Wednesday, June 17, 2020

दिवस नवीन इंग्रजी शाळेतले.....

       दिवस नवीन इंग्रजी शाळेतले....✍️✍️ 

 नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या नवीन इंग्रजी शाळा ,ओझर येथे नोकरीची अपॉइंटमेंट ऑर्डर घेऊन, मी एस. टी.ने ओझर येथील खंडेराव मंदिर बस थांब्याजवळ उतरलो. शाळा कुठे आहे? हे माहीत नव्हते .साधारण, माझे दहावीनंतर दोन वर्षांचा डी.एड पदविका शिक्षणक्रम पूर्ण करून आई वडील आणि परमेश्वराच्या कृपेने लगेचच नेमणुकीचे पत्र मिळाले होते. वय साधारण १८ते १९ वर्षांच्या दरम्यान! नोकरी मिळवण्यासाठी फार श्रम पडले नाहीत. ती सहज मिळाली! माझे वडील काही निमित्ताने सटाणा हून नाशिक येथे बसने येत होते. त्यांच्या शेजारी एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत होते. त्यात वडिलांना नाशिक एज्युकेशन सोसायटीची जाहिरात वाचायला मिळाली .नाशिकला आल्यानंतर त्यांनी स्वतः रांगेत उभे राहून, फॉर्म घेऊन, भरला. मला घरी येऊन त्यांनी याबाबत सांगितले देखील नव्हते. अर्थात, नोकरी हा विषय गांभीर्याने घेण्याचे माझे वय नव्हते. त्यांच्या पुण्याईने आज माझ्या हातात शिक्षक म्हणून नेमणूक पत्र होते. नेमणूक पत्रावरील पगाराबाबतचे विवरण देखील मला समजत नव्हते.
      खंडेराव मंदिर बस थांब्यावर उतरुन, शेजारी एक टपरीवजा हॉटेल होते. तेथे शाळेबद्दल विचारणा केली. महामार्ग ओलांडून शाळेजवळ गेलो.
      शाळेच्या दुसऱ्या सत्राची प्रार्थना, वगैरे सुरू होते. गेट जवळ उशिरा आलेल्या मुलांची गर्दी होती .शाळेतील मुले आणि मी ,आमच्यात फारसा फरक नव्हता .मी घाबरत, लाजत, त्या मुलांमध्ये मिसळून गेलो .प्रार्थना आटोपली. गेटवरचे ग्रिल खोलले गेले. सहा फूट उंचीचे, एक धिप्पाड गृहस्थ, तेथे हातात छडी घेऊन आणि गळ्यात थोडी मळकट शबनम अडकवून उभे होते. कोणीतरी पहिलवान असल्याचा भास झाला! मुलांना हातावर खाऊ देत आणि सभ्य शिव्या हासडत त्यांनी मुलांना वर्गात पिटाळले. मी मात्र घाबरत होतो. हळूहळू गेट जवळ सरकलो. त्यांनी मला खुणेनेच बोलावले. काय पाहिजे? ही वेळ आहे का, शाळेत यायची? शर्ट इन करता येत नाही का ?शाळा आहे ,ही धर्मशाळा नाही!! असा तोंडाचा पट्टा सुरू केला. मी अजूनच घाबरलो. ते माझ्या चेहऱ्यावरून त्यांनी ओळखले. मी विद्यार्थी नसल्याचे त्यांना सांगितले. मग त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून गेटमधून मला आत घेतले. मी या शाळेत शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आलो आहे, असे सांगून खिशातले नेमणूक पत्र त्यांना दाखवले .ते फार गांभीर्याने न पाहता म्हणाले," तुला काय येतं ?,"मी गोंधळलो! म्हणजे गायन, वादन ,इत्यादी काही येतं का? असं त्यांना विचारायचं होतं .मी म्हटलं," नाही ".ते म्हटले,"पडली अजून एकाची भर !!" या वाक्याचा अर्थ मला त्यावेळी कळला नाही. नंतर कळले त्यांना काय म्हणायचं होतं! त्यांच्या अशा प्रश्नांनी पुरता गोंधळलो होतो. परंतु "भर पडली" हा शब्द अंतर्मनाला लागून गेला. त्यांनी मला कार्यालय दाखविले.
      मुख्याध्यापक कक्षात विचारणा करून , आत गेलो. नेमणूक पत्र दाखवले. मुख्याध्यापक होते ,श्री. शां. पां.सूर्यवंशी. त्यांनी हिंदी भाषेतून माझी चौकशी केली. मला खूप आश्चर्य वाटले. सरांचे नाव, आडनाव, मराठी भाषक वाटत होते.शाळा मराठी होती. मग हे हिंदीतून का बोलत आहेत ? कालांतराने त्याचा देखील उलगडा झाला. त्यांनी लेखनीकांना बोलावून मला रूजू करून घेण्याबद्दल सांगितले. उद्यापासून सकाळ सत्रात या, चांगले काम करा, अशा सूचना दिल्या.
       विद्यार्थी दशा संपवून, शिक्षक म्हणून नवीन प्रवासाला सुरुवात केली होती. प्रारंभी वेळापत्रक मिळाले नाही .रिकाम्या वर्गांवर जावे लागे. फारशी तयारी नसे. मुलांपुढे जाऊन काय बोलायचे? जे बोलायचे, तेच विसरून जायला व्हायचे! हळूहळू "शाळा" समजली !! वरिष्ठ शिक्षकांचे अनुकरण करायला लागलो. तुटपुंज्या ज्ञानाच्या भांडवलावर भागणार नाही, हे लक्षात आले. वर्तमानपत्रे, शाळेतील ग्रंथालय, मासिके, मिळेल ते वाचायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात आपण ज्या शाळेत नोकरी करतो आहोत, त्या शाळेबद्दल काही ही वरिष्ठ शिक्षकांच्या कडून कळले .तेव्हा अशा शाळेत, संस्थेत, नोकरी करायची तर स्वतःला सिद्ध करावे लागणार होते. नोकरी सहज मिळाली, असली तरी टिकवणे मात्र तितकेसे सोपे नव्हते! खेडेगावातून आल्यामुळे ज्ञान जुजबी होते.
      नाशिक एज्युकेशन सोसायटी, ही संस्था शिक्षकांच्या कर्तृत्वामुळे ओळखली जाते. नवीन इंग्रजी शाळेने देखील शिक्षकांचा सुवर्णकाळ अनुभवला आहे. प्रारंभीच्या काळात ही शाळा ओझर गावात भरत असे. शाळा सुरू करण्यात तत्कालीन नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खा. कै. गो.ह. देशपांडे, ओझरचे श्री. बापूसाहेब उपाध्ये श्री.वसंतराव उपाध्ये,श्री.रामराव गायकवाड , श्री.शंकरराव कासार, श्री.वल्लभ शेठ भट्टड, श्री.दत्तूशेठ कासार यांनी पुढाकार घेतला होता. श्री.रा.ग विरकर हे या शाळेचे पहिले मुख्याध्यापक. नंतर सरकारने सध्याची जागा संस्थेला शाळेसाठी दिली. राज्याचे तत्कालीन शिक्षण संचालक डॉ. ए.जी. पवार यांच्या हस्ते नूतन वास्तुच्या कोनशिलेचे अनावरण झाले.नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कारभारी मंडळ किंवा कार्यकारी मंडळ, व्यवस्थापन मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शन व नेतृत्वामुळे उत्तम शिक्षक, नवीन इंग्रजी शाळेला लाभले .त्यामुळे ओझर पंचक्रोशीत शाळेचा लौकिक, मेहनती व होतकरू शिक्षकांमुळे प्राप्त झाला .शाळेच्या मुख्याध्यापकांचा व शिक्षकांचा गावकऱ्यांशी सतत संपर्क असे .लोकांमध्ये शाळेबद्दल आपुलकी होती. शाळा ही खऱ्या अर्थाने समाजाचे आणि गावाचे प्रतिबिंब होती. शिक्षक गावकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत. अनेक नामवंत वकील, इंजीनियर्स, डॉक्टर्स, राजकीय नेते- पुढारी ,प्रगतिशील शेतकरी, व्यापारी आणि सुज्ञ नागरिक या शाळेने घडविले. क्रीडा क्षेत्रात नवीन इंग्रजी शाळेने विशेष नैपुण्य दाखविले. शिक्षकांनी  जीव तोडून केलेल्या मेहनतीमुळे शाळेला नाव मिळाले. केवळ पैसा मिळवण्याचे साधन म्हणून शिक्षकी पेशाकडे कोणी पहात नसे. सर्वजण एकोप्याने काम करीत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संस्था आणि शाळेचा लौकिक यासाठी वाटेल ते श्रम करण्याची  आणि वेळ देण्याची तयारी शिक्षकांची, मुख्याध्यापकांची असे.
