Sunday, August 22, 2021

क्षण : नवा पेशवे वाड्यातील !

            मंतरलेले क्षण ....

     सन.२००० च्या सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस. नवीन इंग्रजी शाळा ओझर या शाळेतून काही सहकाऱ्यांबरोबर माझी देखील बदली झाली होती. नवा पेशवे वाडा अर्थात पेठे विद्यालयातील तो माझा पहिला दिवस.संस्थेच्या मुख्य शाखेत बदली झाल्याचा आनंद आणि भीती ! शाळेची नूतन वास्तू नुकतीच बांधून झाली होती.
   आजपर्यंत पेठे विद्यालयाबद्दल खूप ऐकले होते. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही जागा परंपरा जपत शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. शाळेबद्दल कुतूहल होतेच....
     १९११ मध्ये मुंबईच्या रॉबर्ट मनी या मिशनरी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करणारे कै. दादासाहेब पुणतांबेकर यांनी नाशिक मध्ये इंग्रजी शिक्षणाचा वर्ग सुरू करण्याचे ठरविले. सुधारणावादी दृष्टिकोन असलेले नाशिक मधील उत्साही व कार्यतत्पर रेव्हरंड शिंदे यांनी त्या इंग्रजी वर्गाची जबाबदारी स्वीकारली. नाशिकमधील मिशनरी सोसायटीने त्यास सहाय्य केले. अल्पावधीतच ख्रिस्ती मिशनरी सोसायटीच्या प्रयत्नांमुळे त्या इंग्रजी शिक्षण वर्गाचे रूपांतर सेंट जॉर्जेस हायस्कूल मध्ये झाले. नाशिक मधील मेन रोड वरील चित्रमंदिर सिनेमा शेजारील राजेबहाद्दर वाड्यात ही शाळा भरू लागली.परंतु नाशिक सारख्या धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या या परिसरात मिशनरी शाळा दीर्घ काळ सुरू राहणे शक्य नव्हते. अनंत अडचणी निर्माण होऊ लागल्या. शाळा बंद पडण्याची स्थिती देखील निर्माण झाली. अशा प्रसंगी काही नामवंत शिक्षण धुरिणांनी सेंट जॉर्जेस हायस्कूलची जबाबदारी स्वीकारली. मोठ्या धैर्याने शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले. थोड्याच अवधीत या शाळेचे मॅट्रीक पर्यंतचे वर्ग सुरू झाले. या काळात कै.वि.म. केसकर, कै. नानासाहेब गाडगीळ, कै.शिवरामपंत कळवणकर यांसारखे उत्तम शिक्षक शाळेला लाभले.
    १९२३ मध्ये ख्रिस्ती मिशनरी संस्थेने सेंट जॉर्जेस हायस्कूल चालविण्यास असमर्थ असल्याचे सांगून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सेंट जॉर्जेस हायस्कूल मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनी न डगमगता स्वतःच्या हिमतीवर शाळा चालू ठेवण्याचा निर्णय घेऊन, दि.१ एप्रिल १९२३ रोजी नाशिक एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून सेंट जॉर्जेस हायस्कूलचे कामकाज सुरू झाले.
    नाशिक एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष म्हणून कै. रावबहादूर वि. अ. गुप्ते यांनी १९४० पर्यंत संस्थेचे यशस्वी नेतृत्व केले. तसेच कै. श्री.मो.रा. गोडबोले हे पहिले मुख्याध्यापक होते. आजीव सदस्य मंडळाकडून संस्थेचा कारभार सुरू झाला.या मंडळातील काही सदस्य हे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
   नाशिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्यापासून जवळपास वीस-बावीस वर्षांचा काळ संस्थेची परीक्षा पाहणारा ठरला. संस्थेला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. खर्चासाठी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचे पगार करिता निधी अपुरा पडे. आजीव सदस्य मंडळातील काहीजण पदरमोड करून खर्च भागवीत.संस्थेची आर्थिक गरज भागविण्याकरिता प्रसंगी स्वतःचे घर गहाण ठेवण्याची तयारी दर्शविणारे कै. रा.के. तथा अण्णा वैद्य ज्ञानदानाच्या कार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे सद्गृहस्थ होते. अशा शिक्षकांमुळे संस्था टिकून होती.
