डोंगरकुशीत हरवलेले स्वप्निल क्षण !
M o u n t. A b u
धावपळीच्या आयुष्यातून जेव्हा थोडी विश्रांती किंवा विरंगुळा हवा असतो तेव्हा निसर्गात सामावून जाण्यासारखा दुसरा उत्तम मार्ग नसतो !
स्काऊट आणि गाईड निसर्ग निवास आणि एडवेंचर कॅम्प च्या निमित्ताने नॅशनल सेंटर माउंट आबू येथे जाण्याचा योग आला.
नाशिकच्या पवित्र भूमीहून जेथे गोदावरीच्या तरंगांनी आठवणींची गाणी गात ते राजस्थानच्या एकमेव हिल स्टेशन माउंट आबू पर्यंतचा हा प्रवास म्हणजे सूर्योदयाच्या किरणासारखा उजळून निघणारा अनुभव ! चार चाकी गाडी रस्त्यांवर लाटांसारखी वळण आणि हृदयातून उसळणाऱ्या हास्य विनोदाचा धबधबा... हा प्रवास फक्त अंतर नाही तर मित्रतेच्या अमूल्य धाग्याने विणलेला सुवर्ण तान्हा होता !
अगदी पहाटे प्रवासाला सुरुवात झाली. मनात आनंदाची लहर उसळली. जणू जीवनाच्या.. अनेक मैलांच्या पलीकडे ...डोंगरांच्या हृदयात दडलेल्या शांततेचा शोध घेण्यासाठी आमचा कंपू कूच करीत होता.
सूर्योदयाआधीच प्रवासात चहाचा शोध घेता घेता बरोबर आणलेल्या न्याहारीचा आस्वाद घेतला. खानदेशी शेतीची.. सोन्याची पिकं पाहत मन भरून आलं. रस्त्यांवर लाटांसारखी वळण घेत महाराष्ट्राची सीमा सोडून आम्ही गुजरातची सीमा ओलांडली. गुजरातचे रस्ते आणि त्या रस्त्यांवर ट्रकचालकांचा थरार पाहून मन कधी कधी भयचकीत होते. पहिल्यांदाच या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही. हळूहळू रस्ता कापत गुगल वाटाड्याच्या मदतीने पुढे पुढे जात होतो. प्रवासातला रोमांच आणि मित्रांची साथ ! बहुदा हेच जीवन असावे !
रात्री नऊच्या दरम्यान राजस्थानातील माउंट आबू येथे पोहोचलो. हवेतला गारवा जाणू लागला होता. खास राजस्थानी पद्धतीच्या जेवणावर ताव मारून विश्रांती घेतली.
माउंट आबूच्या डोंगराळ भागात वसलेले नॅशनल ट्रेनिंग सेंटर हे भारतातील एक प्रमुख केंद्र आहे. साहसी प्रशिक्षणासाठी आदर्श असलेले हे ठिकाण कॅम्प साइट्स, रॉक क्लाइंबिंग वॉल्स,रोप कोर्सेस, ट्रेकिंगचे रस्ते इत्यादींसाठी सुपरीचीत आहे.१९७० मध्ये स्थापन झालेले हे ट्रेनिंग सेंटर सध्या श्री.जितेंद्र भाटी यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे कार्य करीत आहे.
गोमुख रोडच्या कुशीत लपलेले हे केंद्र विद्यार्थी आणि युवकांसाठी जीवनाच्या लाटांवर नौका चालवणाऱ्या तरुण योध्यांचे तपोस्थान आहे.जेथे प्रत्येक शिळा नेतृत्वाची गोष्ट सांगते आणि वारा अनुशासनाचे गाणे गातो !