     मा.धुं.शा.देशपांडे, मा.म.ल. जोशी, मा.श्रीमती सिंधुताई परांजपे, मा.रामभाऊ क्षीरसागर, मा. अ. द. लेले, यांसारखे कर्तुत्ववान मुख्याध्यापक या शाळेला लाभले. त्यांनी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर जिवापाड प्रेम केले. स्वतः शिक्षकांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून कामे केली. गावात जाऊन लोकांशी संपर्क वाढवला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये शाळे बद्दल आपुलकी, जिव्हाळा निर्माण झाला. शाळा नावारूपाला येण्यासाठी उत्तम व सृजनशील उपक्रम शिक्षकांच्या माध्यमातून राबविले.
      श्री. रा.गो.क्षीरसागर यांची मुख्याध्यापक म्हणून नवीन इंग्रजी शाळेत बदली झाली होती. त्यांना सर्वजण आदराने" रामभाऊ "म्हणत. सतत हसतमुख असणारे, रामभाऊ कोट -टाय परिधान करून, अत्यंत नीटनेटकेपणाने शाळेत वेळेत हजर असत. त्यांना टापटीपपणा आवडत असे. शिपायापासून पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना ते आपुलकीने वागवत. त्यांचे काम सांगणे इतके विनम्रपणाचे असे की, समोरच्या व्यक्तीला ते टाळणे शक्यच नव्हते. लोकांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असायची. अल्पावधीतच त्यांनी शालेय प्रशासनावर पकड घेतली. रामभाऊ स्वतः उत्तम लेखक ,कवी होते. साहित्याची त्यांना आवड होती. सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे,असे ते सांगत. शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी एक गीत लिहिले,..
     या शाळेचे सुपूत्र आम्ही
     शाळा आपली माय असे
     या इथे , या इथे ,
     तव ,जीवन बनवू सुंदरसे
...
त्यांचे हेच गीत पुढे शाळेची" प्रार्थना "झाली. शिक्षक- कर्मचारी झपाटून काम करत. शाळेच्या अडीअडचणी किंवा चांगल्या बाबीदेखील ते गावात जाऊन लोकांपुढे मांडत. गावकरी त्यांच्या हाकेला धावून येत. ओझर मधील अनेक नामवंत शेतकऱ्यांमध्ये आणि राजकीय पुढाऱ्यांमध्ये त्यांची ऊठबस होती. नवीन इंग्रजी शाळेचा हा सुवर्णकाळ होता ! एच.ए.एल. वसाहतीत एका संस्थेची शाळा असून देखील ,नवीन इंग्रजी शाळेत दोन बस भरून विद्यार्थी येत असत. एअरफोर्स भागातून देखील प्रवेश घेण्यास अनेक पालक इच्छुक असायचे.
       नंतरच्या काळात श्री. माळवदकर सर, एक विद्यार्थी व शिस्तप्रिय, व्यासंगी शिक्षक शाळेला लाभले. चित्रकला व हिंदी विषयात त्यांचा हातखंडा होता .ते ओझर गावातच राहत असत. विद्यार्थ्यांना कलेची आवड निर्माण होण्यासाठी विविधांगी उपक्रम ते राबवित. शेती हा विषय शिकवत आणि स्वतः मुलांबरोबर शेती काम करत. विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत प्रिय होते.
    नवीन इंग्रजी शाळेत एन.सी.सी. श्री टेंबे सर यांच्या नंतर सांभाळली ,ती श्री.दत्तात्रय शंकर भावसार सर यांनी. शिस्तप्रिय असलेल्या भावसार सरांचा मुलांमध्ये दरारा होता. ते हिंदी विषय विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने शिकवत. ते उत्तम वाचक आणि आणि वक्ते होते. शाळेत कोणताही कार्यक्रम असला की, भावसार सरांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत असायचेच! सत्ययुगातील श्रीराम- कृष्ण यांपासून ते आधुनिक काळातील गोष्टी ते मुलांना रंगवून सांगत. ते स्वतः कधी विनोद करीत नसत. परंतु, त्यांच्यावर अनेकदा झालेले विनोद सरांनी सहज पचवले. शाळेमध्ये काहीजण असे असतात की ,त्यांनी फक्त चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करायचे असते! ते मनापासून की वरवर  हे महत्त्वाचे नसते !! भावसार सरांचे कौतुक करणारे त्यांचे अनेक मित्र होते.त्यामुळे अशा मित्रांना स्टेजवर उभे राहून भाषण करण्याची वेळ कधी येत नसे ! शाळेतील तरुण शिक्षकांशी ते अत्यंत आपुलकीने वागत.मला त्यांच्या व्यासंगाबद्दल फार कौतुक वाटे .एकदा स्टाफ रूममध्ये मधल्या सुट्टीत आम्ही सर्व शिक्षक बसलो असताना, मी,श्री.भावसार सरांचे कौतुक केले. आणि सरांना म्हटले की, "सर, आपले वाचन किती अफाट आहे!" तितक्यात त्यांच्या एका मित्राने त्यावर कोटी करत, स्टाफरूममध्ये हशा पिकवला.ते शिक्षक म्हणाले. त्यात काय एवढं! ते तुला देखील जमेल .मी म्हटलं", कसं?" ते म्हणाले ,"भावसार सर काय करतात, माहिती आहे का ?"मी म्हटलं ,"नाही". "जयंती ,पुण्यतिथी कोणाचीही असो. भाषण तेच करायचे. फक्त नाव बदलायचे.!" संपूर्ण स्टाफ खो-खो हसला. यावर श्री. भावसार सर देखील दिलखुलासपणे हसले. हसण्याचा भाग सोडला तरी श्री.भावसार सर यांचा अभ्यास, वाचन खूप होते. हे नाकारता येण्यासारखे नव्हते.
     कोणतेही काम हे सांघिकपणे केले तर त्याची यशस्विता निश्चित वाढते. शाळेमध्ये काही समविचारी शिक्षक होते. त्यांच्या दृष्टीने शाळा सर्व काही होती. तात्विक, वैचारिक वाद व्हायचे. परंतु शाळेवर त्यांचा कधी विपरीत परिणाम त्यांनी होऊ दिला नाही.
      ज्यांनी माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी,माझी मान पकडून" तुला काय येतं ?"असं विचारलं होतं, ते श्री.त्र्यंबकराव तिडके सर एक संवेदनशील व्यक्तिमत्व होतं. आज पर्यंत मला भेटलेल्या प्रेरणादायी व्यक्तींपैकी एक! श्री. तिडके सर म्हणजे शिस्त. श्री .तिडके सर म्हणजे मुलांचा आधार. कोणताही स्वार्थ नाही. केवळ आपल्या शाळेसाठी आपण जीवतोड मेहनत केली पाहिजे, हा हेतू .असे शिक्षक शाळेला मिळणं सध्या तरी दुरापास्त झाले आहे. साधारणपणे, शाळा ही शिक्षकांची ओळख असते. परंतु, श्री. तिडके सर हे शाळेची ओळख बनले होते. यात अतिशयोक्ती अजिबात नाही. जे विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले, ते आजही सरांचं तोंडभरून कौतुक करतात आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होतात!
      मला चांगलं आठवतंय, तिडके सर शाळेच्या समोरील आग्रा रोड च्या पलीकडे राहत असत.शाळेत येताना महामार्ग ओलांडून त्यांना यावं लागे. जवळपास सहा फूट उंच, रांगडा देह, खांद्याला थोडी मळकट शबनम अडकवलेले आणि हातात कायम बासरी! असा त्यांचा परिवेश. सामान्यपणे शिक्षकाच्या हातात छडी, पट्टी आपण पाहिली आहे. तिडके सरांच्या हातात बासरी असायची ! बासरी वर एखादं गाणं गुणगुणायला सुरुवात केली की, शाळेच्या पटांगणात खेळत असलेली मुलं मुली तिडके सर यांना घेराव घालत. काही लहान मुलं त्यांचा एक हात धरून शाळेत येत. मुलांचा घोळका शाळेच्या गेटमधून आत येईपर्यंत त्यांच्या भोवती असे .अशावेळी मला, "आया रे खिलोने वाला l खेल, खिलोने लेके आया रे ll "हे गाणं गुणगुणनारा संजीव कपूर आल्याचा भास होई.मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नसे. त्यांच्या बासरीच्या मधुर सुरांनी वातावरण प्रसन्न होत असे.