   त्याकाळी पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण केवळ नगरपालिकेच्या सरकारी शाळांमधून दिले जात होते. १९३८ साली आपल्या संस्थेचे प्राथमिक शिक्षण देणारे विद्यालय असावे,असे वाटून प्राथमिक शिक्षण मंदिर सुरू करण्यात आले.राजेबहादुर वाड्यात आता प्राथमिक शिक्षण मंदिर आणि सेंट जॉर्जेस हायस्कूल असे पहिली ते अकरावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय नाशिक एज्युकेशन सोसायटीने उपलब्ध करून दिली. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढू लागल्याने जागेची निकड निर्माण होऊ लागली.
   या दरम्यान मुंबई इलाख्याचे पहिले लोकनियुक्त मुख्यमंत्री कै. नामदार बाळासाहेब खेर नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नाशिकला आले होते. त्याप्रसंगी तत्कालिन नाशिकचे आमदार कै. गो.ह. देशपांडे, श्री. वामनराव यार्दी, ॲड. काकासाहेब रहाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संस्थेची जागेची अडचण लक्षात आणून दिली.तसेच रविवार पेठेतील पूर्वीचा कै. रायरीकर सावकारांचा, परंतु नंतर पेशवे सरकारकडे आलेला वाडा शाळेसाठी सुचविला. खुद्द पेशवे या वाड्यात राहत असत. आता या वाड्यात सरकारी कोर्ट वगैरे भरत होते. थोड्याच अवधीत पेशवेवाडा हे नाव कायम ठेवण्याच्या अटीवर नाशिक एज्युकेशन सोसायटीस हा पेशवेवाडा शाळा चालविणे करिता मिळाला.
   संस्थेचे निस्वार्थी आजीव सदस्य मंडळ, निरपेक्ष भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणारे व्यासंगी शिक्षक यांनी अथक परिश्रमाने शाळा नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न केले. सर्व शिक्षकांच्या कळकळीमुळे आणि कर्तबगारीने विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. सरकार कडून मिळालेल्या जागेवर इमारत बांधणे आता गरजेचे वाटू लागले होते. पेशवे वाड्याच्या जागेवर इमारत बांधण्यासाठी निधी कसा उपलब्ध करावा? असा प्रश्न निर्माण झाला. त्याप्रसंगी संस्थेचे प्रति सहानुभूती असणाऱ्या सह्याद्री विमा कंपनीने जागा तारण ठेवून २०हजार रुपयांचे कर्ज दिले.१९४२ साली नव्या इमारतीचा पाया घातला गेला. मूळचे नाशिकचे असलेले कै. श्रीमान वामन हरी पेठे व कै. श्रीमान गणेश हरी पेठे बंधू यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत स्वतःच्या कर्तबगारीने मुंबई इलाख्यात सोन्या-चांदीचे व्यापारी म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. संस्थेची पैशांची निकड लक्षात घेऊन संस्थेचे एक माजी विद्यार्थी व सुप्रसिद्ध वकील ॲड. कै. रामचंद्र विष्णू तथा काकासाहेब रहाळकर यांनी पेठे बंधूंना वैयक्तिक विनंती करून संस्थेसाठी वीस हजार रुपयांची देणगी मिळवली. पेठे बंधूंनी देखील उदारहस्ते देणगी देऊन संस्थेला मदत केली. पेठे बंधूंच्या देणगीमुळे संस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. त्याचाच एक भाग म्हणून सेंट जॉर्जेस हायस्कूलचे नामकरण पेठे विद्यालय असे करण्याचे निश्चित झाले. हा समारंभ दि.१५जानेवारी १९४४ रोजी पुणे विद्यापीठाचे तत्कालीन उपकुलगुरू बॅ.बाबासाहेब जयकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
