठरू शकतो .यामुळे आपला आत्मविश्वास दुणावतो. कामाची यशस्विता वाढते. कठीण परिस्थितीशी दोन हात करण्याची हिम्मत प्राप्त होते. आळस झटकून स्वतःचे काम स्वतः करण्याचा संकल्प ऊर्जादायी ठरतो.पुस्तकांची मैत्री, पैशांची काटकसर किंवा बचत, सकाळी लवकर उठणे, सकाळी अथवा सायंकाळी फिरायला जाणे, कोणत्याही एका कलेशी मैत्री करणे, इत्यादी छोटे - छोटे संकल्प आपल्या आयुष्याला चांगल्या अर्थाने कलाटणी देऊ शकतात .
  ' भले बुरे जे घडून गेले
   विसरून जाऊ सारे क्षणभर..'
            असे म्हणून मागील वर्षी भूतकाळात काय घडले याचा विचार न करता संकल्पावर लक्ष केंद्रित करावे.
   चला तर मग छोटासा का होईना एखादा संकल्प करून त्याच्या पूर्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहूया ! कितीही अडचणी आल्या ,संकटे आली तरीदेखील संकल्पपूर्तीसाठी निश्चल राहूयात.....
  जिंदगी मे एक अरमान लेकर चले है
  मुश्किलो को हम फरमान देकर चले है l
  मंजीलो को हम पाकर रहेंगे
  चुनौतियो को हम हरा कर रहेंगे l
  माना कि लंबे रास्ते अनेकों कठीनाई हैं
  लेकिन हमने भी आसमा को छूने की कसम खाई हैl
    सर्वांना नूतन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा !

लेखन:
शैलेश अशोक पाटोळे
पेठे विद्यालय,नाशिक 
९८६०७४९७९०

No comments:

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...