      शाळेचा प्रारंभ परिपाठाने होत. तिडके सरांना मुलांशी बोलताना कधीही ध्वनिक्षेपकाचा आधार घ्यावा लागला नाही. घंटा वाजली की, मुलं मुली प्रांगणात घोळक्याने यायचे. स्टेजवर तिडके सर एकटे! त्यांनी बासरी वाजवायला सुरुवात केली की, आपोआप मुलं आपापल्या वर्गाच्या रांगेत ,एक हाताचे अंतर घेऊन उभे राहायचे! बासरी वरचे गीत संपलं की, मुलं सावधान -विश्राम करत .अशावेळी कोणी विद्यार्थी बेशिस्त वागला तर स्टेजवरून ते खाली उडी मारुन, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून ,त्याला शारीरिक कसरती ची शिक्षा करायचे .म्हणून सहसा आपल्यावर शिक्षेची वेळ येऊ नये ,असे मुलांना वाटे .अत्यंत प्रेमळ असणारे तिडके सर अशावेळी रिंग मास्टर वाटायचे. शालेय आवारात तिडके सर असले की, मुलं बेशिस्त वागायला दचकत. शाळेत कोणी शिक्षक रजेवर असले की,सर स्वतः असे सर्व वर्ग एकत्र करून, मुलांकडून कवायत, व्यायाम पटांगणावर करून घ्यायचे. रिकाम्या वेळी त्यांना कधीही स्टाफ रूममधील गादीवर टेकून बसलेले मी पाहिलेले नाही. त्यांच्यात असलेल्या कलेबद्दल मला खूप नवल वाटे. एकदा माझ्यासाठी एक बासरी ते घेऊन आले. बासरी शिकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु, शिष्य बनण्याची माझी कुवत नसावी !त्यांचा तो प्रयत्न फसला. मला आजही त्या गोष्टीची खंत वाटते. कोणती तरी एक कला आपल्या जवळ असावी, म्हणून मी तबला शिकण्यासाठी क्लास लावला. ति ट कि ट . .तिट .किट.. .तिटकिट धा ...इतकच ! मला तबला शिकवणारे मास्टरजी रोज तबला आणि डग्गा घेऊन ,पहिला धडा गिरवायला सांगायचे. शेवटी व्हायचे तेच झाले! माझी व तबल्याची फारकत झाली !! तिडके सरांकडे पाहून कलेची ऊर्मी जागृत झाली होती. परंतु, ती पूर्ण होऊ शकली नाही.
     तिडके सर अत्यंत तळमळीने मुलांना शिकवायचे .ते व्यायामाचे शिक्षक नव्हते, तरीदेखील कवायत ते स्वतः करून घेत. डंबेल्स, घुंगुर काठी ,बासरीच्या सुरात मुलांकडून सराव करून घेत. मुलं रमून जात. अशावेळी सानेगुरुजींचे एक वाक्य मला आठवते..." करील मनोरंजन जो मुलांचे ,जडेल नाते प्रभूशी तयाचे." तिडके सर ,असे परमेश्वराशी नातं सांगणारे एक उत्तम शिक्षक होते.
    साधारण, १९५५-५६ सालची गोष्ट असावी.भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू आणि निवृत्त मेजर भोसले साहेब यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील शिस्तीचे महत्त्व लक्षात घेऊन, एन. डी .एस. अर्थात "नॅशनल डिसिप्लिन स्कीम" भारतभर सुरू केली. त्याकरिता शारीरिक दृष्ट्या सक्षम, कलेची आवड असणारे आणि होतकरू तरुणांना प्रशिक्षण देऊन देशभरातील शाळांमध्ये त्यांना शिक्षक म्हणून पाठविले जात असे. नाशिकच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधून मुलाखत होऊन, तिडके सरांची प्रशिक्षणासाठी निवड झाली.
   श्री.तिडके सरांचे मुळगाव निफाड तालुक्यातील कसबे सुकेने .घरची स्थिती अत्यंत हलाखीची होती .सरांचे वडील आपल्याच मेहुण्याकडे सालदार म्हणून ,जानोरी ता. दिंडोरी येथे काम करीत असत. तिडके सरांचे  बालपण मामांकडे गेले.सरांचे मामा गर्भश्रीमंत होते. त्यांना मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी भाच्यांना जानोरी येथेच ठेवून घेतले.परंतु बर्‍याच वर्षांच्या कालावधीनंतर मामांना मुलगा झाला. नंतर पुढे कौटुंबिक वाद नकोत, म्हणून मामांनी तिडके सर व त्यांच्या कुटुंबियांना थोडीफार शेती कसण्यासाठी देऊन वेगळे केले. अशा परिस्थितीत तिडके सरांनी आपले शिक्षण घेतले. नवीन इंग्रजी शाळेत त्यांचे शिक्षण झाले.कधी शाळा तर कधी गायी -गुरे चारायला जात. इतर गुराखी मित्रांकडून शालेय जीवनातच ते बासरी वाजवायला शिकले. आज तीच बासरी त्यांच्यासाठी जीवनदायी ठरली!सरांच्या बासरीचे सूर ऐकून मुलं मंत्रमुग्ध होत असत. कदाचित भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रसन्न असावेत! श्रीकृष्णाच्या बासरीची धून ऐकून पशुपक्षी ,प्राणी आणि त्यांचे बालमित्र तल्लीन होऊन जात.तसे तिडके सरांच्या बासरीच्या सुराने नवीन इंग्रजी शाळेचा परिसर भारावून जात असे.
    एन .डी .एस .चे प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षणानंतर त्यांना मुंबईतील माटुंगा भागात ,एका गुजराती माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून पाठविले गेले. गर्भश्रीमंत लोकांची, व्यापाऱ्यांची मुले तिथे शिकत. सर्व मुले महागड्या गाड्यांमधून शाळेत येत. सरांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून अल्पावधीतच ते सर्वांच्या कौतुकाचे विषय ठरले. त्यांच्यातील कलेने सर्व शाळेला ,त्यांनी आपलेसे करून घेतले. मुलांकडून ड्रिल, कवायत, नृत्य ,समूहगीत शिस्तबद्ध रीतीने करून घेत. तिथला अनुभव सांगताना श्री. तिडके सरांची छाती गर्वाने फुलून येते. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री त्या शाळेत आले होते. पाहुण्यांच्या स्वागताची, त्यांना सलामी देण्याची जबाबदारी तिडके सरांवर सोपविण्यात आली. सरांनी अतिशय शिस्तबद्ध संचलन मुलांकडून करून घेतले .डंबेल्स वरील कवायत, घुंगुर काठीची कवायत ,नृत्य हे सारे पाहून शास्त्रीजी खूप खुश झाले . शास्त्रीजी यांनी तिडके सरां जवळ येऊन, या तरुण शिक्षकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली !हे सांगताना तिडके सरांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात !! अंगावर रोमांच उभे राहतात. इतकेच नाही. तर शास्त्रीजी भाषणाला उभे राहिले, तेव्हा त्यांनी तिडके सरांना व्यासपीठावर बोलावून, स्वतःच्या हस्ते त्यांचा सत्कार केला . तोंडभरून कौतुक केले. जणूकाही शिक्षकी पेशाचा हा सन्मान होता. अशा छोट्या-मोठ्या घटनांमधून प्रेरणा घेऊन तिडके सरांनी न थकता ज्ञानदानाचे कार्य अखंड  सुरू ठेवले.  तिडके सर नाशिक जिल्ह्यातील आहेत, हे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्यांची बदली नाशिक मधील बिटको विद्यालयात केली. तेथून म्युचल ट्रान्सफर होऊन शेवटी नवीन इंग्रजी या आपल्या शाळेत तिडके सरांना सेवा करण्याची संधी अखेर प्राप्त झाली! जे त्यांचे पूर्वीपासूनचे स्वप्न होते !! आता स्वप्न साकार झाले. शाळा आणि विद्यार्थी हेच त्यांचे अवकाश होते.त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी पत्नीवर सोपविली .वेळेचा विचार न करता तिडके सर शाळेत रमायचे. भरभरून गप्पा करायचे.अर्थात ,काम न टाळता !निष्ठा शिकावी तिडके सरांकडून. शाळा आणि विद्यार्थी यांच्या बद्दल नकारात्मक बोलणार्‍यांना ते शब्दांनी फटकारत. ज्या शाळेत आपण शिकलो, त्याच शाळेत आपण सेवा करत आहोत, याचं त्यांना समाधान वाटे.
