बाप नावाचा माणूस.........
२०१०-११ चे वर्ष, तारीख निश्चित आठवत नाही. शाळेच्या कामानिमित्ताने, मी मुंबई येथे गेलेलो होतो . परतीच्या प्रवासात कसारा घाटाजवळ असताना ,आईचा माझ्या मोबाईलवर फोन आला. दाटल्या आवाजात ,"तुझ्या पप्पांना बरे नाही", असे तिने सांगितले. गाडी घाटात असल्यामुळे मोबाईल ला फारशी रेंज नव्हती. फारसे गंभीर नसावे, असे समजून ,मी नाशिकला आल्यावर फोन करतो, असे सांगितले.नाशिकला परत येईपर्यंत रात्र झाली. घरी आलो. घरात वैशाली आणि मोनू.. दोन वर्षाचा असेल ! नेहमीपेक्षा वैशालीच्या चेहर्यावर गंभीर भाव होते. काय झाले ? असे मी तिला विचारताच, ती मला बिलगुन रडायला लागली ! माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली !! आईने मला तसे काही सांगितले नव्हते. मी तसाच खोलीत गेलो. दरवाजा बंद केला आणि आईला फोन केला. रडता रडता, तिने पप्पांना हार्ट अटॅक आला आहे, असे सांगितले. क्षणभर मी काय ऐकतो आहे, याच्यावर माझा विश्वास बसेना. मी पुरता गांगरून गेलो ! भावनांचा कल्लोळ दाटून आला. मी आईला धीर देण्याच्या ऐवजी ,आई मला फोन वरून धीर द्यायला लागली.कारण शब्दांच्या ऐवजी माझे हुंदके तिला फोन वरून ऐकू येत होते. माझ्या संवेदनशीलतेची आणि भावनिकतेची कल्पना घरातल्या सर्वांनाच आहे.
मोठा भाऊ, निलेश दादाने सटाणा येथे नवीन घर घेतले होते. आणि आई पप्पांना अजमीर सौंदाणे येथील शेतातून सटाण्याच्या घरी रहायला आणले होते. तरीदेखील पहाटे उठून पप्पा शेतात जायचे. गाईचं दूध स्वतः काढून ,शेतीच्या कामाची रुजवात लावून, घरी यायचे. दुपारचं जेवण करून पुन्हा ते शेतात जायचे. रात्री झोपण्यासाठी पुन्हा सटाण्याला येत. हा त्यांचा नित्यक्रम. मला आठवते तसं ते पायी किंवा सायकलने प्रवास करायचे. आता आता कुठे सचिन, म्हणजे माझ्या लहान भावाने त्यांना एक लुना घेऊन दिलेली होती. असेच एके दिवशी शेतातून घरी आले. जेवणं आटोपली .जो तो आपापल्या खोलीत झोपी गेले. साडे अकरा बारा वाजेच्या दरम्यान अचानक पप्पांच्या छातीत दुखायला लागले. कळा येऊ लागल्या. संपूर्ण अंग घामाने चिंब झाले. ते जमिनीवर गडबडा लोळत होते. सर्वजण जागे होऊन काय झाले ? म्हणून बेचैन झाले. दादाच्या ते पटकन लक्षात आले. त्याने शेजारी राहणाऱ्या एका मित्राला बोलावले. इतक्या रात्री ॲम्बुलन्स वगैरे मिळणं तसं कठीण होतं. लवकरात लवकर उपचार मिळणं अत्यंत आवश्यक होतं. काय करावे सुचेना. तेव्हा त्याच्याकडे चार चाकी गाडी नव्हती. त्याने हिंमत दाखवली. दुचाकी गाडीवर तो चालवायला बसला, मध्ये पप्पांना बसवले आणि त्याचा मित्र पप्पांना धरून बसला. "थ्री इडियट" सिनेमातल्या कथेप्रमाणे ,त्यांनी मिळेल त्या हॉस्पिटलमध्ये पप्पांना ऍडमिट केले. अटॅक येऊन गेल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत पप्पांना वैद्यकीय उपचार मिळाले. त्यांचा पुनर्जन्म झाला ! दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे भाऊ आणि सर्वजण तातडीने हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेलो.आय.सी.यू.मध्ये डॉक्टरांनी जाऊ दिले नाही. काचेतून मी पप्पांना पाहिले. माझ्या कडेवर मी मोनुला घेतले होते. आमची नजरा नजर झाली. मी भावनिक होऊन डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होतो. मोनूचा चेहरा पाहून पप्पांच्या चेहर्यावर स्मित हास्य उमटले ! घरी जाऊन आईला आधार दिला. ईश्वराने आमच्यावरची मायेची पाखर शाबूत ठेवली होती !! माझ्या जीवनातील आतापर्यंतचा घाबरवून सोडणारा आणि गलितगात्र करणारा पहिला आणि भयंकर प्रसंग होता तो !!!. आजही तो प्रसंग आठवला ,की मन व्याकूळ होते. आपल्या जीवनाची जडणघडण करण्यास, त्याला आकार देण्यास कारणीभूत ठरणारे वडील, आजपर्यंत कधीही दवाखान्यात ऍडमिट झालेले पाहिले नव्हते. काबाडकष्ट करणारे शरीर आज पर्यंत निरोगी राहिले होते. हे अचानक असे कसे झाले? निश्चित कारण नाही. परंतु हार्टअटॅक येऊन गेला हे मात्र वास्तव होते!
