Saturday, May 8, 2021

बाळासाहेब : एक आनंदयात्री

           बाळासाहेब : एक आनंदयात्री
 
अपकीर्ती सांडावी l सत्किर्ती वाढवावी ll
विवेके दृढ धरावी l वाट सत्याची ll
    समर्थ रामदासांनी उत्तम व्यक्तीच्या सांगितलेल्या या लक्षणांप्रमाणे काही व्यक्ती तंतोतंत वागत असतात. आपल्या वागण्या बोलण्यातून व्यवहारातून आपल्या कुटुंबाची,समाजाची पत वाढवतात.सद्बुद्धी ने वागतात. सत्याने मार्गक्रमण करतात आणि आपला जन्म सार्थकी लावतात. अशा उत्तम व्यक्तीच्या पंगतीत बसणारे वाय.आर. उर्फ बाळासाहेब ! जणू काही बाळासाहेबांच्या जीवन कार्याकडे पाहूनच वरील श्लोक लिहिला गेला असावा. यातील अतिशयोक्ती भाग वगळता बाळासाहेबांचे कार्यकर्तृत्व खरोखरच वाखाणण्यासारखे होते.
       बागलाण तालुक्यातील सटाणा निवासी श्री. राघोबा खंडेराव पाटोळे यांच्या कुटुंबात मुलांमध्ये शेंडेफळ म्हणून जून महिन्याच्या १० तारखेला १९३० साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात यशवंतांने जन्म घेतला. सर्व भावंडांमध्ये लहान असल्यामुळे सर्वजण लाडाने त्याला बाळू असे म्हणत. पुढे बाळू ते बाळासाहेब हा त्यांचा प्रवास नक्कीच इतरांना प्रेरणादायी आहे.
   सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव हे त्यांचे मामाचे गाव श्री.मोहनराव वाघ त्यांचे आजोबा. तेथे यशवंताचा जन्म झाला.
   श्री.राघोबा दादा आणि सौ.साखरबाई यांना १४ अपत्ये झाली.त्यापैकी सहा अपत्ये बालपणातच या- ना- त्या कारणाने दगावली. आठ अपत्ये ईश कृपेने वाचले. त्यापैकी सर्वात मोठी मुलगी सौ.अनसूयाबाई. ज्यांचे लग्न होऊन तालुक्यातील पारनेर या गावी श्री.झिप्रू थोरातांकडे दिले. तर लहान मुलगी सौ.शकुंतलाबाई या नाशिक मधील कानडे कुटुंबात लग्न होऊन गेल्या.
     स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्यानंतरच्या अगदी प्रारंभीच्या काळात स्पृश्यास्पृश्य भेद तसा समाजात होताच. स्वतः शिक्षक आणि मुख्याध्यापक असल्यामुळे मुलांवर उत्तम संस्कार वडिलांकडून  झाले. खेड्यापाड्यात राहून स्वतःच्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. राघोबादादांच्या मुलांची ओळख करून घेताना खरोखर आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. राघोबादादांच्या पहिला मुलगा धुळे शहरातील नामवंत वकील ॲड.श्री. मोतीराम पाटोळे उर्फ वकील दादा. वकिलीच्या व्यवसायात त्यांनी मोठे नाव कमावले. मामलेदार होण्यासाठी आवश्यक परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. धुळे शहरातील त्यांचे घर म्हणजे आंबेडकर चळवळीचे केंद्रस्थान होते.
     दुसरे चिरंजीव श्री.पंढरीनाथ पाटोळे, सटाणा येथील पारंपरिक शेती आणि दुकान सांभाळण्याचे काम करीत. उत्तम बूट कारागीर म्हणून त्यांचा लौकिक होता.पुढे मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांनी आपल्या कुटुंबाचा उद्धार केला. श्री. वामनराव पाटोळे हे कुटुंबासह मुंबई येथे वास्तव्यास होते.हे राघोबादादांचे तिसरे चिरंजीव.