      एकदा कसबे सुकेने येथून सायकल ने ते शाळेत येत होते. त्यांच्या शेतात द्राक्षबाग लावली होती .व्यापाऱ्याने त्यांची द्राक्ष विकत घेऊन दोन लाखांचा चेक सरांना दिला. तो धनादेश त्यांनी पिशवीत ठेवला .ती पिशवी सायकलला अडकवून ते शाळेत यायला निघाले. शाळेत पोहोचले.नेहमीप्रमाणे सायकल स्टॅंडवर लावली. पिशवीतून बासरी काढली आणि बासरी वाजवण्यात, मुलांमध्ये ते तल्लीन झाले .शाळा भरली .त्यांना अचानक दोन लाखाच्या चेक ची आठवण झाली. पिशवीत हात घातला .चेक सापडला नाही. दोन लाख म्हणजे थोडीथोडकी रक्कम नव्हती. त्यांच्या तोंडचे पाणी पळाले .सर्व शिक्षक चेक शोधू लागले. काही जण तर ,ज्या रस्त्याने सर शाळेत आले, त्या रस्त्याने शोधत शोधत जाऊन आले. चेक मात्र सापडला नाही. शाळेकडे येताना रस्त्यालगत एक चिंचेचे झाड होते .त्या झाडाच्या फांदीवर एक कागदाचा तुकडा हवेने फडफडताना दिसला. तो दोन लाखांचा तुकडा म्हणजेच सरांचा धनादेश होता ! वर्दळीच्या रस्त्यावर असूनही चेक सुरक्षित राहिला !! बासरी काढताना चेक जमिनीवर पडला आणि वाऱ्याने उडून तो चिंचेच्या झाडाला फांदीवर अडकला होता. हा चमत्कारच म्हटला पाहिजे ! कदाचित, प्रामाणिक सेवा देणाऱ्या माणसाला परमेश्वराने ही मोठी भेट दिली होती ! परमेश्वराने त्यांचे नुकसान होऊ दिले नाही.
    सर अत्यंत कष्टाळू होते. शाळेत मुलांना कार्यानुभव अंतर्गत शेती हा विषय शिकवला जात असे .तिडके सर मुळातच शेतकरी असल्याने, शाळेच्या आवारात कोबी, फ्लॉवर याची शेती त्यांनी केली .मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिला. मुलांनी पिकवलेल्या शाळेतील भाजीपाला लोक आनंदाने विकत घेत. एकदा चित्रकलेचे शिक्षक कागदी फुलांनी शाळेचे आतील खांब सजवत होते. सर त्यांना म्हटले त्यात जिवंतपणा नाही. चित्रकलेच्या सरांना थोडे वाईट वाटले. त्यांनी तिडके सरांना "तुम्ही जिवंतपणा आणा", असा टोला लगावला. तिडके सरांनी ते आव्हान स्वीकारले .न बोलता कामाला सुरुवात केली. सरांनी सर्व खांबांना लागून बोगनवेल आणि फुलझाडे लावली.स्वतः त्यांची मशागत व देखभाल करून, वर्षभरात बोगनवेल चा मंडप खांबाला लागून उभा राहिला. शाळेचे रूपडे पालटले. ते पाहून चित्रकलेचे शिक्षक त्यांच्यापुढे सर्वांसमोर नतमस्तक झाले. त्यांनी सरांची माफी मागितली आणि कौतुक देखील केले.
    आई-वडिलांच्या संस्कार बरोबरच शाळेचे ही संस्कार माझ्यावर झाले, असे ते नम्रपणे कबूल करतात . धुं. शां. देशपांडे ,म. ल. जोशी, श्रीमती सिंधुताई परांजपे, श्री. रामभाऊ क्षीरसागर यासारख्या मुख्याध्यापकांनी मला घडविले. प्रेम, जिव्हाळा दिला. आपुलकीने वागवले. वेळोवेळी केलेल्या कामाचे कौतुक केले. विशेष म्हणजे संधी मिळवून दिली.त्यामुळे कधीकधी इतरांच्या द्वेषाला पात्र देखील व्हावे लागले.असे सर सांगतात. परंतु, चांगले काम करताना त्याची तमा त्यांनी बाळगली नाही.
     तो दिवस .....मला चांगलाच आठवतो! १९९७ चे वर्ष. तिडके सरांच्या सेवानिवृत्तीचा दिवस. संपुर्ण शाळेतील मुलं अश्रू ढाळत होते. निरागस मने रडताना पाहून ,तिडके सर यांना अश्रू अनावर झाले .मुलांना आता ही बासरी पुन्हा ऐकायला मिळणार नव्हती. सेवानिवृत्ती चा समारंभ संपल्यानंतर ,सर्वांचा निरोप घेऊन तिडके सर घरी जाण्यासाठी निघाले. पाच-पन्नास पोरांचा घोळका त्यांना शाळेतून निरोप देण्यासाठी थांबला होता. मुलांच्या रडण्याचा आवाज ,ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेत होता! तिडके सरांचा देखील कंठ दाटून आला होता. खांद्याला अडकवलेल्या शबनम मधून तिडके सरांनी बासरी काढली. ओठाला लावली .त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. एका शिक्षकाबद्दल मुलांचं आणि शिक्षकाचं मुलांबद्दल निस्सीम प्रेम, मी यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं! पुढेही असा योग कधी येईल, असे मला वाटत नाही .मनात विचार आला. तिडके सरांमध्ये असलेल्या अनंत सद्गगुणांपैकी एखादा गुण आपल्याला घेता येईल का? तिडके सरांच्या निवृत्तीमुळे शाळेची ओळख हळूहळू पुसली जाऊ लागली. कारण त्यांची जागा पुन्हा कुणी भरून काढली नाही!
      सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण लक्ष शेतीकडे वळविले .तेथे मजुरांबरोबर रमत .त्यांना बासरीवर गाणी ऐकवत .त्यांच्याकडे मजूर आनंदाने कामाला येत. कामावर असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा यामुळे वयाच्या ८२ व्या वर्षी देखील, कोणत्याही आजाराने त्यांच्याजवळ येण्याची हिंमत केली नाही! सर्व प्रकारच्या विकारांपासून ते दूर असल्याने त्यांना औषधाची देखील गरज भासली नाही .तिडके सरांचा सहवास मला लाभला, हा माझ्या जीवनातील अलौकिक आनंदाचा क्षण होता .कथा कादंबऱ्यांमधून एखाद्याच्या कर्तृत्वाचं वर्णन वाचनं वेगळं आणि प्रत्यक्षानुभूती घेणं वेगळं! त्याचा आनंद औरच !! माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी, माझी मानगुट पकडली तेव्हाचे तिडके सर आणि आजचे तिडके सर अनुभूतीत प्रचंड तफावत आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनातला आदर शतपटीने वाढला आहे!धन्य ते तिडके सर !!
.   नोकरी करत असतानाच शाळेची परवानगी घेऊन ,एफ.वाय.बी.ए. या वर्गात कॉलेजमध्ये एक्स्टर्णल म्हणून ऍडमिशन घेतले. हळूहळू शाळेसाठी अभ्यास आणि कॉलेजचा अभ्यास सुरू ठेवला .शाळेत सकाळ सत्रात  काम करीत असताना श्री. मधुकर नरहर पाठक सर, पर्यवेक्षक होते. त्यांना सर्वजण प्रेमाने व आदराने" तात्या" म्हणत असत.सुरुवातीच्या काळात, मी नाशिक हुन काकांकडून शाळेत ये-जा करीत होतो. नाशिक हुन गरुडेश्वर नांदगाव ही बस वेळेच्या आत पोहोचवत असे. माझ्याआधी श्री. पाठक सर शाळेत हजर असत.शाळेत आले की, पहिल्यांदा स्टाफरूममध्ये यायचे .ते भेटले की त्यांचा एक प्रश्न ठरलेला असे. "हे पोरा, कसा आहेस?त्याठिकाणी." मी नम्रपणे त्यांच्याशी बोलत असे. त्यांच्या बोलण्यात आपुलकी होती. अडीअडचणी विचारायचे .शाळा कशी वाटते? याबाबत अनौपचारिक चौकशी करायचे .काय कर -काय करू नको, असे समजावून सांगायचे. जणू एखादी आपल्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती जिव्हाळ्याने आपल्याशी बोलत आहे, असा विश्वास त्यांच्याबद्दल निर्माण झाला .