स्वभावाने अत्यंत कडक,बळकट शरीर, उंचपुरा देह, गोरेपान, चांगल्या चांगल्या ना लाजवील, असे व्यक्तिमत्व, चालण्या-बोलण्यात रुबाब ! ईश्वराची देणगी जणू !! याबाबत अनेकांना त्यांचा हेवा वाटे. परंतु परमेश्वर सर्वच चांगल्या गोष्टी एकाला प्रदान करीत नाही. त्यात काहीतरी उणीव ठेवतो ! सर्वच गोष्टी जर माणसाला देवाने दिल्या ,तर लोकांना देवाची किंमत कळेल का?
श्री. काळू नारायण पाटोळे उर्फ आप्पा व श्री गजमल नारायण पाटोळे ऊर्फ तात्या हे दोन भाऊ होते. कमी वयातच दोघांची लग्न झालेली. काळू आप्पांना श्री. देवराम, श्री.शंकर ,श्री .पुंडलिक व मंजुळाबाई ही चार अपत्ये. तर गजमल तात्यांना श्री.दिनेश , श्री.जीवन व रंजना अशी तीन अपत्ये होती. काळू आप्पांचा संसार तुलनेने लवकर फुलला. गजमल तात्यांना त्यामानाने वाट पहावी लागली. कुटुंबातील सदस्यांची संख्या भरपूर.परिस्थिती अत्यंत नाजूक. मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करीत असत. अजमीर सौन्दाने या गावात छोटीशी झोपडी बांधून गावाच्या वेशीजवळ राहत असत. गावात फारसा कामधंदा मिळत नसे. अशावेळी आप्पा आणि तात्या काम शोधण्याच्या निमित्ताने पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेगाव शहरात गेले. तेथे एक मुसलमान सद्गृहस्थ भेटले. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय ते करत असत .मुंबईहून कच्चामाल ने आण करीत असल्याने ,मुंबईच्या मार्केटमध्ये देखील त्यांची ओळख पाळख होती. "चप्पल आणि बूट तयार करण्याचे काम कराल का?", असे त्यांनी आप्पांना विचारले. आम्हाला सफाईदार काम येत नाही ,असे आप्पांनी कबूल केले. त्याने तुम्हाला काम शिकवतो. चांगले काम यायला लागल्यावर मजुरी देईल .तोपर्यंत फुकट काम करावे लागेल, असे सांगितले. आप्पा आणि तात्यांनी होकार दिला आणि आणि चप्पल बूट तयार करण्याच्या मूळ व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. प्रशिक्षित कारागिरांकडून हळूहळू कौशल्य त्यांनी प्राप्त केलं. मालक खुश व्हायला लागले. आप्पा आणि त्याची तीन मुले तसेच गजमल तात्या , असे पाच जण त्या मुसलमान गृहस्थाकडे काम शिकले. त्यांच्या कामावर खूष होऊन त्या सद्गृहस्थाने ,"तुम्ही मुंबईला का येत नाही?", म्हणून आप्पांना विचारणा केली. सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली. सर्व कुटुंबकबिला सौंदाणे येथेच ठेवून, काळू आप्पांनी मुंबई गाठली. बूट तयार करण्याची कला पाहून, मुंबई सेंट्रल भागातील' भेंडी बाजार' परिसरात एक कारखानदार त्यांच्यावर खूप खुश झाला. चांगल्या आणि सफाईदार कामामुळे मालकाचा भरपूर फायदा होऊ लागला. काळू आप्पांनी एक ' पगडी' देऊन मुंबईच्या परेल भागात घर भाड्याने घेतले. भरपूर मेहनत केली. रात्रंदिवस काम करून पै - पै जमवला. दोन पैसे गाठीशी आल्यानंतर त्याच मुसलमान सद्गृहस्थाने," तुम्ही स्वतःचे दुकान का टाकत नाही?", म्हणून काळू आप्पांना सुचविले. घरचेच पाच उत्तम कारागीर हाताशी असताना आपला व्यवसाय छान चालू शकेल, याचा आत्मविश्वास आप्पांना आल्यावर त्यांनी ' माहीम'येथे स्वतःचे दुकान घेतले. सर्व भावांनी मिळून स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने दुकान नावारूपास आणले. काळू आप्पांच्या दुकानात तयार होणारे चप्पल आणि बूट अल्पावधीतच प्रसिद्धीस पावले ! आमचे आजोबा ,श्री. देवराम दादा आम्हाला नेहमी मुंबईच्या गमतीजमती सांगायचे. दुकानाच्या प्रसिद्धी बद्दल सांगताना ते नेहमी जुन्या "वक्त "या सस्पेन्स चित्रपटातील राजकुमार यांच्या पायातील पांढऱ्या रंगाच्या बुटाचे उदाहरण हमखास देत असत ! कारण राजकुमार यांच्या पायातील ' तो' बूट खास काळू आप्पांच्या दुकानात तयार झाला होता! हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असे. फिल्मिस्तान स्टुडिओ कडे जाणारा रस्ता दुकानावरून जाई. चित्रपटातील अनेक नट-नट्या त्या रस्त्याने जाताना पाहिल्याच्या आठवणी दादा नेहमी सांगत. त्याकाळात इम्पोर्टेड वस्तूची दुकाने फारसी नसायची. त्यामुळे प्रसिद्धी पावलेल्या काळू आप्पांच्या दुकानावर नट-नट्या देखील अधून मधून चोखंदळपणे खरेदी करायचे. हळूहळू व्यवसायात वृद्धी झाली. बक्कळ पैसा मिळू लागला. काळू आप्पांनी गावाकडून अनेक लोकांना कामासाठी मुंबई येथे आणले.. त्यांना कारागिरांकडून उत्तम पद्धतीने प्रशिक्षण दिले. त्यांच्या राहण्या-खाण्याची ,कुटुंबाची, ची सर्व व्यवस्था केली. हा काळ म्हणजे काळू आप्पांचा आणि त्यांच्या एकत्रित परिवाराचा" सुवर्णकाळ" होता !!