येथील अनुभव म्हणजे सूर्योदयाच्या किरणांसारखा उजळणारा साहसाचा सैलाब ! सकाळी रॉक क्लाइंबिंगच्या शिळांवर चढताना जणू डोंगराच्या कवचाला आव्हान देणारे तरुण हत्ती तर रोप कोर्सच्या उंच झिपलाईन वरून खाली उतरताना हवेच्या पंखांवर स्वार झालेले गरुड ! कॅम्प फायरच्या तापट गोळ्यात मित्रांच्या हास्याच्या लाटा उसळतात आणि रात्रभर ट्रेकिंग करताना तारकामंडळांनी सजलेले आकाश जणू जीवनाचे रहस्य उलगडते ! स्वच्छ निवास गृहे- तंबू,पौष्टिक जेवण- रोज नवीन मेनू, सहज उपलब्ध मेडिकल सुविधा...जणू आईच्या मायेचे प्रतिबिंब ! हिरव्या गवताच्या बिछान्यावर उभे तंबू...जेथे सकाळी पक्षांचे संगीत जागे करते आणि रात्री झोपवतात...तारकांचे दिवे ! जितेंद्र भाटी येथील प्रभारी अधिकारी ..सहकार्यपूर्ण, प्रेरणादायी आणि तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारे ! त्यांचा स्वभाव हिमनदीसारखा शांत पण शक्तिशाली! विद्यार्थ्यांना आत्मविश्वास प्रदान करतो. स्वावलंबन, शिस्त, सामाजिक सेवा शिकवतो. हे केंद्र म्हणजे साहस, सेवा आणि स्वप्नांचा चिरंतन संनाद !
माउंट आबू राजस्थानचा एकमेव डोंगराळ भाग.प्राचीन काळी याला अर्बुदांचल म्हणत. पौराणिक कथेनुसार, हिमालयाचा पुत्र अर्बुदा (एक शक्तिशाली सर्प) याने भगवान शिवाच्या वाहन नंदीला खाईतून वाचवले, म्हणून हे नाव पडले.हे अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर, प्राचीन काळापासून ऋषीमुनींचे तपोस्थान राहिले आहे. ऋषी वशिष्ठांच्या पावनस्पर्श या भूमीला झाला आहे. ऋषी वशिष्ठ हे वैदिक काळातील सप्तऋषींपैकी एक,जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात. इक्ष्वाकूवंशाचे (सूर्यवंशाचे) राजगुरू आणि भगवान रामाचे गुरु होते.ऋषी वशिष्ठांनी येथे यज्ञ करून अग्नीकुंडातून चौहान ,परमार, सोलंकी आणि प्रतीहार राजवंशाची उत्पत्ती केली. अकराव्या ते तेराव्या शतकात परमार राजांनी दिलवाडा जैन मंदिरे बांधली. १३११ मध्ये चौहान राजांनी यावर विजय मिळवून राजपुताना मुख्यालय आणि उन्हाळी राजधानी केली. जैन धर्माचे प्रमुख तीर्थस्थान म्हणून ओळखले जाणारे माउंट आबू येथील दिलवाडा जैन मंदिरे संगमरवरातील नक्षीकामासाठी जगप्रसिद्ध आहेत. भगवान शिवाने एका भील दांपत्याला दर्शन दिले आणि भगवान महावीर येथे आले अशा पौराणिक कथा याच्याशी जोडलेल्या आहेत. हिंदू आणि जैन मंदिरे, अचलगड किल्ला येथील सांस्कृतिक वारसा जपतात.
देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर माउंट आबू बॉम्बे राज्यात म्हणजे गुजरात प्रांताला जोडण्याच्या विरोधात आंदोलन झाले. माउंट आबू हे अरवली पर्वतरांगेतील दक्षिण पश्चिम भागात बाराशे वीस मीटर उंचीवर वसलेले असून गुरुशिखर (१७२२) हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. राजस्थान मधील एकमेव हिल स्टेशन म्हणून थंड हवामान, झील, वन्यजीव अभयारण्य आणि पाण्याचे स्रोत असलेले 'रेगिस्तानातील हिरवा भाग' म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांचे गुरु वशिष्ठ मुनींचा आश्रम येथे असून तेथे अग्नीकुंड आणि गोमुख कुंड आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. गोमुख कुंडातून सतत गाईच्या तोंडा सारखी पाण्याची धारा वाहते, ज्याचा संबंध ऋषी वशिष्ठांनी केलेल्या यज्ञाशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार हे पाणी पवित्र असून भगवान शिवाने एका दाम्पत्याला दर्शन देऊन हे कुंड निर्माण केले,असे मानले जाते. येथील जल हिंदू तीर्थयात्रेकरूसाठी पवित्र स्नानाचे स्थान आहे. गोमुख कुंडातील जलस्रोत प्राकृतिक असून वर्षभर अविरत शिवलिंगावर जलाभिषेक करत असते. हे पाणी अत्यंत शुद्ध, थंड आणि पवित्र मानले जाते.
सातशे एकर क्षेत्रात पसरलेला आशिया खंडातील सर्वोत्तम किल्ला चित्तोडगड येथे जवळच असून १८० मीटर उंचीच्या टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून मेवाड राजवंशाच्या शौर्याची आणि जौहर परंपरेचे प्रतीक आहे. सातव्या शतकात मौर्य राजा चित्रांगद मोरी यांनी हा किल्ला बांधला असून आठव्या शतकात बप्पा रावल यांनी येथे मेवाडची राजधानी बनवली. १३०३ मध्ये अलाउद्दीन खिलजी,१५३५मध्ये बहादुर शहा आणि १५६८ मध्ये अकबराने यावर आक्रमण केले. ७ दरवाजे,८४ कुंड, शेकडो मंदिरे आणि १३ किलोमीटर भिंत असलेला हा जलकिल्ला बेराज नदी काठावर आहे.या किल्ल्यातील महल आणि संग्रहालय हे राजपूत वास्तुकला आणि इतिहासाचे प्रतीक आहेत. किल्ल्यातील राणा कुंभा महाल हा राणा कुंभा यांनी बांधला असून मीराबाईचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. पद्मिनी महाल देखणा असून यात समर आणि विंटर पॅलेस अशी विभागणी केली आहे. कलाकुसर केलेला रतनसिंह महाल पर्यटकांना आकर्षित करतो. जैन धर्माशी संबंधित प्राचीन वास्तुशिल्पाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कीर्ती स्तंभ ! तेराव्या शतकातील साधारण २४ मीटर उंचीचा चार मजली हा स्तंभ आहे.एका जैन व्यापाऱ्याने तीर्थंकर आदिनाथ स्वामींच्या सन्मानार्थ बांधला असून ते दिगंबर जैन धर्माचे तीर्थस्थळ आहे.
त्याचा आकार चौकोनी असून जैन तीर्थंकर आदिनाथाच्या चार दिगांत विशाल मूर्तीसह, विष्णू अवतार, शिव, ब्रम्हा, नृत्यांगना,रामायण- महाभारत दृश्य आणि तत्कालीन सामाजिक जीवन चितारले आहे.स्तंभावर जाण्यासाठी गोलाकार ६९ पायऱ्या आहेत.
माउंट आबू आणि जवळपासच्या परिसरामध्ये अनेक आकर्षणे आपल्याला खुणावतात. आबू शहराच्या मध्यभागी जगातील सर्वात मोठी खोल नैसर्गिक झील आहे. त्याला नक्की झील असे म्हणतात. जेथे बोटिंग आणि सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहता येते. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर संगमरवरी दिलवाडा जैन मंदिर आहे .अकराव्या ते तेराव्या शतकातील उत्कृष्ट नक्षीकामासाठी ते प्रसिद्ध आहे. १७२२ मीटर उंचीवरील गुरुशिखर या पर्वत शिखरावरून अबू शहराचे विहंगम दृश्य दिसते. येथे गुरु दत्तात्रयाची गुफा मंदिर आणि चरण पादुका असून शांतता आणि निसर्गदृश्यांसाठी प्रसिद्ध असे हे ठिकाण आहे. इस्रोची इन्फ्रारेड वेधशाळा देखील येथे आहे. अबू शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर अचलगड किल्ला सध्या मात्र भग्नावस्थेत असून प्राचीन शिव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमातील पीस पार्क हे ध्यानधारणाकरिता प्रसिद्ध ठिकाण आहे. डोंगरदऱ्या आणि टेकड्या यांनी वेढलेला हा परिसर असल्याने अनेक ठिकाणी सनसेट पॉईंट पाहण्यासाठी स्थानिकांची व पर्यटकांची रोजच गर्दी झालेली असते.