जाड भिंगाचा चष्मा ,उंचीने तसे ठेंगणे, बोलणे सुस्पष्ट ,उंच आवाज ,नीटनेटके ,गोरेपान असे पाठक सर,शाळेची पायरी चढले की, त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडे." ये पोरा काय करतो ? त्या ठिकाणी ".उंच स्वरात त्यांचं असं बोलणं ऐकून इकडे-तिकडे फिरणारी मुलं-मुली वर्गात निमूटपणे जाऊन बसायची. शिक्षकही आपापल्या वर्गात जायचे! त्यांचे हे बोलणे जणू सर्वांसाठीच असे.सकाळी -सकाळी स्टाफरूममध्ये भेटलेले पाठक सर आणि शाळा भरल्यानंतरचे पाठक सर यांच्यात मात्र फरक होता .एकदम कडक शिस्त. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही खडसावण्याची हिंमत त्यांच्यात होती .प्रारंभीच्या काळात मला वर्ग नियंत्रण फारसे जमत नसे. मी मुलांशी आणि मुलं माझ्याशी गंमत करायची. वर्गात गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची. तात्या लगेच माझ्या वर्गात येऊन, मुलांबरोबरच माझीही शाब्दीक खरडपट्टी काढायचे. मी खूप नाराज व्हायचो. वर्ग नियंत्रणासाठी काय करता येईल? याचा विचार करायचो .ते मला नेहमी म्हणायचे," तू वर्गात काय शिकवतो, हे महत्त्वाचे नाही .वर्गात गोंधळ होता कामा नये," त्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या त्यांनी मला सुचविल्या. काहींच्या वर्गातून शिक्षक आणि विद्यार्थी कोणाचाच आवाज येईना! प्रारंभी मला त्याचे फार अप्रूप वाटे. हळूहळू  ती कला मलादेखील उमगली ! परंतु तिचा वापर करणं माझ्या मनाला पटलं नाही !!
       श्री. म. न.पाठक सर स्वतः उत्तम शिक्षक होते .मराठी- इंग्रजी या विषयांचा त्यांचा व्यासंग होता. ओझर सारख्या ग्रामीण भागातील शाळेत, त्याकाळात अस्खलित इंग्रजी बोलू शकणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये त्यांची गणना होत असे. मुळात ते फिजिकल या विषयाचे शिक्षक ,त्यामुळे शिस्तप्रिय परंतु स्टाफ रूम मध्ये येऊन विनोद निर्मिती करून वातावरण ते प्रसन्न करीत असत.स्पष्ट उच्चार, कोणतीही गोष्ट ठासून सांगणार. विनोद सांगतांना प्रचंड मोठ्या आवाजात स्वतः हसायचे. रोज सकाळी माईकवरून सूचना देऊन, दिवसभर काय करायचे? याचे नियोजन सांगत. त्यांच्या बोलण्यात "त्या ठिकाणी ", हा शब्द असंख्य वेळा यायचा. कधीकधी त्यातूनही विनोदाची निर्मिती व्हायची .परंतु तात्यांना त्याचे कधी वाईट वाटले नाही.
         दिवाळीची सुट्टी संपून शाळा भरायची. पहिल्या दिवशी तात्या स्टाफ रूम मध्ये येऊन सर्वांना सांगायचे," उद्या कोणीही जेवणाचा डबा आणायचा नाही.त्या ठिकाणी ,मी उद्या तुम्हाला सर्वांना फराळ देणार आहे. त्या ठिकाणी". "त्या ठिकाणी", असे ऐकतांना प्रचंड हशा पिकत असे.त्याठिकाणी तात्यांही हसू लागायचे !! त्याठिकाणी, गमतीचा भाग सोडला तर ,पाठक सर अत्यंत प्रेमळ होते. शाळेचा आधारस्तंभ होते. वात्रट मुलं देखील त्यांना घाबरायची. शाळा बुडवून नदीवर पोहायला गेलेल्या मुलांना ते स्वतः धरून आणून त्यांनी शिक्षा केली. नंतर लक्षात आले ती सर्व मुलं गावातील बड्या पुढाऱ्यांची होती! अशा मुलांना ही शिक्षा करताना पाठक सरांनी मागेपुढे पाहिले नाही.माझ्यासारख्या नवागतांना तात्यांचा खूप आधार असे .ते प्रेरणा देत आणि या पेशातील खाच-खळगे समजावून सांगत.
      तात्या ओझर गावात, पत्नी आणि चार मुली यांच्यासोबत राहत असत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील वाघाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे मोठे बंधू श्री.सो.न.पाठक हे देखील दोन-तीन महिने आपल्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते पुन्हा जळगाव येथे नोकरीनिमित्ताने निघून गेले. तात्यांना चार मुली. आपल्याला मुलगा नाही, याची खंत कधी त्यांनी बाळगली नाही. मुलींना उत्तम शिक्षण दिलं. तात्यांच्या दोन मुली एल.एल.बी. पर्यंत शिक्षण घेऊन वकिली करतात. एक मुलगी शिक्षिका, तर दुसरी कलेक्टर कचेरीत चांगल्या पदावर नोकरीस आहेत.
      ज्या शाळेत आपल्या नोकरीला सुरुवात झाली, तेथेच निवृत्त व्हावे, असे त्यांना मनापासून वाटे .परंतु तसे घडले नाही. उपमुख्याध्यापक पदावर तात्यांना पदोन्नती मिळाली. नाईलाजाने संस्थेला त्यांची बदली दुसऱ्या शाळेत करावी लागली. तात्यांचे स्वप्न अधुरे राहिले. तरीदेखील अधून मधून नवीन इंग्रजी शाळेत येऊन जुन्या आठवणींना तात्या उजाळा द्यायचे. शासनाच्या नियत वयोमानानुसार तात्या सेवानिवृत्त झाले.
       २०१७ च्या जुलै महिन्यात तात्यांचं देहावसान झालं .एक सच्चा मार्गदर्शक, मित्र हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
         श्री. म.न.पाठक, श्री. दत्ता भावसार ,श्री.ल. झि.भडके, श्री.द .ना.शिंदे, श्री. बाळासाहेब हाडोळे, यासारखे समविचारी आणि शाळेला केंद्रस्थानी ठेवून काम करणारे शिक्षक पुढील काळात होऊन गेले. या सर्वांमध्ये हे साम्य होते की ते ओझर गावात स्थायिक होते. त्यामुळे जनसंपर्क दांडगा होता. श्री.ल. झि. भडके हे शाळेचे माजी विद्यार्थी. इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते.स्पष्ट वक्ते आणि शिस्तप्रिय देखील होते.माजी विद्यार्थी ते मुख्याध्यापक असा त्यांचा या शाळेतील प्रवास उल्लेखनीय आहे.
    श्री. द .ना. शिंदे यांचा मूळ पिंड शेतकऱ्याचा. शेतकरी शेतात राबून मशागत करून चांगले पीक घेतो, तसे शिंदे सर मुलांसाठी शाळेसाठी श्रमत.त्यांना वाचनाची खूप आवड होती.
      त्याकाळात, सौ.माधवी कापसे, सौ.जगताप, सौ.प्रमिला पाटील,सौ. मंगला भार्गवे यांचा स्टाफ रूम आणि शाळेत दरारा होता. अध्यापनात त्या प्रभावी होत्या.
     मी, १९९५ ते २००० ही पाच वर्षे नवीन इंग्रजी शाळेत अध्यापनाचे काम केले. त्यादरम्यान, श्री. शां. पां.सूर्यवंशी, सौ.प्रमिला तपासे, सौ.अर्चना दांड, श्रीमती वीणा नवले, श्रीमती सरोजिनी तारापूरकर यासारखे पदाधिकारी होऊन गेले.