त्याकाळी "जे.जे. अँड सन्स" या नावाचे, एका गुजराती व्यापाऱ्याची पाच चप्पल बुटांची दुकाने होती. मुंबई सेंट्रल ,ग्रँड रोड ,मरीन लाईन्स ,चर्नी रोड आणि प्रार्थना समाज. या पाचही दुकानांना माल सप्लाय करण्याची ऑर्डर काळू आप्पांच्या दुकानाला मिळायची. हलक्या वजनाचे आणि उत्तम दर्जाचे बूट फक्त याच दुकानात, त्याकाळी तयार होत असत. एका मुसलमान गृहस्थाचा बोट धरून मुंबईला आलेले काळू आप्पा आता एका गुजराती व्यापार्यांच्या हातात हात घालून फिरू लागले होते !! मोठ्या जिद्दीने आणि हिंमतीने त्यांनी आपलं साम्राज्य निर्माण केलं. परंतु आपण ज्या परिस्थितीतून इथपर्यंत आलो ,त्याची जाणीव काळू आप्पांना आणि त्यांच्या परिवाराला होती. गावाकडून दवाखान्याच्या निमित्ताने मुंबईला जर कोणी आले, तर त्यांची सर्व प्रकारची जबाबदारी काळू आप्पांचा परिवार उचलत . त्यामुळे गावोगावी काळू आप्पांच्या नावाची महती पसरली.
चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू लागल्यावर, काळू आप्पांनी अजमीर सौंदाणे या आपल्या गावी शेती घ्यायचा धडाका सुरू केला. गावामध्ये शेती विकण्यासाठी काढली की, आप्पा त्याचा सौदा करीत. मुलाबाळांची लग्न झाली. काळू आप्पा आणि गजमल तात्या यांच्या संसाराची वेल बहरू लागली.
माझ्या पप्पांचा जन्म ,मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये १९४९ मध्ये झाला. घरची सांपत्तिक स्थिती अतिशय उत्तम होती. इयत्ता पाचवी पर्यंत त्यांचे शिक्षण परेलच्या" मुन्सिपल हायस्कूल" मध्ये झाले. संपूर्ण कुटुंब एकत्र नांदत होते. परंतु गावाकडे शेतीचा व्याप वाढल्यामुळे पप्पांचे आई-वडील म्हणजे दादा आणि मोठी माय अजमीर सौंदाणे येथे परतले. शिक्षणासाठी पप्पांना परेल येथे ठेवले. परंतु तेथेआई-वडिलांच्या शिवाय त्यांचं मन काही लागलं नाही. किंबहुना मोठ्या कुटुंबात घुसमट होऊ लागली. आईवडिलांकडे ते परत आले. सातवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतले .आठवी ते पी. डी.पर्यंत सटाण्याच्या मराठा हायस्कूल येथे प्रवेश घेतला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात प्रवेश घेऊन पदवी शिक्षण "राज्यशास्त्र" या विषयात पूर्ण केले. मालेगाव येथे होस्टेलमध्ये राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
१९६४ दरम्यानच्या कालावधीत काळू आप्पांच्या झोपडीचे रूपांतर महाला सारख्या भासणाऱ्या मोठ्या घरात झाले! झोपडी पाडून मोठे आठ खणी घर काळू आप्पांनी उभारले.त्याकरिता पिंपळनेर येथून पाच ते सहा ट्रक सागवानी लाकूड आणले गेले.जवळपासच्या गावातील लाकूड काम करणारे सुतारांना बोलविण्यात आले. पंधरा दिवस या सुतारांना घेऊन मुंबईतील चांगली घरे दाखविण्यात आली. त्यामध्ये गावातील श्री. काशिनाथ मिस्तरी ,ओंकार मिस्तरी ,शंकर आणि दामू मिस्तरी, पंडित शिंदे यांचा समावेश होता. साधारणपणे एक वर्षभर सागवानी लाकडात विविध पशुपक्षी - डिझाईन्स ,कलाकुसर, करण्यात कारागीर दंग होते. त्यातून भव्य असे घर उभे राहिले. जवळपासच्या गावातील अनेक श्रीमंत लोक काळू आप्पा चे घर पाहण्यासाठी खास येत असत. पैसा आणि मन दोन्ही अंगाने श्रीमंत असणारे काळू आप्पा स्वतःच्या हिमतीने प्रसिद्धीस पावले. आल्यागेल्या सर्वांचीच खातरदारी,पाहुणचार होत असे. अडल्यानडल्या ना मदत करीत असे. केलेली मदत या कानाची त्या कानाला कळू देत नसे. लोकही अत्यंत प्रामाणिक होते. शेतीचा व्यवसाय आणि मुंबईच्या दुकानाचा व्यवसाय यामुळे काळू आप्पा आणि परिवाराची भरभराट झाली. पाच-पन्नास लोकांचे कुटुंब काळू अप्पांनी बांधून ठेवले होते. एकतेचे बळ काय असते, हे त्यांनी आपल्या या कृतीतून दाखवून दिले होते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात काळू आप्पांना पैसेवाली असामी समजले जात होते ! समाजबांधवांमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत होती. काळू आप्पांचा शब्द प्रमाण ठरू लागला. काळू आप्पांच्या शेतात उसाचं पीक पाहून लोक आश्चर्याने तोंडात बोटे घालत . काळू आप्पांवर लक्ष्मी प्रसन्न झाली होती!