  लालबागच्या BEST  मध्ये नोकरीस असलेले श्री.एकनाथराव पाटोळे (सध्या हयात असून वय वर्षे ९९ आहे.)हे कुटुंबाचा मोठा आधार होते. श्री.नामदेवराव पाटोळे पुण्यात वेधशाळेत नोकरी करीत. यावर्षी ते वयाची ९४ वर्षे पूर्ण करीत आहेत.
   मुलांमध्ये धाकटे असलेले यशवंत उर्फ बाळू काका हे सर्वांचे लाडके. त्यांचे बालपणीचे शिक्षण सटाणा येथील म्युन्सिपल शाळेत झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे मोठे बंधू धुळे येथे स्थायिक झाल्याने आई-वडीलांनी लाडक्या यशवंताला धुळे येथे शिक्षणासाठी पाठविले. काही काळ नंदुरबार तसेच अमळनेर येथे देखील शिक्षणासाठी गेल्याचे ऐकिवात आहे. मॅट्रिक नंतर मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये प्री डिग्रीसाठी ऍडमिशन घेतले. सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि ऐकण्याचा दुर्मिळ योग यशवंताला आला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वैयक्तिक लायब्ररीतील सर्व पुस्तके सिद्धार्थ कॉलेजमधील लायब्ररीला भेट म्हणून दिले होते. त्यातून प्रेरणा मिळवून यशवंताला वाचनाची आवड निर्माण झाली. आपणही पुढे उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर पुण्याच्या सी.ओ.ई.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली. साधारण हा काळ १९५२- १९५६ चा असावा. मागास समाजातील एखादा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन इंजिनियर होतो, कदाचित, ते समाजातील नाशिक जिल्ह्यातील पहिले इंजिनियर असावेत ! ही खूप मोठी बाब होती.
   १९५६ यावर्षी इंजीनियरिंग उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी प्रमाणपत्र हातात मिळण्याआधीच मुंबई येथे गोदरेज कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी यशवंतला संधी मिळाली. तोपर्यंत डिग्री सर्टिफिकेट विद्यापीठातून घेतलेले देखील नव्हते. परंतु, आत्मविश्वास, हजरजबाबीपणा आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी नामांकित गोदरेज कंपनीत नोकरी मिळवली. इंटरव्यूसाठी पॅनल बसले होते. सर्व प्रश्नांचे सोपस्कार पूर्ण झाले. वैयक्तिक माहिती विचारून झाल्यावर कंपनीचे मालक श्री.नवल गोदरेज यांनी यशवंताला प्रश्न विचारला," या व्यतिरिक्त अजून काय येते?.." अशावेळी वेळेचे भान राखत यशवंताने आपल्याकडे असलेली एक कला इंटरव्यू पॅनल च्या समोर पेश केली. फार कमी लोकांना अवगत असलेली एक कला यशवंताला अवगत होती. ती म्हणजे नखाने कागदावर डिझाईन किंवा ड्रॉइंग काढणे! श्री.नवल गोदरेज यांनी विचारताच यशवंताने एक कागद घेऊन नखाने "गोदरेज " हे नाव कंपनीच्या लोगो प्रमाणे कागदावर काढले. ही कला पाहून श्री.नवल गोदरेज बेहद खूष झाले.त्यांनी उठून उभे राहून यशवंतशी हात मिळवून त्याचे कौतुक आणि अभिनंदन केले.. उद्यापासून कंपनीच्या डिझाईन सेक्शन मध्ये जॉईन व्हा ! असा आदेश दिला. कला माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही... खरोखर कला असे मानवाशी भूषण ! डिग्री सर्टिफिकेट न पाहता असलेल्या कलेने खुश होऊन यशवंताला नोकरी मिळाली.पुढे त्या कागदाची त्यांना कधीच गरज पडली नाही. आजही ते डिग्री सर्टिफिकेट विद्यापीठात धूळखात पडलेले असणार !