    उपमुख्याध्यापिका म्हणून, सौ.राधिका राजपाठक काही काळ शाळेत होत्या. परंतु पदाधिकारी पदाचा डौल त्यांनी कधी मिरवला नाही. जवळचे, लांबचे असे कोणाबद्दल केले नाही. मोजक्या लोकांना हाताशी न धरता, सर्वांनाच विश्वासात घेऊन काम केले .त्यांच्या काळात शाळेला विद्यार्थी मिळवणे आवश्यक होते. अनेकांनी अनेक उपाय सुचविले. परंतु, श्रीमती राजपाठक मॅडम यांनी एक अफलातून कल्पना सर्वांसमोर मांडली.ज्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या बरोबरच शाळेचा विद्यार्थी संख्येचा प्रश्न देखील सुटणार होता. शाळेत "आनंद मेळा" घ्यायचे नियोजन त्यांनी स्वतः केले. ही कल्पना ऐकून अनेकांच्या भुवया वेगवेगळ्या अर्थाने उंचावल्या ! परंतु, ते फारसे मनावर न घेता, भव्य स्वरूपात आनंद मेळ्याचे आयोजन, नवीन इंग्रजी शाळेच्या मैदानात, हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत करून दाखविले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल गावकरी आणि विद्यार्थी खूष झाले. अनेकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली!त्यामागे ,श्रीमती राजपाठक मॅडम यांची प्रचंड मेहनत होती. वय वर्ष जवळपास ५५, कृश शरीरयष्टी असलेल्या राजपाठक मॅडम मनाने कधी थकल्या नाहीत.तरुणांना लाजवेल असं,त्या काम करत. कधी चिडचिड केली नाही. श्रीमती राजपाठक मॅडम यांचे वडील कै.य.ह. मोहाडकर सर याच विद्यालयात कधीकाळी मुख्याध्यापक होते.त्या स्वतः संस्थेच्या सारडा मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी .अत्यंत उत्साही, कलेची आवड त्यांना होती. इतिहास, मराठी हे त्यांच्या आवडीचे विषय. त्या उत्स्फूर्त कविता रचत. नाटकांचे लेखन करत. त्या उत्तम नृत्यदिग्दर्शक होत्या. गीत गायनाच्या स्पर्धेसाठी त्या स्वतः गाणं लिहीत. प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्यांशी त्या आदराने वागत.आमच्यासारख्यांशी त्या प्रेमाने आणि एकेरी नावाने हाक मारत. अशावेळी, जणू आई आपल्याशी बोलते आहे. असा भास होई. स्काउट- गाइड हा त्यांचा आवडीचा प्रांत! कारण,त्या माध्यमातून मुला-मुलींवर उत्तम संस्कार करता येतात. त्यांना व्यवहार ज्ञानाचा अनुभव देता येतो .पर्यावरण, निसर्ग संवर्धनाचे संस्कार करता येतात. असे त्यांचे मत होते. शाळेत सकाळ सत्रात परिपाठ उत्तम झालाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. पपेट्स ,बाहुली नृत्य, इ.कला आम्हाला शिकवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. प्रशासन आणि शिक्षण यांची उत्तम सांगड त्यांनी घातली. अत्यंत विनम्र आणि प्रेमळ राजपाठक बाई कायमच स्मरणात राहतील, यात शंका नाही.दुसऱ्याला समजून घेणं काय असतं? ते राजपाठक बाईंनी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दाखवून दिले .एकदा माझे आई-वडील काही कामानिमित्ताने नाशिकला येत होते. आपला मुलगा ज्या शाळेत शिकतो ,ती शाळा पाहण्याची इच्छा त्यांना झाली .ते ओझर थांब्यावर उतरले. शाळेत येऊन श्रीमती राजपाठक मॅडम यांना भेटले. त्यांना बाईंनी विचारले ,"कोण हवे तुम्हाला ?" ते म्हणाले," शैलेश पाटोळे ".बाई म्हणाल्या," माझ्या पोराला भेटायला आलात !" हे वाक्य ऐकून आईचं मन समाधानाने गहिवरून आलं  ! एवढी आपुलकी आणि जिव्हाळा त्यांच्या शब्दात होता . माझ्या हृदयाच्या अत्यंत नाजूक कोपऱ्यात बाईंना स्थान आहे ,ते उगाच नाही !! उत्तम आणि आदर्श शिक्षकांची अनेक उदाहरणे आपण पुस्तकात वाचतो. परंतु ,मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या राजपाठक बाई मात्र एकमेवाद्वितीयच !!
       श्री. रमेश खैरनार ,श्री.मधुकर बंद्रे, श्री. य. भि. चौधरी ,श्री. बा. झि. भडके, श्री.बा. ल.भोज, यासारखे शिक्षक शाळेत होते. सर्वांची नावे मला आता आठवत नाहीत.
       नवीन इंग्रजी शाळेने मला काय दिले? याचे उत्तर आहे," सर्व काही ".पोट भरण्यासाठी पगार दिला .शिक्षक म्हणून प्रतिष्ठा दिली. अनेक गुरु दिले ,ज्यांच्याकडून प्रेरणा तर, कधी प्रत्यक्ष आशीर्वाद मिळाला. माझ्या मनाच्या कोऱ्या पाटीवर नीतिमूल्यांची ,संस्कारांची धुळाक्षरे याच शाळेत लिहिली गेली. माझे शिक्षण खेडेगावात झाले होते .चार चौघात बोलण्याची फारशी सवय नव्हती. प्रारंभी बोलताना हातापायाला कंप सूटे. डोळ्यांच्या पापण्यांची आपोआप ,अनावश्यक उघडझाप होई. काय बोलायचे, तेच विसरून जात असे ! प्रारंभीचा काहीकाळ असा गेला. तेव्हा उगाचच आपण शिक्षक झालो ,असे वाटायचे!
      त्यावेळी ,महिनाअखेरीस शाळा अर्धा दिवस भरे. शेवटच्या दोन तासिकाना शिक्षक विद्यार्थ्यांना पटांगणात बोलावून बोधपर गोष्टी सांगत. एकदा अचानक श्री. पाठक सर मज जवळ येऊन म्हणाले," यावेळी कथा मुलांच्या समोर, तू सांगायची, तयारी ठेव!" नकार देणे ,त्यावेळी शक्य नव्हते .हे वाक्य ऐकताच सर्वांगाला कंप सुटला! एक दोन दिवसानंतर मला गोष्ट सांगायची होती. विचारचक्र सुरू झाले. शाळा सुटल्यावर घरी पोहोचलो.कोणती गोष्ट सांगू? कशी सांगू ?मुलं माझा ऐकतील का ?हसणार तर नाही ना ! एक ना अनेक प्रश्न सतावू लागले. त्याकाळी झी. टी.व्ही.वर 'अकबर बिरबल' ही धारावाहिक पाहताना अचानक सुचलं ! उद्या मुलांना हीच गोष्ट सांगायची. ठरलं! घोकंपट्टी केली .दुसऱ्या दिवशी खोटं अवसान आणून, मुलांसमोर गोष्ट सांगायला सुरुवात केली. संपूर्ण शरीराचा थरकाप उडाला. पापण्यांची उघडझाप आणि पुढचा मुद्दा काही सुचेना .त्यात भर म्हणून, गोष्ट ऐकताना, गोष्टीपेक्षा माझ्याकडे पाहून समोरच्या  मुलांचं छान मनोरंजन होत होतं! गोष्ट सांगताना मी मुद्दा विसरलो की, मुले आठवण करून द्यायची !यामुळे ,मी अधिकच गांगरलो. काही मुलं-मुली मनसोक्त हसत होती. कसे तरी ते दिव्य मी पार केले . नंतर काही मुलांनी येऊन सांगितले ,"सर ,ही गोष्ट आम्ही काल टी.व्ही.वर पाहिली होती ".हे ऐकून मी अधिकच खजील झालो! परंतु, त्यातून मी धडा घेतला. ग्रंथालयातून पुस्तक घ्यायला लागलो. वाचायला लागलो. लिहायला, नोंदी करायला लागलो. हळूहळू आत्मविश्वास वाढला.नंतर मात्र, शिक्षकांकडून कौतुक आणि विद्यार्थ्यांकडून टाळ्या मिळवू लागलो. एक शिक्षक म्हणून ,आत्मविश्वास या शाळेमुळे माझ्यात निर्माण झाला.
      मी मूळचा सटाणा तालुक्यातील आहे, असे लक्षात आल्यावर आपोआप त्या भागातील वरिष्ठ शिक्षक आपल्या गावाकडचा म्हणून माझ्याशी आपुलकीने वागू लागले. त्यात श्री.दिलीप आहिरे आणि श्री.दिनेश देवरे यांचा विशेष उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.