त्यांच्या कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचे फळ त्यांच्या पदरात पडलं होतं. रावळगाव शुगर फॅक्टरी चे मालक अधून मधून काळू आप्पांना भेटण्यासाठी निमंत्रण धाडत असत. नाशिक मधील आयुर्विज्ञान संस्थेचे त्याकाळात काळू आप्पा शेअर होल्डर होते ! चांगल्या आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये त्यांची ऊठबस होती. मुंबईत जसा कारखाना भरात होता तशी गावाकडे शेती !! चार-पाच सालदार ,अनेक बैलजोड्या, उसाचे शेत ,कापूस ही सर्व प्रगती थक्क करणारी होती. त्यांनी केवळ पैसा कमावला नाही ,तर माणुसकीने लोकसंग्रह केला. त्यांच्या चलतीच्या काळात श्री.खंडू शिवराम पाटोळे आणि पांडुरंग शिवराम पाटोळे यांच्या वडिलांचे लवकर निधन झाले .त्यांच्या आई गं. भा. वारूबाई तारुण्यातच विधवा झाल्या.. श्री काळू आप्पांनी त्यांना आधार दिला. मुलांचा सांभाळ केला. काळू आप्पांच्या शेतात ते काबाडकष्ट करीत. आप्पांनी त्यांची लग्न करून दिली आणि त्याचा मोबदला म्हणून दोन्ही भावांना पाच - पाच एकर शेती कसण्यासाठी दिली. अशी मदत त्यांनी अनेकांना केली. काहींनी त्याची जाणीव ठेवली तर काहींनी सोयीस्करपणे विसरणे पसंत केले.
दिवसा मागून दिवस गेले. व्यवसायाबरोबरच कुटुंबाचा विस्तारही वाढत गेला. काळू आप्पांची प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खूपू लागली. त्यांच्या भरल्या संसाराला दृष्ट लागली! श्री. काळू आप्पा आणि श्री.गजमल तात्या या दोघांची विभागणी झाली ! प्रगतीला खीळ बसली. या गोष्टीचे काळू आप्पांना प्रचंड वाईट वाटले.
श्री.देवराम दादा आणि त्यांच्या भावांची देखील कालांतराने विभागणी झाली. घरा दारा बरोबर मने दुभंगली! कुटुंब विस्कळीत झाले.
देवराम दादांना आठ अपत्ये होती. आई वडील, भावा- भावांच्या विभागणीत वाट्याला आलेली शेती आणि कर्जाचा डोंगर ,यामुळे पुन्हा जीवनातला संघर्ष सुरू झाला. परिस्थिती बदलली. सर्व चित्र पालटले. दादांच्या वाट्याला थोडीफार शेती आली. त्यावर आता भागत नसे. खाणारी तोंडे भरपूर आणि उत्पन्नाचे स्त्रोत मात्र कमी. आप्पा आणि दादांनी पुन्हा घरीच बसून चप्पल सांधण्याचे काम सुरू केले. काळाचा महिमा शेवटी काय!
पप्पांची आई, म्हणजे आमची आजी. सौ.भागाबाई अत्यंत साधी आणि सहनशील महिला होती. परिस्थिती नाजूक झाली.त्याकाळात फारसे औषध उपचार उपलब्ध नसत.मोठ्या दवाखान्यात जाऊन उपचार घेणे देखील परवडणारे नव्हते. त्या काळापासून आजीला डोके दुखीचा त्रास सुरू झाला. कधीकधी ती चक्कर येऊन पडे. परंतु आजच्या इतके त्याकाळी महिलांकडे काळजीने पाहिले जात नव्हते. आजीच्या बाबतीतही तेच झाले. पप्पांचे मोठे भाऊ, श्री. दादाजी उर्फ मोठाभाऊ कुटुंबीयांसह मुंबई येथे स्थायिक झाले होते. आईची सतत तब्येत बिघडते, म्हणून माझ्या वडिलांना आईबद्दल चिंता वाटे. आठ मुलांमध्ये पप्पांचा दुसरा क्रमांक. त्या अर्थाने आईची जबाबदारी त्यांच्यावरच होती. घरात सून आणावी, असा विचार सर्वांच्या मनात आला. एफ. वाय. बी.ए.च्या वर्गात असतानाच पप्पांचे लग्न आईची झाले. सासुबाई आणि सुनेचे गुळपीठ जमले. दोघी एकमेकींना धरून राहत. आनंदाने संसार सुरू झाला.