  अभ्यासाबरोबरच नखाने डिझाईन काढणे,ड्रॉइंग काढणे या कलेत ते तरबेज होते. त्याच प्रमाणे जगावेगळा एक अनोखा छंद त्यांना होता.तो म्हणजे उत्तम गाण्याचा. तुम्ही म्हणाल याच्यात जगावेगळे काय? अनेक लोक उत्तम गातात... थांबा सांगतो. यशवंत गायचा.. परंतु गाण्याचे प्रत्येक बोल उलटे म्हणण्याची हातोटी त्यांच्याकडे होती! बहुतांश लोकांना इतरांना उलटून बोलायची सवय असते, तसे नव्हे!
   गाण्याचे प्रत्येक शब्द त्याच लयीत, गतीत, तालात सुरात न अडखळता, अगदी अस्खलितपणे उलट्या पद्धतीने म्हणत उपस्थितांचे मनोरंजन करीत असत. फार कमी लोकांना हे जमत असावे. बुलबुल हे वाद्य ते अत्यंत खुबीने वाजवत. कानडा राजा पंढरीचा हे त्यांचेेेे सर्वात आवडते गीत.याचा अर्थ संगीताशी त्यांचे फार जवळचे नाते होते. कदाचित हेच त्यांच्या निरामय दीर्घायुष्याचे गुपित असावे.
   लहानपणापासूनच ड्रॉईंग मध्ये त्यांना रुची होती. ईश्वराच्या कृपेने त्यांनी नोकरी करत असताना ड्रॉइंग डिझाईन सेक्शन मध्येच काम करण्याची त्यांना संधी मिळाली. हा निव्वळ योगायोग असावा ! नाहीतर अनेकांची आवड-निवड- नोकरी आणि व्यवसाय यांचा ताळमेळ आयुष्यभर जमलेला दिसत नाही!
  आपल्या कामातून ,प्रामाणिकपणातून कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. प्रारंभीच्या काळात नोट प्रेस साठी लागणारे कॉइंन मशीन जर्मनीहून मागविले जात. ते नादुरुस्त झाले की जर्मनीहून अभियंते बोलवावे लागत.यासाठी फार खर्च पडे. अशावेळी कंपनीचे मालक श्री.नवल गोदरेज यांनी सदर मशीन भारतीय बनावटीत बनवता येईल का ?असा विचार मांडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मशीनचे डिझाईन यशवंताने बनवले.पहिले भारतीय बनावटीचे कॉइन प्रेसिंग मशीन बनविण्यात यशवंताचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी त्यांच्या कर्तृत्वामुळे सात हजार रुपयांचे इनाम कंपनीला  मिळाले. गोदरेज कंपनीचे चहुकडे कौतुक झाले. एका समारंभात श्री.नवल गोदरेज पुढच्या रांगेत बसले होते. त्याच्या मागील रांगेत यशवंत आणि त्यांचे सहकारी बसलेले होते. पुरस्काराची घोषणा झाली. श्री.नवल गोदरेज यांना पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आमंत्रित केले केले. पुरस्कार स्वीकारताच या पुरस्काराचे सर्व श्रेय इंजिनीयर श्री.यशवंतराव पाटोळे यांना जाते,असे अभिमानाने आणि गौरवाने श्री.नवल गोदरेज यांनी जाहीर केले. टाळ्यांच्या कडकडाटाने यशवंता चे कौतुक झाले. एका लहानशा खेड्यातून आलेला मुलगा, ज्याच्या कर्तृत्वामुळे गोदरेज सारख्या मोठ्या कंपनीचा लौकिक वाढला होता. यशवंतच्या सर्जनशीलतेची आणि यशाची ती पावती होती. याप्रसंगी यशवंताला आपल्या आई वडिलांची आठवण झाली. हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. मला कृतार्थ झाल्यासारखे वाटले.असे यशवंतराव या प्रसंगाचे वर्णन करताना सांगत.