      श्री. देवरे सर वक्तृत्व कलेत निपून होते. एकतर ते नवीन इंग्रजी शाळेचे माजी विद्यार्थी. त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसोबत ते आता नोकरी करीत होते. त्यांचे वडील एच.ए.एल. कारखान्यात नोकरी करता करता किर्तन देखील करायचे. त्यामुळे श्री देवरे सरांवर अध्यात्माचे संस्कार वडिलांकडून झाले होते. देवरे सर दोन विषयात पोस्ट ग्रॅज्युएट होते. मी नोकरीला लागलो तेव्हा ते शिकत होते. "नोकरी लागली तरी शिक्षण थांबवायचं नाही", हे माझ्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने मला खडसावून सांगितलं होतं. त्यात श्री देवरे सरांनी मला खूप प्रोत्साहन दिले आणि मदत देखील केली. शाळेतून पदाधिकाऱ्यांकडून अनेकदा, आपलं काम सांभाळून शिक्षणासाठी सवलत घ्यावी लागत असे. त्याकरिता, श्री.देवरे सर मध्यस्थी करत.त्यामुळेच ,मी न थांबता पोस्ट ग्रॅज्युएट आणि व्याख्याता पदासाठी आवश्यक सेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो. देवरे सरांची बोलण्याची कला आणि व्यासंग मला नेहमी आकर्षित करीत असे. शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या बाबतीत त्यांच्या पावलावर पाऊल टाकावे, असे मला नेहमी वाटते .उत्स्फूर्त भाषण करण्याची कला त्यांना अवगत होती.विषय कोणताही असो, समोर श्रोतावर्ग कोणीही असो ,देवरे सर भाषणाला सुरुवात करत. त्यांची प्रारंभीची दोन वाक्ये ठरलेली असत. "आज अमृतकांचन योग आहे",किंवा "असे पाहुणे आपल्याला मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे." असे म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांना ते खूश करत.ही दोन वाक्य उच्चारल्या नंतर देवरे सर पुढील दहा पंधरा मिनिटे तरी भाषण थांबवणार नाही, याची खात्री असे. कोणतेही कागद, टिपण त्यांना लागत नसे. संतांचे अभंग, ओव्या, त्यांच्या तोंडपाठ असत. ऐकणारा श्रोतृवृंद खुश होऊन जाई. त्यांच्या बोलण्यात माधुर्य होतं! ऐकताना आम्ही सारे मंत्रमुग्ध होऊन जात. मला नेहमी त्यांच्या सारखं कधी बोलता येईल ? याचा विचार माझ्या मनात येत असे. कधीकधी माझे भाषण असले, तर त्याचं समीक्षण मी त्यांना विचारत असे.  ते नाउमेद  करीत नसत. परंतु ,शैलेश तू असा बदल कर. म्हणजे अधिक उत्तम होईल. असं सुचवायचे. बऱ्याचदा ,मला शाळा सुटल्यावर दुपारच्या स्वयंपाकाचा कंटाळा येई. अशावेळी ,श्री. देवरे सर मला बळजबरीने त्यांच्या दुचाकीवर बसवून घेऊन टाऊनशिप मध्ये ,त्यांच्या घरी नेत.त्यांच्या मातोश्री माझ्यासारख्या आगंतुक आलेल्या साठी गरम गरम पोळी भाजीचे ताट पाटावर वाढत असत. माझा आत्मा तृप्त होत असे .जेवण झाल्यावर पुन्हा, सर मला माझ्या खोलीपर्यंत सोडण्यासाठी येत.मला नेहमी असं वाटतं की, ईश्वराने, अशी अनेक माणसे माझ्यासाठी पाठविली. जेणेकरून मला कधीही परिस्थितीचे चटके फारसे बसले नाहीत. देवरे सर आणि माझे नाते भावासारखे होते. नव्हे अजूनही आहे! देवरे सर, एक दिलदार मित्र! स्वतःपेक्षा इतरांचा विचार त्यांना अधिक असतो. कोणी काही काम सांगितले तेथे हजर असतात. त्यावेळी त्यांच्या पत्नी ओझर परिसरात प्राथमिक शिक्षिका असल्याने किमान इयत्ता पाचवीच्या एका तुकडीचे प्रवेश देवरे सरांच्या माध्यमातून होत. त्यासाठी त्यांनी मुलांच्या वह्या पुस्तकांसाठी, दप्तर आणि गणवेशासाठी पदरमोड केल्याचे मला आठवते.
      श्री. खैरनार सर गमतीने ज्यांचा उल्लेख चंगू आणि मंगू म्हणून करत, ते म्हणजे श्री. देवरे सर आणि श्री.अहिरे सर !! हे दोघेही शाळेत आणि शाळेबाहेर ही बराच काळ एकत्र रहात. मी ओझर येथे खोली भाड्याने घेऊन राहत असे .त्यावेळी खोली शोधून देण्यापासून सर्व काही मदत श्री. अहिरे सरांनी मला केली ते वर्तमानपत्रात छंद म्हणून लेख लिहायचे.वार्ताहर म्हणून काम करीत. ते मला बातम्या लिहायला सांगत. त्यांचे अक्षर फार सुंदर होते. चित्रकला शिक्षकाला लाजवेल असे त्यांचे फलकलेखन होतं!कोणीही त्यांच्या या कलेच्या प्रेमात पडेल ! प्रभावी अध्यापन ही त्यांची जमेची बाजू होती. पदाधिकाऱ्यांना ते सर्वतोपरी मदत करीत. शाळेसाठी त्यांनी भरपूर मेहनत केली. ते सूत्रसंचालन फार उत्तम रीतीने करतात. श्री.अहिरे सरांचे अक्षर लेखनाचे अनुकरण करून माझे देखील लेखन वाचनीय झाले! शाळेच्या पाचवीच्या वर्गाच्या प्रवेशासाठी किमान एक तुकडी, अहिरे सर वेगवेगळ्या माध्यमामुळे मिळवत असे..अहिरे सरांनी मला भावनिक आधार दिला. अनेक शालेय उपक्रमात ते मला सहभागी करून घेत. त्याचा मला पुढील काळात खूप उपयोग झाला. श्री.अहिरे सर आणि श्री देवरे सर यांनी मला परकेपणाची वागणूक दिली नाही. उत्तम शिक्षकाच्या अंगी असलेले अनेक गुण त्यांच्या ठायी होते. माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात या दोघांबरोबर मी राहिल्याने कदाचित माझ्या जीवनाची गाडी घसरली नाही. मी सदैव त्यांच्या ऋणात राहणे पसंत करीन.
     शाळेतील विद्यार्थ्यांशी माझे ऋणानुबंध पक्के जुळले. सर्व विद्यार्थी शिक्षकांसाठी समान असतात. परंतु त्यातील काहींना हृदयात स्थान असते. असे काही विद्यार्थी माझे सवंगडी होते. महेश रासने ,गणेश लासुरे, कोळपकर , विष्णू पगार,अश्विन थोरात, ऋषिकेश कासार, गणेश तांबट,देवेंद्र तिवारी ,इत्यादी. सर्व नाव आता आठवत नाहीत. माझं वय १८-१९ वर्षे आणि  या मुलांचे वय साधारण बारा-तेरा वर्षे .ते विद्यार्थी कमी आणि मित्र अधिक होते. पहिल्या वर्षी या विद्यार्थ्यांना मी पाचवीच्या वर्गाला वर्गशिक्षक होतो .मुलं मला आणि मी मुलांना खूप आवडत असे. कारण माहित नव्हतं. एकदा या मुलांनी मला गावात एका छोट्या हॉटेलमध्ये घेऊन जाऊन मलाई बर्फी खाऊ घातली. मी  बिलाचे पैसे देण्यासाठी काउंटरवर गेल्यावर कळले, मुलांनी पैसे आधीच हॉटेल मालकाला देऊन ठेवले होते. मुलांनी थोडे थोडे पैसे एकत्र करून मला पार्टी दिली होती ! आज मला वाटेल तेव्हा गोड-धोड पदार्थ विकत आणून मी खाऊ शकतो .परंतु, माझ्या मुलांनी मला प्रेमाने खाऊ घातलेल्या मलई बर्फी ची सर त्याला कशी येणार !!
      शाळा सुटल्यानंतर रोज आम्ही या मुलांबरोबर मनसोक्त क्रिकेट खेळायचो. त्यामुळे माझे आणि मुलांचे नाते अधिकच घट्ट झाले.
      वरिष्ठांच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करत- करत बरा पासून.... चांगल्या पर्यंत माझी प्रगती झाली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये माझी चांगलीच छाप पडू लागली.आणि... अचानक २००० सालच्या डिसेंबर महिन्यात माझ्यासह काही शिक्षकांच्या बदलीची ऑर्डर आमच्या हातात पडली. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य शाखेत ,म्हणजे पेठे विद्यालयात बदली झाल्याचा आनंद झाला! शेवटच्या दिवशी, रिलीव्ह ऑर्डर घेऊन, मुलांचा निरोप घेताना बालगोपाळांचे हिरमुसलेले चेहरे पाहून ,माझ्यासह इतरांना गहिवरुन आले. "सर, तुम्ही जाऊ नका ना !"अशा ,आर्त विनवण्या हृदय पिळवटून टाकत होत्या !!
      मन, नवीन इंग्रजी शाळेतील मुलांमध्ये सोडून जड अंतकरणाने पुढील प्रवासासाठी निघालो...
     नवीन इंग्रजी शाळेने मला काय दिले ? खरं म्हणजे वादळात उभे राहण्यासाठी, माझ्या पायांना ताकद दिली. हिम्मत दिली. आनंद कसा आणि कशात मिळवायचा, ते शिकवलं. मोजके, परंतु चांगले मित्र दिले. आदर्शांची शिदोरी दिली. जिव्हाळा ,आपुलकी ,प्रेम ,सर्व..... सर्व काही दिलं .परमेश्वर त्या ज्ञानमंदिरास पुनश्च गतवैभव प्रदान करो, हीच मनोभावे प्रार्थना !!