   पेठे विद्यालयाचा स्टाफ रूम मधला पहिला दिवस. मी पुरता गांगरलेला. एकाच कक्षात पार्टिशन करून शिक्षक आणि शिक्षिका यांची विश्रामिका. श्री.दि.कृ.गोटखिंडीकर, श्री.पां. म. अकोलकर,श्री.चंद्रशेखर वाड,श्री.डी.एस.कुलकर्णी, सौ.अनघा काशीकर, सौ.निशा देवळे, सौ.तारा रत्नपारखी, श्री.नवीन तांबट, श्री.चंद्रकांत भालेराव यांसारखे दिग्गज शिक्षक ! त्यांच्या गप्पा आणि हास्यविनोदात मी कोपरा धरून बसलो होतो. कर्मचारी श्री.काशिनाथ तूपलोंढे सर्वांना चहा देत होते. मी स्वभावानुसार चहासाठी नाही म्हटले. तितक्यात श्री.अकोलकर सर रागावले." का नाही घेत ? " चहा म्हणजे पृथ्वीवरचे अमृत आणि त्याला नाही म्हणतोस म्हणजे काय !  तुमच्यासारख्या तरुणांनी चहाला नाही म्हणणं म्हणजे चहा चा अपमान ! त्यांच्या बोलण्याने छातीत धस्स झाले. मुकाटपणे चहाचा कप घेऊन भिंतीकडे तोंड करून चहा प्यायलो. श्री.धों. मो. अहिरे सर जवळ आले. त्यांच्या हातात वर्तमानपत्र होते. त्यातली एक बातमी दाखवत त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने म्हटले. "भाऊ  हा तूच आहेस का? मी अधिकच घाबरलो. बातमी वाचली. फोटो तर माझाच होता. मी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बातमी फोटोसह वर्तमानपत्रात छापून आली होती.माझ्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. श्री.अकोलकर सरांनी ती बातमी सर्वांना वाचून दाखवली. अभिनंदनाचा वर्षाव झाला. श्री.अकोलकर सरांनी एक गुलाबाचे फुल देऊन माझे कौतुक केले. त्यामुळे माझ्या मनातील भीती दूर झाली.मुख्याध्यापक श्री. वि.भा.देशपांडे सरांचा मुख्याध्यापक म्हणून तो पहिलाच दिवस होता. दुपारी त्यांनी ऑफिस मध्ये बोलावून माझे कौतुक केले.मी त्यांना नमस्कार केला. पेठे विद्यालयातला माझा पहिला दिवस मला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा ठरला.
   नवीन इंग्रजी शाळेतून बदलून आलेला म्हणून माझ्या कडे पाहण्याचा प्रारंभीचा दृष्टिकोण आता बदलला होता .माझे वर्गमित्र श्री. दीपक कडाळे आणि मी आता एकाच स्टाफरूममध्ये शिक्षक म्हणून वावरू लागलो.  पेठेच्या विद्यार्थ्यांनी काही दिवस माझीच परीक्षा घेतली. ओझरच्या शाळेपेक्षा या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच फरक होता. परंतु, मी देखील हार मानणाऱ्यातला नव्हतो. थोड्याच कालावधीत स्वतःला सावरले. ग्रंथालयाशी मैत्री केली .स्वतःच्या नोट्स काढून उत्तम कसे शिकविता येईल याचा विचार करू लागलो आणि लवकरच मुलांवर पकड घेण्यात यशस्वी झालो. मुख्याध्यापक व इतर ज्येष्ठ गुरुजन यांच्या कौतुकास पात्र ठरू लागलो.अभ्यासाबरोबरच इतरही उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊ लागलो. शिष्यवृत्ती, एम.टी.एस. विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयाकरिता मार्गदर्शन करू लागलो . मुलांना शिकवता शिकवता माझेही अध्ययन होऊ लागले.