   कंपनीत कामाच्या जोरावर त्यांना वेगवेगळ्या पदांवर बढती मिळत गेली. कंपनीतर्फे जपान, जर्मनी या देशात जाण्याची संधी देखील मिळाली.
   त्यांना नाविन्याची हाऊस होती. नवनवीन वस्तू बाजारात आल्या की, त्या ते खरेदी करत.स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवीत.टप्प्याटप्प्याने आणि आर्थिक स्थितीनुसार टी.व्ही., स्कूटर, कार,कॅमेरा..या वस्तू त्याकाळी श्रीमंतीच्या व्याख्येत बसणार्‍या होत्या. त्याचा उपभोग त्यांनी घेतला.
   त्या काळात प्राथमिक अवस्थेतल्या कॅमेरा मध्ये रोल असे .त्यातून केवळ पंधरा-सोळा फोटो निघत. फोटोकॉपी डेव्हलप करणं तसे कष्टाचे आणि खर्चाचे देखील होते.कॅमेरा घेतल्यानंतर यशवंतराव, ज्यांच्याकडे जातील आणि जे त्यांच्याकडे येतील अशा सर्व लोकांचे फोटो काढत. त्या माध्यमातून मित्र नातेवाइकांच्या आठवणी ते संग्रही ठेवत. अशावेळी पैशांचा विचार त्यांनी कधी केला नाही. खेड्यापाड्यातील आपल्या नातेवाईकांचे फोटो काढत. अशावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदापुढे पैशाची त्यांना किंमत वाटत नव्हती. त्यांच्या वडिलांचे म्हणजे श्री.राघोबादादांचे १९६३ ला निधन झाले. ते दुर्मिळ फोटो देखील त्यांच्या संग्रही आहेत. नव्या पिढीला त्याकाळी जमलेले लोक ओळखू देखील येत नाहीत. परंतु पन्नास-साठ वर्षांपूर्वी काढलेले ते फोटो आपल्याला गतस्मृतीत घेऊन जातात.त्यांना जुन्या आठवणीत रमायला खूप आवडत असे. नव्हे तो त्यांचा छंद होता. त्यांच्या घरी गावाकडून कोणी नातेवाईक, मित्र ,पाहुणे आले की, त्यांना न कळू देता यशवंतराव टेपरेकॉर्डर वर रेकॉर्डिंग सुरू करत. गप्पा संपल्या की त्यांचा आवाज ते पुन्हा टेपरेकॉर्डर चालू करून ऐकवत. आपला आवाज पुन्हा ऐकून त्या व्यक्तीचा आनंद गगनात मावेना. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची दैवी शक्ती आणि आशीर्वाद त्यांना लाभला होता!
    आई - वडील, काका - काकू, भाऊ - वहिनी, पुतणे, सुना, नातवंडे- पतवंडे,सर्वांची माहिती अगदी देश परदेशात असले तरी त्यांच्याकडे अद्ययावत असे. शक्य असेल त्या सर्व समारंभात यशवंतराव हजेरी लावत. सभामंडपात यशवंतरावांनी प्रवेश करताच वातावरण अगदी प्रसन्न होत असे. सर्वांशी प्रेमाने आपुलकीने ते वागणार. आपण एखाद्या मोठ्या कंपनीत मॅनेजर वगैरे असल्याचा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर कधीही नसे.मातीशी नाळ वगैरे जे म्हणतात ते त्यांच्या बाबतीत अक्षरशः खरे होते. स्वतःहून कोणाशीही ओळख काढणार.आपुलकीने विचारपूस करणार. ख्यालीखुशाली विचारणार. अनोळखी माणसाशी सुद्धा त्यांचा वार्तालाप म्हणजे कोणीतरी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीशी बोलत असल्याचा भास होई. अशावेळी त्यांना वयाचा अडसर नसे. लहान मुलांंशी खेळायला त्यांना खूप आवडे. कानावर असलेला चष्मा खुबीने ते हलवत... मुलांना ती मोठी गंमत आणि चमत्कार वाटे. कधीकधी पत्त्यांची जादू करून दाखवीत. लहान मुलांचे मनोरंजन करण्यात त्यांना मजा वाटे. 