पप्पांचा स्वभाव अत्यंत रागीट .छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना राग येई.परंतु ,एखाद्या गोष्टीवर चार वेळा विचार करून मग ते बोलायचे. स्पष्टवक्ते होते. कोणाचे लांगूलचालन त्यांना कधीच जमले नाही. जे असेल ते तोंडावर स्पष्टपणे बोलत. त्यामुळे त्यांना फारसे मित्र नव्हते. तसे म्हणायला गावातील श्री.नथू मास्तर, त्र्यंबक सहादु पाटोळे, दोधा बापू पाटोळे,भिका भिला पाटोळे, केदा सोनू पाटोळे, निंबा कंडक्टर, महारू पाटोळे हे त्यांचे शाळेतील आणि गल्लीतील मित्र होते. परंतु त्यांचे कोणाशी फारसे पटत नसे. त्यातल्या त्यात श्री.नथू फकीरा पाटोळे उर्फ नथा मास्तर यांच्याशी त्यांचे चांगले ट्युनिंग होते. काही वर्षांनंतर एका नाजूक अशा घटनेमुळे ते नाते तुटले. चारचौघात गप्पा मारत बसणे, त्यांना आवडत नसे. शिस्तीच्या बाबतीत अत्यंत कडक होते. सर्व गोष्टी त्यांना नीटनेटक्या लागत. सर्वजण आईला नेहमी विचारात की," तू हा नवरा कसा सांभाळतेस?" लहानपणापासून पप्पांचे त्यांच्या आईने खूप लाड केले. कारण त्या काळात परिस्थिती चांगली होती. ते म्हणतील ती गोष्ट त्यांना मिळत असे. परंतु,हळूहळू परिस्थिती बदलली. तसा स्वभावात थोड्याफार प्रमाणात बदल झाला. त्यांना घरादारातील सर्व लहान मोठे "जिभाऊ" या नावाने हाक मारतात. भाऊ देखील त्यांना घाबरत असत. ' करड्या'असलेल्या त्यांच्या डोळ्यांची प्रचंड दहशत होती !
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी बऱ्याचदा प्रयत्न केले.पण दरवेळेस यशाने हुलकावणी दिली. १९७४ मध्ये बी.ए. उत्तीर्ण झाले. नाशिकच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधून त्यांना "प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर" पदासाठी कॉल आला.इंटरव्ह्यू झाला. परंतु नोकरी मिळू शकली नाही. स्टाफ सिलेक्शन कमिशन ची परीक्षा एकदा पुणे येथून दिली. रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये देखील नोकरीसाठी परीक्षा दिल्या. मुंबईच्या अंधेरी भागातील एम.आय.डी.सी.मध्ये निवड झाली, परंतु तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने नोकरीची ऑर्डर ताब्यात मिळाली नाही. एस.टी. महामंडळात क्लर्क म्हणून परीक्षा दिली. तिथेही ही अंतिम सिलेक्शन काही कारणामुळे झाले नाही. एम.पी.एस.सी.ची पोलीस सब इन्स्पेक्टर ची परीक्षा दिली .परंतु नशिबाने हुलकावणी दिली.अनेकदा हातातोंडाशी आलेली संधी काहीना काही कारणांमुळे हातातून निसटून जात होती. शेवटी नोकरी करण्याचे खूळ त्यांनी मनातून काढून टाकले. घरी शेती करण्यासाठी, इतर भावंडे लहान असल्यामुळे पप्पांवर जबाबदारी आली.
आपल्याला नोकरी लागू शकली नाही,याचे दुःख त्यांच्या अंतर्मनात मात्र कायमच राहिले. शेतात त्यांनी प्रचंड कष्ट केले. आपल्याला नोकरी नसल्याचा 'न्यूनगंड' मात्र त्यांना कायम सतावत असे .या विचाराने ते कधीकधी चिडचिड करत. आपल्याबरोबर शिकलेल्या इतर मित्रांना नोकरी मिळाली. ते शहरात राहतात. मौजमजा करतात. आपण आपल्या मुलाबाळांची हौस-मौज करू शकत नाही. कधीकधी या विषयावरून लोक टोचून बोलत. त्यांच्या मनाला ही गोष्ट फार लागत असे.
आई आणि पप्पा तसे दोघेही ही त्या काळात उच्चशिक्षित होते. दोघांनाही नशिबाने खऱ्या अर्थाने हुलकावणी दिलेली होती. परंतु, आपली शिक्षणाची आणि नोकरीची अर्धवट राहिलेली इच्छा आपण मुलांच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो.हे ध्येय दोघांनी पुढे जिद्दीने पूर्ण केले. आई-वडील दोघेही दिवसभर काबाडकष्ट करून, रात्री झोपी जाण्यापूर्वी मुलांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष देत होते. मुलांबरोबर अभ्यासासाठी जागत होते. अभ्यासासाठी आवश्यक वातावरण त्यांनी निर्माण करून दिले. पप्पा म्हणजे फणसासारखे!वरुन स्वभावाने कडक,परंतु आतून अत्यंत निर्मळ आणि प्रेमळ !! वडील म्हणजे उंबराचे झाड! वडील म्हणजे समुद्रातलं जहाज !! वडील म्हणजे वादळातलं घर !!! त्यांचे रागावणे आज आमच्या फायद्याचे ठरले. आईसारखं कधी त्यांना आमच्या डोक्यावरून हात फिरवता आला नाही .परंतु त्यांच्या प्रेमळपणाचा सहवास आम्हाला अखंड लाभला. आम्ही लहान असताना शेतात राहत असल्याने, आमची खूप काळजी घेतली. आई पप्पा आमचा लाड पुरवत. आम्हा भावंडांचे खाण्यापिण्याचे कधीही हाल त्यांनी होऊ दिले नाहीत. आधी अभ्यास, मग शेतीची कामे आम्ही करायचो. वर्षभर स्वतःसाठी पप्पा काहीही खरेदी करत नसत.मुलांना दिवाळीसाठी कपडे घ्यावे लागतील, म्हणून चार महिने आधीच तयारी करत असत. सालदारासारखे शेतात राबूनही आई पप्पांच्या हाती काहीही पडत नसे. तरीदेखील आहे त्या परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले. दुसऱ्यांचा हेवा त्यांनी कधी केला नाही आणि आम्ही केलेलाही त्यांना चालत नसे. त्यांच्या संस्कारांमुळेच आज आमच्या आयुष्याला योग्य वळण मिळाले. आम्ही भावंड नोकरीला लागलो, याचा त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा श्रीगणराया ने पूर्ण केली.