  पेठे हायस्कूलच्या परंपरेनुसार आठवड्यातून एक दिवस मुलांना स्टेजवरून गोष्ट सांगायला सुरुवात केली. नवीन इंग्रजी शाळेतले अनुभव येथे मला कामी आले. आत्मविश्वासाने कोणतेही काम वेळेत पूर्ण करण्याची सवय लागली. इतरांच्या तुलनेने वयाने लहान असल्याने सर्वांचा कौतुकाचा विषय ठरू लागलो. त्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा मिळू लागली .पेठे विद्यालयातील शिक्षक वृंद खरोखरच पेठे हायस्कूलच्या लौकिकास साजेसा असाच होता.त्यामुळे आपण एका नामवंत शाळेत शिक्षक म्हणून काम करतो याचा अभिमान वाटू लागला.
   दरवर्षी मराठी दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी जिन्यावरून अचानक एंट्री घेणारे नटसम्राट दत्ता नागपुरे सर ! पंधरा-वीस मिनिटे अप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेतून ते बाहेर पडत नसत. आप्पासाहेबांची व्यक्तिरेखा प्रत्यक्ष पाहण्याचा आणि अनुभवण्याचा माझा तो पहिला प्रसंग होता. नागपुरे सरांचे वक्तृत्व, शब्दफेक काळजाचा ठाव घेत असे. दत्ता नागपुरे सर हाडाचे कलावंत. मधल्या सुट्टीत त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल ते आमच्याशी चर्चा करीत. स्टाफ रूम मध्ये वातावरण शैक्षणिक आणि सांस्कृतिक गप्पांनी भारलेले असे.
 कधीतरी एक दिवस काठी टेकत टेकत एक गृहस्थ आले.शिक्षक विश्रामिकेत सर्वजण उठून उभे राहिले. दत्ता नागपुरे आणि नवीन तांबट सरांनी त्यांच्या पायाला स्पर्श केला. थोड्या वेळा नंतर ते निघून गेले. आम्हाला नंतर कळले. ते नाशिक मधील ज्येष्ठ कलावंत आणि पेठ हायस्कूल मधील निवृत्त शिक्षक श्री.बाळ भाटे होते! चित्रपटासाठी गाणी लिहिणारा गाणारा अस्सल कलावंत!! तांबट सर भरभरून त्यांच्याबद्दल बोलत होते. मनात आले, अरे आपण का नाही त्यांच्या पायाला स्पर्श केला ?  ती खंत आजही मनात घर करून आहे. शाळेत असे कलाप्रेमी आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे शिक्षक होते. ते हळूहळू कळू लागले. शाळेप्रती आत्मीयता आणि अभिमान दिवसागणिक वाढत गेला.आम्हा तरुण शिक्षकांना पेठेतील नामवंत शिक्षकांबद्दल ज्येष्ठ शिक्षकांकडून खूप ऐकायला मिळाले.
   श्री.दत्ता नागपुरे सर यांनी स्टेजवर उभे राहण्याचा आत्मविश्वास दिला.श्री.नागपुरे सर रजेवर असले की मी माइकचा ताबा घेत असे. गरजेनुसार माझ्या वाचनाचा आवाका वाढू लागला.दर शुक्रवारी नवीन गोष्ट मुलांना सांगू लागलो. हळूहळू संस्था स्तरावरील कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मिळू लागली.
   मुख्याध्यापक म्हणून श्री.वि.भा.देशपांडे सरांनी माझ्यावर अनेक कामांची जबाबदारी विश्वासाने सोपवून माझा आत्मविश्वास वाढविण्याची संधी दिली. श्री.डी.एस.कुलकर्णी सरांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने एक शिक्षक म्हणून माझी ओळख निर्माण होऊ शकली. शाळेबरोबरच शासकीय, खाजगी प्रशिक्षणासाठी रिसोर्स पर्सन म्हणून जाण्याची संधी या काळात मला मिळाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात काम करण्यास कुलकर्णी सरांनी मला प्रोत्साहन दिले. सरांच्या निवृत्तीनंतर केंद्र संयोजक म्हणून संस्थेने माझ्यावर जबाबदारी दिली. याच काळात शाळांतील विविध समित्या, पालक शिक्षक संघ, अनेक उत्सव आणि समारंभ, वार्षिक स्नेहसंमेलन याचे सूत्रसंचालन करता आले.श्री . वि.नि. बोडके सर यांनी पत्राचे उत्तम ड्राफ्टिंग शिकवले.समित्यांचे इतिवृत्त लिहिण्यातील बारकावे समजावून सांगितले. शाळेचे काम सांभाळून संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू लागली. तत्कालीन संस्थेचे कार्यवाह यांनी संस्थेच्या विविध महत्त्वाच्या समित्यांचे इतिवृत्त ,माझे अक्षर बरे असल्यामुळे लिहिण्याची संधी दिली. त्यातून इतिवृत्त लेखनाचा चांगला सराव माझा होऊ शकला. 
    पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक अशा विविध भूमिकांमधून काम करीत संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असलेले श्री.चंद्रशेखर वाड सर यांच्याबरोबर व मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आमच्या पिढीला प्राप्त झाली. ती खरोखरच भाग्याची गोष्ट म्हटली पाहिजे. इंग्रजी विषयाचे व्यासंगी शिक्षक, एक संवेदनशील अध्यापक म्हणून श्री.वाड सरांची ख्याती आहे. केवळ पेठे विद्यालयातच नव्हे तर नाशिक शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना सरांच्या ज्ञानाचा लाभ झाला आहे. चोवीसतास अध्ययन आणि अध्यापनात श्री.वाड सर गढलेले असत.वर्गात वाड सर उभे राहिले की, कठीण विषय सोपा ते करून सांगत.व्याकरण दृष्ट्या शुद्ध बोलण्याचा त्यांचा हट्ट असे.वर्ग नियंत्रणाचा फारसा त्रास त्यांना होत नसे. कारण मायेच्या ममतेने त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद असे. अत्यंत मधुर ते बोलत. विद्यार्थ्यांना समजून घेत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत करीत. कधीकधी स्वतः भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यांच्या कडा  पाणावत.शिक्षकांशी देखील त्यांचे अत्यंत उत्तम संबंध असे.जुनियर शिक्षकांना प्रगतीसाठी ते मार्गदर्शन करीत. मुख्याध्यापक असताना सर्वांकडून उत्तम काम त्यांनी करून घेतले. वाड सरांनी शाळेत अध्यापनाचे काम करीत असताना संस्थेचे सहकार्यवाह म्हणून अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली.पत्रव्यवहार आणि शासकीय कामे तसेच इतिवृत्त लेखनात सर तरबेज आहेत. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक मंडळाचे अध्यक्षपद सरांनी भूषविले. स्वतः मध्ये असलेली तल्लख बुद्धी आणि विश्वासूपणा वाड सरांच्या जमेच्या बाजू आहेत.
    श्री.रमेश देशमुख सर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. काम करताना प्रशासनातील अनेक क्लुप्त्या समजल्या.
  सन.२०१४ ते २०१७ च्या वार्षिक निवडणुकीत पेठे विद्यालयाच्या शिक्षक प्रतिनिधीपदी माझी बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्यवाह (अर्थ) म्हणून जबाबदारी सोपवली.अर्थ विषयाची बाराखडी देखील मला ठाऊक नव्हती .संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके सर यांनी मला अर्थ साक्षर केले.
   २०१७ च्या त्रैवार्षिक कार्यकाळात माझी ओळख श्री.राजेंद्र निकम यांच्याशी झाली. त्याआधी संस्थेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेत विविध सभांच्या दरम्यान येणारे कडक स्वभावाचे निकम सर, अशी ओळख होती. परंतु, पर्वताजवळ गेल्याशिवाय त्याच्या उंचीचा प्रत्यय येत नाही.तसे निकम सरांच्या बाबतीत झाले. या कार्यकाळात त्यांना अत्यंत जवळून अनुभवता आले. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक.त्यामुळे शिक्षणाचा वारसा त्यांना लाभला आहे. तसे म्हटले तर शीघ्रकोपी असलेला त्यांचा स्वभाव हा देखील त्यांना मिळालेला वारसाच! 