करील मनोरंजन जो मुलांचे 
जडेल नाते प्रभूशी तयाचे... ............
      लहानांसाठी आजोबा, मोठ्यांसाठी बाळू काका, इतरांसाठी बाळासाहेब ते होते ! आपल्या स्वभावाने, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने लोकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळविले. लोक त्यांना बाळासाहेब नावाने ओळखत.
   संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या शेगाव निवासी श्री. मरिभाऊ व सौ.पार्वताबाई शेगोकार यांची सुकन्या सौ.चंद्रभागा यांच्याशी १५ मे १९६० रोजी यशवंतरावांचा विवाह झाला.संबंधितांकडून शेगावीचे स्थळ आल्यावर वडील राघोबादादांनी भावकीतील काही जाणकार मंडळी तसेच अजमीर सौंदाणे येथील श्री.काळू नारायण पाटोळे उर्फ आप्पा ,असे आठ - दहा जण शेगावी गेले.
        नावाप्रमाणेच मुलगी सुस्वरूप, शांत, संयमी वाटल्याने लग्नगाठ बांधली गेली. मुळातच शिक्षणाची आवड असलेल्या राघोबादादांना शिकलेली व शिक्षिका म्हणून काम करणारी सून मिळाल्याचा अत्यानंद झाला होता.त्यात देखणी आणि सुसंस्कारी म्हणजे दुग्धशर्करा योग जुळून आला. यथावकाश शेगावी लग्नविधी पार पडला. शेगावी ची आर्थिक स्थिती फारशी उत्तम नव्हती.
   पुढे श्री.यशवंतराव आणि सौ.चंद्रभागाबाई यांचा संसार समंजसपणा, सहनशीलता आणि सुसंस्कार यांमुळे फुलला. बाळासाहेबांनी लग्नानंतर सौ.चंद्रभागाबाई यांचे नाव सौ.सिंधुबाई ठेवले. त्यांच्या संसारवेलीवर बहर आला. त्यांना सौ.नंदा, सौ.मीना आणि श्री.अविनाश ही अपत्ये झाली.
  यशवंतराव मुळातच शांत - सुस्वभावी होते तसेच निर्व्यसनी.पत्नी सासरी आल्यावर केवळ कुटुंबाची जबाबदारी पाहते.
नोकरी करीत नाही. म्हणून त्यांनी पत्नीला कधीही कमी लेखले नाही. घर कामात ते पत्नीला आवडीने मदत करीत.त्यांना स्वयंपाक करण्यात रुची होती. पती-पत्नी दोघांचेही विचार सुसंगत असल्याने कधी त्यांच्यात वादविवाद झाले नाहीत.
     श्री.यशवंतरावांनी कायम सासरकडील नातेवाईक आणि सटाणा येथील नातेवाईक यात कधी भेद केला नाही. नातेसंबंधात समतोल साधला. म्हणुनच दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये ते बाळासाहेब होते ! कोणालाही त्यांनी परिस्थितीवरून हिणवले नाही.उलट अडीअडचणीत सदैव हात खुला ठेवला. एक आदर्श पती म्हणून त्यांनी आपली भूमिका छान निभावली. सर्वांचे मन ते जपत. स्वतः कष्ट करून इतरांना आनंद देण्यात त्यांना नेहमी समाधान वाटे. स्वतःकडे असलेल्या विनोदबुद्धी मुळे ते सतत इतरांना हसवत ठेवत. घरात कधी गंभीर वातावरण त्यांनी होऊ दिले नाही.