त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे भाऊ- बहिणी काका-पुतणे त्यांच्यापासून चार हात लांब राहत असत. किंबहुना ,त्यांचे आई आणि वडील देखील त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे थेट त्यांच्याशी न बोलता सुनेच्या म्हणजे माझ्या आईच्या माध्यमातून बोलत असत .आईने हळूहळू त्यांच्या स्वभावावर नियंत्रण मिळविले होते. या गोष्टीचे सासूबाईंना म्हणजे पप्पांच्या आईला ,माझ्या आईचे कौतुक वाटे! पप्पांच्या अशा वागण्यामुळे शेतातील शेजारीपाजारी देखील आमच्या शेतात पाय ठेवताना चार वेळा विचार करत असे. त्यामुळे पप्पा शेतात असेपर्यंत "कुंपण"घालण्याची गरज पडली नाही! दिवसभर शेतात ते मेहनत करत असत. शेतामध्ये असताना गुराढोरांवर खूप प्रेम त्यांनी केलं. मला आठवतं "बंड्या" नावाचा उंच, धिप्पाड कुत्रा आम्ही पाळला होता. रात्रीच्या वेळेस बंड्याने भुंकायला सुरूवात केली, की अंधार भेदत त्याचा आवाज मैलभर अंतरावर पोहोचत असे. पप्पांना त्याचा खूप लळा होता. एखादा अनोळखी मनुष्य शेतातल्या घराकडे येताना दिसला की ,बंड्या कुत्रा धावत जाऊन, त्या माणसाच्या खांद्यावर दोन्ही पाय ठेवून उभा राहत असे! बंड्याचा आवाज आणि त्याचं रूप पाहून समोरच्याची गाळण होत असे. पप्पा जिथे जातील तिथे बंड्या त्यांची साथ करत असे. एकदा पोपटाचे एक लहान पिल्लू आम्ही पाळले होते त्याला" राजू " या नावाने आम्ही हाक मारत असू. तो सतत पप्पांच्या अंगाखांद्यावर खेळत असे. या झाडावरून त्या झाडावर स्वच्छंदपणे विहार करीत असे. पप्पांनी त्याला "राजू "अशी हाक मारली की,पटकन येऊन तो पप्पांच्या खांद्यावर बसत असे. पप्पांची भाषा त्याला कळे. दोघांमध्ये मुक संवाद चालत असे. बऱ्याचदा गाय आणि म्हैस पप्पाच्या शिवाय कोणाला दूध काढू देत नसत. पप्पा घरी नसताना, इतरांना कधीही त्यांनी दूध काढू दिले नाही. गोठ्यातली जनावरे त्यांचा आवाज ओळखत असत. काही निमित्ताने गावात जायला निघाले की, बंड्या आणि राजू रस्त्यापर्यंत त्यांच्यासोबत जात असत. पाळलेली बदके, कोंबड्या, पप्पा शेतात काम करत असताना त्यांच्या अवती भोवतीच घुटमळत असत. बोलू न शकणाऱ्या निष्पाप जनावरांशी त्यांचे असे घनिष्ठ नाते होते. शेतातल्या बैलजोडीची ते अत्यंत काळजीने निगा राखत.
रिकामटेकडेपणा त्यांना कधीच जमला नाही.वाईट संगत कधी त्यांना लागली नाही. कामाशी काम, असा त्यांचा स्वभाव .गावातील ज्येष्ठ मंडळींना त्यांचं कौतुक वाटे. आम्ही चार भावंडं. शाळेतील आमची प्रगती चांगली असल्यामुळे, "अशोकची मुलं "म्हणून आमचं कौतुक व्हायचं. पप्पांच्या अशा स्वभावामुळे त्यांना मित्र कमी आणि द्वेष करणारे लोक जास्त होते. परंतु पप्पांनी त्याची कधी तमा बाळगली नाही.