                                       लेखन

                              श्री. शैलेश पाटोळे


चौथा लेख✍️✍️😊

  
    
    

      

27 comments:

Shailesh blog said...

चौथा लेख ✍️✍️✍️😊

दिपक पुं कडाळे said...

आपल्या सहकार्याबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल अत्यंत कृतज्ञतापूर्वक मांडलेले हे विचार खरोखरच सुंदर आहेत आणि हीच कृतज्ञता आजच्या काळात कुठेतरी हरवलेली आहे त्यामुळे हा जो लेख आहे तो अत्यंत उद्बोधक असा आहे माझा मित्र जे लेखन करतो आहे त्यात अत्यंत मनापासून करतो आहे त्यामुळे ते चांगले होत आहे असेच लिहीत रहा

दिपक पुं कडाळे said...

आपल्या सहकार्याबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल अत्यंत कृतज्ञतापूर्वक मांडलेले हे विचार खरोखरच सुंदर आहेत आणि हीच कृतज्ञता आजच्या काळात कुठेतरी हरवलेली आहे त्यामुळे हा जो लेख आहे तो अत्यंत उद्बोधक असा आहे माझा मित्र जे लेखन करतो आहे त्यात अत्यंत मनापासून करतो आहे त्यामुळे ते चांगले होत आहे असेच लिहीत रहा

दिपक पुं कडाळे said...

आपल्या सहकार्याबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल अत्यंत कृतज्ञतापूर्वक मांडलेले हे विचार खरोखरच सुंदर आहेत आणि हीच कृतज्ञता आजच्या काळात कुठेतरी हरवलेली आहे त्यामुळे हा जो लेख आहे तो अत्यंत उद्बोधक असा आहे माझा मित्र जे लेखन करतो आहे त्यात अत्यंत मनापासून करतो आहे त्यामुळे ते चांगले होत आहे असेच लिहीत रहा

Unknown said...

Sir tumcha anubhav mana la bharavun taknara hota .ha anubhav vachun mazyat khup sakaratmak badal zala ....tumhi dekhil mazya ayushatil 1 mothe adharsh vyaktimahtav ahe manapasun salam sirji

Unknown said...

nice blog sir😊🙏

Shailesh blog said...

Thank you.🙏😊
आपली ओळख दिली असती तर ,मी आपणास ओळखू शकलो असतो.

Shailesh blog said...

दिपू...धन्यवाद🤗🤗

Shailesh blog said...

Thank you very much🙏😊

Unknown said...

Spontinious overflow of powerful feelings recollected with tranquility. Speechless.Hats of to you.Keep it up.🙏

Unknown said...

Kupch Chan anubhav surekh padhatine Mandalay👍

Shailesh blog said...

Thank you 🙏😊

Shailesh blog said...

आभारी आहे.🤗🙏

Hrishikesh Kasar said...

सर, तुमचे लेखन वाचून पुन्हा एकदा आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा मिळाला. आपल्या सारख्या आदर्श शिक्षकांच्या स्मरणी आम्ही विद्यार्थी आजही आहोत याचा आम्हाला अभिमान वाटला.

Hrishikesh Kasar said...

सर, तुमचे लेखन वाचून पुन्हा एकदा आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा मिळाला. आपल्या सारख्या आदर्श शिक्षकांच्या स्मरणी आम्ही विद्यार्थी आजही आहोत याचा आम्हाला अभिमान वाटला.

Shailesh blog said...

Thank you ऋषी...🙏
तुमच्यामुळेच मी अनुभव संपन्न होऊ शकलो.
क्रिकेट खेळताना खूप मजा यायची.तुला आठवते का..तू लवकर आऊट होत नसे.आम्ही थकून जात असू.तुझे कव्हर ड्राईव्ह शॉट पाहण्यासारखा असे.खूप मजेत गेले ते दिवस !!

Unknown said...

फार छान माहिती दिली आहे, सर या ब्लॉग मध्ये काही ग्रामीण भागातील शब्दांचा वापर केला आहे,हे छानच आहे,
पुन्हा एकदा अभिनंदन, आणि असेच काही ब्लॉग वाचक म्हणून वाचायला आवडेल,
राजेंद्र पारधी

Shailesh blog said...

Thank Raju🙏

Dinesh Deore said...

Days of Navin Engraji Shala, is a blog written by Mr. Shailesh Patole is amazing. Mr.Shailesh Patole is not only a teacher but also a fantastic writer. In this blog, Mr. Shailesh Patole has beautifully mentioned the personality of teachers teaching in Navin Engraji Shala. The blog also specifies the enthusiasm of teachers teaching in school. In my view he is an epitome of education officer of N.E.S society.My good wishes are with Shailesh Patole for his future blogs..

बाबुराव मुरडनर said...

शाळा आपली माय असे.खरच प्रत्यक्ष जन्म देणारी माऊली आणि संस्कार करून घडवणारी शाळा ह्या दोन्ही माऊल्या यांचे ऋण कधीही न फिटणारे च. ह्या दोघींवर आपण ब्लॉग लिहून कृतज्ञतेने न्याय दिला. आपले व माझे अनुभव हे कमीअधिक प्रमाणात सारखेच आहेत.त्यांना शब्दबद्ध करणे तुम्हाला जमले, मला कधी जमेल की नाही शंका आहे. पण आयुष्यातला तो सुवर्णकाळ कधीही विसरता न येण्यासारखा आहे. छान.कीप इट अप...

बाबुराव मुरडनर said...

शाळा आपली माय असे.खरच प्रत्यक्ष जन्म देणारी माऊली आणि संस्कार करून घडवणारी शाळा ह्या दोन्ही माऊल्या यांचे ऋण कधीही न फिटणारे च. ह्या दोघींवर आपण ब्लॉग लिहून कृतज्ञतेने न्याय दिला. आपले व माझे अनुभव हे कमीअधिक प्रमाणात सारखेच आहेत.त्यांना शब्दबद्ध करणे तुम्हाला जमले, मला कधी जमेल की नाही शंका आहे. पण आयुष्यातला तो सुवर्णकाळ कधीही विसरता न येण्यासारखा आहे. छान.कीप इट अप...

बाबुराव मुरडनर said...

या इथे, या इथे शाळा आपली माय असे खरोखर किती सुंदर ओळी आहेत.तो संपूर्ण सुवर्ण भूतकाळ डोळ्यासमोर उभा केला. तिडके सरांचा त्या काळचा वर्तमान अनुभवलाय पण त्यांचा इतिहास भूगोल तुमच्यामुळे आज कळला. त्या ज्ञानमंदिराला लवकरच पुन्हा छान दिवस यावेत हीच सदिच्छा...

Shailesh blog said...

सर धन्यवाद!
श्री बाळ देशपांडे, तुम्ही ,श्री यशवंत चौधरी ,श्री बाळासाहेब भडके, श्री प्रितिष तांबट, कै. शरद कासार, शाळेतली इतर मुले कै. रवी दानी, श्री गंगाधर बदादे ,आपण सर्वजण वॉलीबॉल शाळा सुटल्यानंतर खेळत असू.
खेळ खेळून झाल्यानंतर बाजारातील भेळ पत्ता खाण्याची मजा काही औरच होती.... त्यात प्रेम, जिव्हाळा ,आपुलकी चा मसाला होता !
या लेखाच्या निमित्ताने सर्व आठवणी ताज्या झाल्या.

Shailesh blog said...

श्री. दिनेश देवरे सर आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या प्रतिक्रियेतून आपण माझे कौतुक केले. परंतु त्यामागे आपले मार्गदर्शन व जिव्हाळा महत्त्वपूर्ण होता. सदैव आपला ऋणी !!

Amol said...

सर खूपच छान लेख लिहिला आहे ����������

Shailesh blog said...

Thank you Amol🌹

युवा मल्हार सेना नाशिक said...

पूर्वी कष्टाळू व मेहनती शिक्षक असायचे.,पगार कमी असायचा त्यांना..हल्ली नवीन लोकांना पगार खुप वाढले मात्र शाळेसाठी कष्ट करण्याची इच्छाशक्ती दिसून येत नाही.

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...