    मुंबईला त्यांच्या घरी सतत गावाकडून येणाऱ्या नातेवाईकांचा आणि मित्रांचा राबता असे. आल्या गेलेल्यांना दोन घास खाऊ घातल्या शिवाय ते कधीही जाऊ देत नसत. त्यांच्या तृप्तीत त्यांना आनंद वाटत असे. इतर नातेवाईक यशवंतरावांच्या घराला यशवंत भोजनालय आणि यशवंत लॉज विनोदाने म्हणत. आणि ते रूढार्थाने खरे होते. असा एकही दिवस जात नसेल यशवंतरावांकडे कोणी जेवायला, किंवा रात्री निवासाला नसतील. गावाकडून येणाऱ्यांच्या हक्काचं ठिकाण म्हणजे बाळासाहेबांचे घर ! अर्थात यामागे खरे श्रेय सौ. सिंधुबाई उर्फ काकू यांना जातं.आल्यागेलेल्यांचे आगत - स्वागत करताना त्यांनी कधीही कंटाळा केला नाही.हसतमुखाने सर्वांना खाऊ घातले.जणू शेगावीच्या महाराजांचा प्रसादच तो !
   वडील म्हणून मुलांशी तेे वागले नाहीत. मित्र म्हणून मुलांशी त्यांनी संबंध ठेवले.नोकरीत व्यस्त असल्याने कधीतरी अभ्यास घ्यायचे. परंतु ,मुलांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. मुलांची सर्व हौस- मौज, लाड - कोड त्यांनी आपल्या कुवतीनुसार केले. मुलांच्या आवडी निवडी जपल्या. त्यांना शिक्षणात नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्राधान्य दिले. स्वतःचे विचार त्यांच्यावर कधीही लादले नाहीत. चांगल्या गोष्टीसाठी खर्च करायला कधी मागेपुढे पाहिले नाही. मुलांचा खर्च भागवता यावा याकरिता नोकरी व्यतिरिक्त दुसरे काम देखील त्यांनी केले, हे फार कमी लोकांना माहीत आहे. मुलांच्या शाळेचे गणवेश ते घरी स्वतः शिवत. एक छंद म्हणून तसेच शक्य तेवढी काटकसर करता यावी म्हणून शिलाई मशीन त्यांनी घरी आणले होते. मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवता यावा हा हेतू त्यामागे होता. स्कूटर ,सायकल घरच्या घरी रिपेअर करीत. मुलांना शिकवत.
       एकदा जर्मनीला कंपनीतर्फे जाण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी मुलांना विचारले," तुम्हाला काय आणू ?"त्यांना वाटलं मुले चॉकलेट सांगतील. परंतु, चि.नंदाने ,"डॅडी मला VCR आणा." असे म्हटले.तेव्हा ते फारसे काही बोलले नाहीत.कारण त्या काळात ती महागडी वस्तू होती. असे म्हणून ते जर्मनीला गेले साधारण एक महिना कामाच्या निमित्ताने जर्मनीत होते.कंपनी त्या काळात दोन वेळच्या जेवणासाठी आणि किरकोळ खर्चासाठी पगाराव्यतिरिक्त काही पैसे देत असे. यशवंतरावांनी एक वेळच्या जेवणाचे पैसे वाचवून त्यातून परत येताना VCR मुलांच्या आनंदा करिता घेऊन आले. इतका मोठा त्याग मुलांसाठी केवळ वडीलच करू शकतात!
   आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे,अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यासाठी वाटेल ते श्रम करण्याची त्यांची तयारी होती. मुलांनीही त्यांचे स्वप्न पूर्ण केले. विशेष म्हणजे त्यांची तिन्ही मुले वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर झाले. म्हणजे डॉक्टर ! त्यांना अत्यानंद झाला.आपली मुलगी एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झाल्यानंतर आनंदाच्या भरात त्यांनी घरात नृत्याचा ठेका धरला होता ! वडील म्हणून ते असे आदर्श होते.असे आई-वडील लाभणे म्हणजे मुलांचे भाग्यच म्हटले पाहिजे !
      सर्वतीर्थमयी माता सर्वदेवमय: पिता l
      मातरं पितरं तस्मात सर्व यत्न्येन पुज्यते ll
  मुलांनी देखील आई-वडिलांच्या आज्ञानुरुप वागून अशा माता-पित्यांची सेवा केली पाहिजे.