एकदा शेतामध्ये कापसाचे पीक लावलेलं होतं. नेहमीप्रमाणे फासेपारधी लोक तितर पक्षी धरण्यासाठी शेतात घुसले .पप्पांनी त्यांना अपमानित करून हाकलून दिले. ते निघून गेले. त्यावर्षी आई दिवाळीसाठी माहेरी गेली होती. त्याच काळात पंधरा दिवस एसटीचा संप झाला. टेलिफोन सारखी सुविधा सहज उपलब्ध नसायची. तिकडे अजमीर सौंदाणे येथे पप्पांची प्रचंड तब्येत बिघडली. खूप ताप आला. डॉक्टरांचा गुण आला नाही. गावातील एका मांत्रिकाने उपचार केला. शेतात आलेल्या आणि अपमानित झालेल्या फासेपारधी यांनी काहीतरी करणी केली ,अशी शंका आली. काही केल्या ताप उतरेना.ताप मेंदूत गेला .अंगात आल्यासारखे असंबंध बडबड ते करीत असत. घरातले सगळेच घाबरले होते. त्यांची प्रकृती पूर्णपणे ढासळली होती. त्याच दरम्यान चणकापूर येथील काशिनाथ नावाचे एक गृहस्थ सालदार म्हणून एका शेतकऱ्याकडे कामाला होते. ते मंत्र विद्येत पारंगत होते.त्यांनी एका कागदावर रक्षा घेऊन ती मंतरली. त्यांच्या कपाळाला लावली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर पप्पांचा ताप लगेचच उतरला . पुढे कधी ताप आला नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग सोडला ,तरी हा चमत्कार मात्र घडला होता. त्यानंतर अधून मधून साधा ताप सोडला, तर त्यांची प्रकृती ठणठणीत राहिली.
इतर कोणी मित्र त्यांना नसले ,तरी माझे मामा श्री. विजय महाले यांच्याबरोबर त्यांचे नात्यापेक्षा मैत्रीचे संबंध अधिक होते. विजू मामा त्यांना अनेकदा मुंबईला बोलवायचे. पाहुणचार करायचे. मुंबईत फिरवायचे.गप्पा गोष्टी करायचे. मामा पोलीस अधिकारी आणि पप्पा शेतकरी परंतु दोघांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. आमच्या आईच्या वडिलांचे म्हणजे माझ्या आजोबांचे मुंबईला के. इ. एम.हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन झाले होते. ऑपरेशन थिएटरमध्ये कोणाला जाण्याची परवानगी नव्हती. सर्वजण दवाखान्याच्या बाहेर थांबले होते. पेशंटला भेटायला जाण्यासाठी मामा पप्पांना घेऊन गेट जवळच्या सिक्युरिटी गार्ड जवळ गेले. ते पी.एस.आय. असलेले ओळखपत्र त्यांनी दाखविले .सिक्युरिटी गार्डने ओळखपत्र पाहिले . त्यांनी पप्पांना आत मध्ये सोडले आणि मामांना आत जाण्यास मज्जाव केला.पप्पांची शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व पाहून ते पोलिस अधिकारी असावेत, असे त्याला वाटले. त्यानंतर मामा जेव्हा जेव्हा पप्पांना बरोबर कुठे घेऊन जायचे ,तेव्हा तेव्हा ...मी स्वतः पोलीस अधिकारी आहे .असं आवर्जून सांगायचे!! हा किस्सा मामा मनमोकळेपणाने हसत-हसत आम्हाला नेहमी सांगायचे. पप्पांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार श्रद्धा आणि कौतुक होते. पप्पांच्या कष्टाळू आणि स्वाभिमानी बाण्याचे त्यांना नेहमी अप्रूप वाटे. विजू मामा हयात असेपर्यंत ,त्या दोघांमध्ये कधीही विसंवाद झाल्याचे मला आठवत नाही. कारण मैत्रीच्या नात्यात त्यांनी कधीही व्यवहार येऊ दिला नाही. ज्या नात्यांमध्ये व्यवहार येतो, ती नाती दीर्घकाळ टिकत नाहीत ,हे मात्र सत्य!
पप्पांचा त्यांच्या आईवर खूप जीव होता. परिस्थिती नाजूक असून देखील दर शनिवारच्या बाजारात खरेदीसाठी जाण्यापूर्वी," तुझ्यासाठी काय आणू ?"असे ते आईला प्रेमाने विचारायचे. त्यांच्या आईला आंबे खूप आवडत असत. आईसाठी खूप काही करण्याची इच्छा असून देखील परिस्थितीमुळे त्यांना काही करता येत नव्हते. परंतु अशोकचा संसार, कुटुंब, त्याची मुलं-बाळं ,त्यांचे शिक्षण ,प्रगती पाहून पप्पांची आई ,मात्र मनोमन खुश व्हायची. आईच्या अखेरच्या क्षणापर्यंत पप्पांनी तिला कधी दुखावले नाही.
निधनापूर्वी एक महिना आधी आमच्या आजी ब्रेन ट्यूमर झाल्याने आजारी पडल्या. त्यांच्या तारुण्या पासून असलेली डोकेदुखी , बरा होऊ न शकणाऱ्या ब्रेन ट्यूमर मध्ये बदलली होती. मेंदूत गाठ मोठी झाली होती. डॉक्टरांनी वय आणि आणि आजाराची स्थिती पाहून, ऑपरेशन न करण्याचा सल्ला दिला. प्रयत्न करूनही आई वाचणार नाही. या विचाराने ते हतबल झाले. आपल्याला ब्रेन ट्युमर सारखा दुर्धर आजार झाला आहे, हे आजीच्या लक्षात आल्यावर माझ्या आईच्या गळ्यात पडून ती ओक्साबोक्शी रडली. "रत्ना , माझ्याकडून अनवधानाने काही चुकले असेल ,तर मला क्षमा कर ."अशी विनंती करू लागली . सासू-सुनेचं असं प्रेम यापुढे कधी पहायला मिळेल ,यावर माझा विश्वास बसत नाही. अशी सासू मिळणं आता दुरापास्त झाले आहे.घरात सगळ्यात मोठे असल्याने पप्पांना रडून चालणार नव्हते. स्वतःच्या भावनांना त्यांनी आवर घातली .बरोबर एक महिन्याच्या आत त्यांच्या वात्सल्यमूर्ती ,आईचे देहावसान झाले. तेव्हा पप्पांच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रु तरळताना मी पाहिले! जीवनातील असंख्य चढ-उतार त्यांनी अनुभवले .अनेक वादळे लीलया अंगावर झेलले ! तेव्हादेखील ते डगमगले नाहीत. परंतु जन्मदात्या आईचे कलेवर पाहून ,त्यांचे हृदय पिळवटून निघाले! आई ,आता अनंताच्या प्रवासाला निघून गेली, ही भावनाच त्यांना अस्वस्थ करून गेली. सर्वजण आईला "माय " म्हणून हाक मारीत असत.