गुजरातच्या सीमेजवळ असल्याने राजस्थानपेक्षा सौम्य आणि थंड हवामान आढळते. ग्रीष्म ऋतूतही थंडावा जाणवतो. दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि रात्री थंडावा असे आल्हाददायक वातावरण आबू शहराचे आहे. मॉन्सून मध्ये सरासरी १३०० मिलिमीटर पाऊस पडतो.हिवाळ्यात सरासरी ३ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली जाते. वर्षभर पर्यटनासाठी अतिशय उत्तम वातावरण असते. आबू शहराची लोकसंख्या साधारण ३५ हजार असून हिंदू, जैन आणि आदिवासी भील संस्कृतीचा संगम दिसून येतो. पर्यटनामुळे आर्थिक दृष्ट्या हा भाग सक्षम असून शहरात साधुसंतांची उपस्थिती वैशिष्ट्ये पूर्ण आहे. घूमर, दांडिया,गैर यांसारखी सांस्कृतिक परंपरा आणि जून महिन्यात होणारा समर फेस्टिवल प्रसिद्ध आहेत.
येथील लोक पारंपरिक राजस्थानी पोशाख परिधान करतात.दाल - बाटी चुरमा, गट्टे की सब्जी, रबडी, जाड दुधाची थंड मिठाई, सात चटण्या असलेले मसालेदार पराठे... खवय्यांसाठी यापेक्षा दुसरी मेजवानी काय असू शकते! ज्वारी बाजरी मका आणि चणाडाळ याचा अधिकाधिक वापर जेवणात असतो. दूध आणि दहाचे पदार्थही मुबलक मिळतात.
माउंट आबू आणि परिसरात प्रामुख्याने हिंदी भाषा बोलली जाते. मारवाडी आणि स्थानिक बोलींनी युक्त राजस्थानी देखील ऐकायला मिळते. आदिवासी लोक हिंदी मिश्रित भीली बोली बोलतात. तीर्थक्षेत्र असल्याने काही प्रमाणात संस्कृतचा प्रभाव दिसून येतो. परदेशी पर्यटकांसाठी आवश्यक इंग्रजीचा वापरही काही प्रमाणात आढळतो.
सहा दिवसांचा एडवेंचर कॅम्प संपल्यानंतर संस्कृती,निसर्गाचा अनोखा नजराणा, डोंगरदऱ्या, स्वच्छ सूर्यप्रकाश, आल्हाददायक हवा, तीर्थक्षेत्रे, किल्ले, महाल,सूर्योदय सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेले माउंट आबू शहराचा अनुभव घेतल्यानंतर परतीचा प्रवास.... कधी संपूच नये असा ! आबू शहराच्या प्रेमात पडला नाही असा पर्यटक विरळाच.. परतताना विरहाच्या वेदनांनी मन आतल्या आत रुदन केल्याशिवाय राहत नाही.
जर तुम्हाला साहस,आनंद आणि शांती हवी असेल तर मित्रांसोबत निघा...आबू वाट पाहतोय..!
शैलेश पाटोळे
नाशिक
1 comment:
Mesmerizing, Articulate experience.... Great article Sir
Incredible Mount Abu 🌹🌹
Post a Comment