       यशवंतराव सुखदुःखात सारखेच असायचे. संकटांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले.इतरांना आधार दिला.
   डॉ. सुधाकर साने, श्री.पी.एन.मोरे, श्री.कहाते हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र. योग बघा २८ डिसेंबर २०१४ रोजी हृदयविकाराने बाळासाहेबांचे दुःखद निधन झाले. त्या दिवशी रविवार होता. बरोबर आठ दिवसांपूर्वी डॉ. सुधाकर साने त्यांच्या पत्नीसह काही कामानिमित्ताने नाशिकला आले होते. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी त्यांनी पाहुणचार घेतला. दोन्ही मित्रांनी एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारल्या. अनंताच्या यात्रेला जाण्यापूर्वी मित्राशी केलेला तो अखेरचा संवाद ठरला ! आणि पुढच्या आठव्या दिवशी म्हणजे रविवारी बाळासाहेबांनी जगाचा निरोप घेतला. 
      आम्ही नातवंडे - पतवंडे नेहमी त्यांना त्यांचे वय विचारायचो. ते म्हणायचे ,"मी शंभर वर्षे जगणार आहे." असे म्हणताना ते दात दाखवायचे. "बघा अजून माझा एक दात देखील पडलेला नाही." खरोखरच वयाच्या ८५ वर्षापर्यंत त्यांचे दात शाबूत होते. असा आत्मविश्वास त्यांच्यात होता. त्याच्या आयुष्यकालात त्यांना कोणत्याही दुर्धर आजाराने ग्रासले नाही. सतत हास्यविनोदाने दुसऱ्यांच्या आनंदाचे कारण ते बनत. संगीत हे त्यांच्या आवडीचे होते. सतत कार्यमग्न ते राहत असत. दुसऱ्याबद्दल चहाडी- चुगली करणे हे त्यांच्या गावी देखील नव्हते. यासारखे असंख्य गुण त्यांच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्याचे रहस्य असावे. शेवटच्या चार-सहा वर्षांपासून काही अप्रिय घटनांमुळे रक्तदाबाचा त्रास त्यांना होऊ लागला होता. त्याचेच पर्यावसन हृदय विकाराच्या झटक्यात होऊन बाळासाहेबांनी सर्वांचा निरोप घेतला.
    सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बाळू काकांच्या जवळ जास्तीत जास्त नातेवाईकांचे संपर्क नंबर लिहिलेले होते. प्रत्येकाचा वाढदिवस त्यांच्या डायरीत तारीख,वार नुसार लिहिलेले असायचे. मुळातच त्यांच्या दिवसाची सुरुवात ती डायरी चाळून होत असे. त्यांच्या घरी असलेल्या लँडलाईन फोन वरून ज्याचा वाढदिवस असेल, उठल्यावर त्यांना शुभेच्छा ते देत असत. आज-काल घरात असलेली रक्ताची नाती एकमेकांशी अबोल होऊ लागलेली आहेत. परंतु,बाळासाहेब मात्र या सर्वांना अपवाद होते. 
  २०१० च्या ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पाटोळे परिवाराचे रियुनियन त्यांनी नाशिक येथे घडवून आणले. याकरिता प्रचंड मेहनत त्यांनी घेतली. देश-परदेशातील कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क साधून एकत्रित केले. त्यांच्या आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा क्षण होता. हाती घेतलेले एखादे काम चिकाटीने आणि नेटकेपणाने करण्याचेे कसब बाळासाहेबांकडेे होते!
        दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा हा गुण आपण सर्वजण त्यांच्याकडून घेऊया. हीच बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल !


श्री.शैलेश पाटोळे
(बाळासाहेबांचा पणतू)
अजमीर सौंदाणे, ता. सटाणा जि.नाशिक
९८६०७४९७९०


    
   

No comments:

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...