आपल्याला दिव्याचा प्रकाश दिसतो.दिव्याची जळणारी वात दिसते.परंतु ,वात जळून प्रकाश देण्यासाठी आवश्यक असलेलं तेल मात्र दिवा पुरवत असतो. त्याच्याही अंगाचा दाह होत असतो. तो आपल्याला जाणवत नाही .आपलं लक्ष केवळ प्रकाशाकडे जाते.बाप म्हणजे प्रकाश निर्माण करणाऱ्या वातिला तेल पुरवणारा दिवा असतो !! हे आपण विसरून जातो. स्वतः जळून मुलाबाळांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे आई - वडील, हेच तर खरे आपली दैवते असावीत !!
पप्पांनी आम्हाला शिक्षण दिले. स्वाभिमान शिकवला .कष्ट करण्याची सवय लावली. प्रामाणिकपणे जे मिळेल ते आपले ,ही भावना रुजवली .लाचारी ,खोटारडेपणा यापासून दूर राहण्यास शिकवले. आत्मनिर्भरतेसाठी खंबीर बनवले.संवेदनशीलता शिकवली .दुर्गुणांपासून लांब राहण्याचा संस्कार दिला. कुटुंबासाठी आवश्यक प्रेम,जिव्हाळा ,आपुलकी शिकवली. जीवन जगण्यासाठी सर्वकाही दिले. आयुष्यभरासाठी पुरून उरणारी संस्कारांची शिदोरी दिली.
मुलगा म्हणून पप्पांचे अनेक अनुभव मजजवळ आहेत. शब्दांमध्ये व्यक्त करता येणे कठीण आहे. आई आणि वडील हे प्रेमाचा कधीही न आटणारा झरा असतो. त्यांचे प्रेम जन्मापासून मरणापर्यंत कधीच बदलत नाही. बाकी इतर नात्यातले प्रेम काळ वेळेनुसार बदलत असतं !
दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार "फादर्स डे "म्हणून साजरा करण्याची पद्धत अमेरिकेने जगाला दिली. आता त्याचे अंधानुकरण आपण करून ,जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे या फादर्स डे चा उत्सव करीत असतो. मोबाईलच्या माध्यमातून आभासी फुलांची देवाण-घेवाण होते. खरंच बापाच्या प्रेमात एवढी कृत्रिमता असते?
बाप ...म्हणजे कोण असतो?
मुलांसाठी झटताना आपलं दुःख लपवून ठेवणारा हा देव माणूस म्हणजे....बाप!
मुलांचे कोडकौतुक करणारा, वेळप्रसंगी धाकात ठेवत, शांत ,प्रेमळ, कठोर ,रागीट असतो तो म्हणजे.... बाप !!
घराचं खरं अस्तित्व , आधार असतो... बाप !
बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला.
हाडाची काडे करून,
आधार देतो तनामनाला !
आमच्या सर्वगुणसंपन्न पप्पांना परमेश्वर दीर्घ आयुरारोग्य प्रदान करो आणि आमच्यावरील मायेची सावली निरंतर अशीच राखो, हीच श्री गणरायाजवळ विनम्र प्रार्थना.
पप्पा ,सदैव तुमच्या ऋणात राहू इच्छिणारा....
तुमचामुलगा
शैलेश
. रविवार,ज्येष्ठकृ.१५
नाशिक.
लेख तिसरा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
15 comments:
Apratim lekhan kelys kharch kup kasht kelet jibhawuni👍👌👌👌
Khup mast 🙏🏻😎
खूपच छान. सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
nice
Thank you 🙏🙏
आभारी आहे 🙏🙏
🙏🤗
Yes .
Thanks 🙏🤗
सरजी हृदयद्रावक अनुभव आणि अप्रतिम शब्दांकन
"बाप"या विश्वाला अधोरेखित केले सर...👌👍
बाप झाल की बापाची किंमत जास्त जाणवायला लागते ...बाप असतोच हो तसा ..प्रेम करुणा या माध्यमातून तो कधीही फोकस मध्ये येत नाही.कारण तो राबत असतो फक्त राबत...
आणि एक सांगू बापाबद्दल मुलाने काही सांगावं किव्वा लिहावं यासारखं सुख बापाला नसतं....अगदी छान लिहिलय मुलाने बापासाठी...व्यक्त झालंय ...त्याच ..अंतरंग...ज्यात बाप दिसतो ...कर्तृत्ववान बाप!!!!!
आपली बोलकी प्रतिक्रिया !!
धन्यवाद बापू🤗🤗
हर्षल ,आभारी आहे.🤗🙏
अप्रतिम शब्दांकन
Khup chan !
Post a Comment