       मूळ शेतीचा पारंपरिक व्यवसाय करून कष्टाने त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. व्यावसायिक अध्यापन शास्त्रातील पदविकेचे शिक्षण पूर्ण करून नाशिक एज्युकेशन सोसायटीत शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेत नोकरीला सुरुवात केली. उत्तम अध्यापक, प्रामाणिक सहकारी आणि दिलदार मित्र अशी त्यांनी ओळख निर्माण केली. स्वभावाने तापट असले तरी अंत:करण निर्मळ आहे. शिक्षक असताना शाळा विद्यार्थी आणि संस्था हिताला त्यांनी प्राधान्य दिले.  कमी कालावधीत त्यांना मुख्याध्यापक होण्याची संधी लाभली. तरुण मुख्याध्यापक आणि ज्येष्ठ शिक्षक वर्ग या दोन्ही गोष्टींचा उत्तम मेळ त्यांनी  साधला. ज्येष्ठ शिक्षकांशी त्यांचा स्नेह आजही कायम आहे. ज्येष्ठांनी देखील सरांच्या आज्ञेचे उल्लंघन केले नाही. मुख्याध्यापक म्हणून चांगलीच छाप त्यांनी सोडली. विशेष म्हणजे मराठी शाळांचे प्रवेश वाढविण्यासाठी अनेक क्लुप्त्या त्यांनी शोधून त्याची अंमलबजावणी केली.याच कार्यकाळात राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कुशल नेतृत्व त्यांनी केले. राज्यभर त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्यातील कामाची तडप आणि विश्वासार्हता या गुणांमुळे संस्थेतील शिक्षक मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदे त्यांनी सन्मानाने भूषविली. संस्थेच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करू शकले आहेत. नाशिक जिल्हा भारत स्काऊट गाईडचे सचिव पद त्यांनी अनेक वर्षे भूषविले.स्काउट गाइड संघटनेला जिल्हा आणि राज्यभरात मजबूत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पदाची लालसा आणि गर्व त्यांना नाही. श्री.निकम सरांना माणसे जोडायला खूप आवडते. संघटन करण्याचे उत्तम कौशल्य त्यांच्या अंगी आहे. वेळोवेळी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा त्यांच्यातील मोठा गुण आहे. कोणत्याही कामाचे श्रेय ते स्वतःकडे घेत नाही. आपल्या हाताशी असलेल्या व्यक्तींपैकी योग्य व्यक्तीची निवड करण्याचे कौशल्य आणि दृष्टी त्यांच्याकडे आहे.  खरे तर त्यांचा स्वभाव म्हणजे नारळ - फणसा सारखा ! जितके तापट- रागीट ते वाटतात,तितकेच संवेदनशील, मृदू भावनिक, प्रेमळ ते अंत:करणातून आहेत. संस्थेवर नितांत श्रद्धा असणाऱ्यापैकी एक म्हणजे श्री.राजेंद्र निकम .कार्यवाह म्हणून अत्यंत कौशल्याने ते नेतृत्व करीत आहेत. शासकीय किंवा राजकीय तसेच अनेक क्षेत्रांतील लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांचा निश्चितच संस्था हितासाठी लाभ होतो. सतत कामात राहणे ते पसंत करतात. पारंपरिक शेतीत कष्टने हा त्यांचा छंद ! त्यासाठी ते वेळ राखून ठेवतात.सध्यातरी संस्था आणि शेती दोघांची उत्तम मशागत ते करीत आहेत!
   शाळेचा आणि संस्थेचा लौकिक वाढविण्यात यांसारख्या अनेकांचा हातभार लागला आहे.
   सन.२०२२-२०२३ हे नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाचे शताब्दी महोत्सवी वर्ष आहे. व्यक्ती मुळे संस्था की संस्थेमुळे व्यक्ती ..हा वादाचा विषय होऊ शकेल. परंतु,संस्थेमुळे ओळख निर्माण झालेल्या अनेक नामवंत शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांमुळे संस्थेची वाटचाल शतकोत्तर देखील यशोशिखराकडे होत राहील. यात शंका नाही...

श्री.शैलेश पाटोळे 
पेठे विद्यालय ,नाशिक
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️



No comments:

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...